'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 29 February 2024

‘यूथ फ्लरिशिंग’ म्हणजे काय?

माझा मुलगा अर्जुन सध्या अडीच वर्षांचा आहे. जन्मल्यापासून आतापर्यंत अर्जुनची वाढ योग्य रीतीने होते आहे की नाही हे बघण्यासाठी पिडिऍट्रिक्सच्या आणि बालमानसशास्त्राच्या विज्ञानाने बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे विविध टप्पे व लक्षणे सांगितलेली आहेत. त्या मैलाच्या दगडांनुसार अर्जुनची किंवा इतर कुठल्याही बाळाची वाढ तपासता येते. सर्व छान सुरू असेल तर आनंद मानायचा आणि जर कुठे कमतरता असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करायची ही संधी पालकांना (आणि पाल्याला) उपलब्ध असते.

जर लहान मुलांसाठी ही सोय आहे तर मग या देशातल्या 26 कोटी युवांसाठी काय? त्यांचे सर्व आलबेल चालू आहे की नाही हे (त्यांनी व इतरांनी) कसे ओळखायचे? त्यावर गरज असल्यास उपाययोजना कशा करायच्या? मुळात योग्य ‘ट्रीटमेंट’ साठी प्रथम योग्य ‘डायग्नोसिस’ कसे करायचे?

दुर्दैवाने आपल्या देशात युवांच्या विकसनासाठी पुरेसे काम केले जात नाही आहे. शासन युवांकडे निव्वळ मतदार म्हणून किंवा रोजगारासंबंधीच्या एखाद्या योजनेचे लाभार्थी म्हणून बघते तर खाजगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रात देखील बहुतांश वेळा ‘युथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. सीएसआरद्वारा केल्या जाणार्‍या मदतीमध्ये सुद्धा युवाविकासासाठी काम करण्याला फारसे प्राधान्य दिल्या गेल्याचे दिसत नाही. एकूणच युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांतन वा प्रारूप देखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृष्यमान (दर्शनीय!) आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क्स, डिग्री वा कॉलेजचे नाव, नोकरी, पगार, घर वा गाडी असणे, इ. त्यांनाच प्राधान्य मिळते. आणि जणु याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे निर्लक्षून चालणार नाही पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही. मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून याची कल्पना करता येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरु आहे, तो किंवा ती “फ्लरिश” होत आहे, युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धीगम्य आणि सैध्दांतिक प्रारूप नसेल तर सखोल समज देखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे, त्यांचे मोजमाप करणे हे देखील अवघड!

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन, मोबाईलचा अतिवापर याभोवतीच घोळते. या सहा मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्माण या आमच्या उपक्रमाद्वारे भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक “निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क” तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या 17 वर्षात हजारो युवकांसोबतच्या आमच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती व्यापक असून त्यात 7 मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण 50 विविध घटक अशी विभागणी आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंतर्गत लायसन्स केलेले हे विस्तृत फ्रेमवर्क निर्माणच्या संकेतस्थळावर https://nirman.mkcl.org/media/nirman-youth-flourishing-framework येथे बघता येईल.

यातील 7 मुख्य विभाग म्हणजे: 
1. शारीरिक स्वास्थ्य - Physical Health, 
2. मानसिक स्वास्थ्य - Psychological Well-Being, 
3. चारित्र्य विकास - Character Development, 
4. नातेसंबंध - Social Relationships, 
5. व्यावसायिक विकास - Professional Development, 
6. जीवन कौशल्ये - Life Skills आणि 
7. सामाजिक योगदान - Social Contribution


या फ्रेमवर्कचा ज्यांना उपयोग होईल असे 4 श्रोतृगट आमच्या नजरेसमोर आहेत:

1. युवांना फ्लरिशिंगच्या या रंगपटावर मी सध्या नेमका कुठे आहे हे शोधता यावे म्हणून तयार केलेली ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली’ देखील निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्णत: ऑनलाईन अशी ही प्रश्नावली भरल्यानंतर त्यावर आधारित 5 पानांचा रिपोर्ट प्रत्येकाला त्याच्या इमेलवर मिळतो. युवा स्वत: याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट्य काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार करू शकतात. स्वत:च्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वत: घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात.

2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थांच्या सर्वांगीण व्यक्तित्व विकासावर भर द्यावा असे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार विविध कॉलेजेसमध्ये या प्रश्नावलीचा वापर करून अध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. डिग्रीच्या अभ्यासासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वैयक्तिक ‘ग्रोथ प्लॅन’ तयार करू शकतात. प्लेसमेंट्सच्या वेळी तांत्रिक कौशल्यांसोबतच आपल्या व्यक्तित्व (character) आणि व्यक्तिमत्वाविषयी (personality) देखील विद्यार्थी नेमकेपणे बोलू शकतील अशी तयारी करून घेता येईल.

3. संशोधक व धोरणकर्ते या फ्रेमवर्क मधील विविध घटकांवर संशोधन, त्यांचे विष्लेषण, उपयुक्त ज्ञाननिर्मिती, शिफारसी, इ. वर काम करू शकतात. यातून उद्या काही नवीन घटकांचा समावेश देखील या फ्रेमवर्कमध्ये होऊ शकतो.

4. युवांसोबत संबंध येणारा इतर कुठलाही सुजाण भारतीय नागरिक – पालक, नातेवाईक, भावंड, शिक्षक, सल्लागार, गट प्रमुख, कंपनीतील बॉस वा वरिष्ठ सहकारी, मित्र, जोडीदार – या फ्रेमवर्कचा उपयोग करुन त्याच्या/तिच्या संपर्कात येणाऱ्या युवांच्या विकासात हातभार लावू शकतो.

निर्माण म्हणून आम्ही असे भविष्य बघू इच्छितो जिथे भारतातील तरुणाईची प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना ही, त्यांच्या व इतरांच्या विचारातदेखील, परीक्षेचे मार्क्स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाड्यांची संख्या अथवा चौरस फुटामधील मालमत्तेचा आकार, या पलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.

मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित संभावना आहेत. त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जबाबदारी आणि आपण बाकी सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे. या प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा करतो.

या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासावरील शोध निबंधाची येत्या जून महिन्यात अमेरिकेत होणार्‍या ‘कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग अॅडल्टहूड’ मध्ये सादरीकरणासाठी निवड झाली आहे. भारतातील युवांच्या व्यक्तित्व विकासाबाबत केल्या गेलेला हा या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. यापासून सुरुवात होऊन हळुहळु भारतातील युवांच्या विकासाबाबतचे भारतीय परिप्रेक्ष्यातील विज्ञान आणि त्यावर आधारित नीती व उपक्रम विकसित होतील अशी मला आशा आहे.

शेवटी फ्लरिशिंग युवा हेच फ्लरिशिंग भारताचे खरे चिन्हक व पताका असतील आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन असतील!


अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

Wednesday 31 January 2024

युवा कसे जगत आहेत?

भारतात 18 ते 29 वर्षे या वयोगटात 26 कोटी युवा आहेत. पण ते काय करत आहेत, त्यांचा रोजचा दिवस कसा जगत आहेत, हे युवा स्वयंविकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का? अत्यंत कळीचे असे हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रथम काही उदाहरणे बघुयात.

श्रावणी चंद्रपूरची. स्वत:ची इच्छा नसतांना देखील आई-वडीलांचा आग्रह म्हणून तिने त्यांनी सांगितलेल्या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आता तिला फार पैसे मिळतील अशी नोकरी लगेच सापडत नाही आहे. आई-वडील म्हणताहेत की तू पुण्याला जा आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लाव. तिची ती देखील इच्छा नाही. कुठे शिकाऊ उमेदवारीचे काम करावे यासाठी ती वा पालक दोघेही तयार नाहीत. परिणामत: पदवी संपून दोन वर्षे झालीत तरी श्रावणी घरीच बसून आहे. दिवस कसा जातो तर प्रामुख्याने मोबाईल, इन्स्टाग्राम व युट्यूबवर.

वैभव मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षाला आहे. हॉस्टेलला मुलांमध्ये दारु व गांजा सर्रास चालतात. दुसर्‍या मजल्यावरच्या त्याच्या रूमकडे चालत जात असतांना दोन्ही बाजूला अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. मेसमधले जेवण ना स्वास्थपूर्ण ना चवीष्ट. खूपदा बाहेरून स्विगी, झोमॅटोवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. त्यांचे अर्धवट अन्न उरलेले अनेक डब्बे व पार्सल्स विविध खोल्यांच्या दरवाज्यांबाहेर पडलेले दिसतात. तिथे अनेक उंदीर फिरत असतात. पुरेसे उन व खेळती हवा नसल्याने अनेक कपड्यांना फंगस लागले आहे. पण पोस्टिंगला जायचे असल्यास तोंडावर पाणी व अंगावर भरपूर स्प्रे मारुन चटकन तयार व्हायची कला वैभव व त्याच्या मित्रांनी अवगत केली आहे. ‘हॉस्टेल लाईफ’ हे असे असणारच असे मानून यात काही गडबड आहे असे देखील आता वैभवला वाटत नाही. रोजचे (प्रामुख्याने रात्रीचे) सुमारे 4 ते 5 तास हे वैभव इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात, मिर्झापूर – मनी हाईस्ट सारख्या वेब सिरिज बघण्यात, पब्जी वा इतर गेम्स खेळण्यात घालवतो. तो सहसा रात्री 3 वाजता झोपतो. पुस्तके वाचण्याची तशी वैभवला फारशी सवय नाहीच पण आता मित्राच्या सांगण्यावरून त्याने अंकूर वारिकू यांचे ‘डू एपिक शिट’ हे पुस्तक चाळायला घेतले आहे. कुठलेच वर्तमानपत्र वाचत नसल्याने भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड आहेत आणि नुकताच इतर न्यायाधीशांना कॉलेजियम पद्धतीने नियुक्ती द्यावी की नाही यावर सरकार आणि कोर्टाचा काही वाद झाला या (व अशा) बाबतीत वैभव पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

अक्षय बीड जिल्ह्यातल्या एका गावातील हुशार मुलगा. नवोदय विद्यालयात बारावीपर्यन्त शिकून तो आता अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला औरंगाबादला आला आहे. कॉलेज तर म्हणायला सुरु आहे पण लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स क्वचितच होतात. आई-वडील वा घरच्या इतर कोणाशीही अक्षयला फारसे नीट बोलता येत नाही, स्वत:च्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. ‘जेवण झाले का, सर्व ठीक सुरू आहे ना’ या भोवतीच बोलणे थांबते. कॉलेजमध्ये दोन-तीन मित्र आहेत पण त्यांच्यासोबतचा संवाद देखील उथळ आहे. आपली घुसमट होते आहे, सतत एकटेपणाची भावना आहे असे अक्षयला वारंवार वाटत असते.

नाशिकच्या अभिनवची एमबीबीसची पदवी पूर्ण होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. पुढे पीजी करायला हवे, ते देखील रेडियोलॉजी, ओर्थोपेडिक्स वा स्किन याच विषयात असे त्याला वाटते, कारण त्या ब्रांचेसना प्रतिष्ठा आहे, त्यात बक्कळ पैसा आहे असे त्याला सिनियर्सनी सांगितले आहे. दुर्दैवाने यात किंवा इतर कशातही प्रवेश मिळेल एवढे गूण अभिनवला नीट पीजीच्या परीक्षेत मिळत नाही आहेत. तीन वर्षे झालीत तरी तो अद्याप परिक्षाच देत आहे. तोच तोच अभ्यास करून अभिनव कंटाळला आहे. बर्‍याचदा त्याला फ्रस्ट्रेटेड वाटतं. कॉलेजमध्ये फिरतांना लाज वाटते. खोली – लायब्ररी – मेस एवढेच चक्र दिवसभर चालू आहे. 27 वर्षे वय झालं तरी अजूनही त्याचा गुजारा आई-वडील पाठवत असलेल्या पैशांवरच होतो आहे.

जळगावची प्रणाली आता गेली चार वर्षे पुण्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे. तिला भरपूर पॅकेज आहे याचा तिला झालेला आनंद आता ओसरला आहे पण त्याबाबत तिच्या आई-वडीलांना असलेला अभिमान मात्र अजून कायम आहे. त्याहून किमान दीडपट अधिक कमावणारा मुलगाच प्रणालीकरिता बघायचा असे त्यांनी ठरवले आहे. इकडे प्रणालीला मात्र तिच्या कामात आता कुठलाही उत्साह राहिलेला नाही. रोज पाच कधी वाजतील याची ती वाट बघत असते. ऑफिसमधील सहकारी देखील विकेंडचा प्लॅन काय करायचा याचीच चर्चा करत असतात. दारु पिणे प्रणालीला स्वत:ला फारसे पटत नाही पण सोबतचे मित्र-मैत्रिणी मनसोक्त पितात आणि आपण एकटे पडायला नको म्हणून ती त्यांच्यासोबत पब्सना जात असते. पुण्यातले बहुतांश हॉटेल्स त्यांनी पालथे घालून झाले आहेत. ‘पुण्यात फ्लॅट बूक कर’ असा पालकांचा तगादा सुरू असतो तो तिने कसाबसा आतापर्यंत थोपवून धरला आहे. आपण काही सामाजिक योगदान द्यावे असेही प्रणालीला अधेमध्ये वाटते पण नेमके काय करावे हे काही सुचत नाही.

प्रतीक नांदेडचा. विद्यापीठामध्ये एमएच्या पहिल्या वर्षाला त्याने नाव नोंदवले होते पण मग मध्येच ते सोडले. त्याचा दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे इतर दोन मित्रांना घेऊन रोज 50-100 रुपयांचे पेट्रोल भरून त्याच्या यामाहा बाईकवर ट्रिपलसीट फिरणे. त्याला टापटीप कपडे घालायला आवडते. फोटोग्राफरला 200 रुपये देऊन रोज मस्त फोटो काढून घेणे आणि त्याची इन्स्टाग्राम स्टोरी करणे हा त्याचा आवडता छंद. कोणाचे फॉलोअर्स किती व ते कसे वाढवायचे हा तीन मित्रांच्या गहन चर्चेचा नेहमीचा विषय. काम व कमाई यापेक्षा दारु, खर्रा व कॅरम हे जवळचे मुद्दे. आपल्या सारख्या युवांना ‘नीट’ (NEET – Not in Education, Employment or Training) म्हणून संबोधले जाते हे त्यांच्या गावीही नाही. आणि सरतेशेवटी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, संदीप. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा. कृषीमध्ये बीएससीची पदवी घेऊन आता चार वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. युपीएससी नाही तर किमान एमपीएससी तरी होऊ या इच्छेवर तगणार्‍या लक्षावधी तरुणांपैकी तो देखील एक आहे.

वरील सातही उदाहरणे (नावे बदलली आहेत) हे अपवाद नाहीत तर सध्याच्या युवांच्या सार्वत्रिक स्थितीचे प्रातिनिधिक निदर्शक आहेत.

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. त्यादरम्यान हे सात जण विविध रुपात, तपशीलाच्या काही बदलासह आम्हाला वारंवार भेटलेत. मनापासून वाईट वाटावे अशी ही परिस्थिती आहे.


लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्‍याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.



अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

Sunday 28 January 2024

युवा म्हणजे नेमके कोण?

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची, त्यांचे प्रश्न – द्वंद्व – निर्णय – त्यांचे परिणाम बघण्याची आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. बहुतांश वेळा आनंददायी, कधी त्रासदायक पण कायमच शिकवणारा असा हा प्रवास राहिला आहे. या दरम्यानचे आमचे अनुभव व निरीक्षणे, गोळा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सोबतच ‘यूथ सायकॉलॉजी’ या विषयाचे आधुनिक विज्ञान या सगळ्यांचा आधार 'लोकसत्ता' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सदरातील मांडणी करताना मी घेणार आहे.

भारत हा युवांचा देश आहे’ हे आता वापरुन वापरुन गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण ‘युवा / यूथ’ म्हणजे नेमके कोण ही मात्र अगदी सर्वज्ञात व सर्वमान्य अशी संज्ञा नाही. ‘यूथ’ या नावाखाली अनेक विविध वयोगट खपून जातात. युनायटेड नेशन्स असो की भारत सरकार, वय वर्षे 13 पासून ते वर्ष 35 पर्यन्तच्या दरम्यानचे अनेक कालखंड (13 ते 35, 15 ते 34, 15 ते 29, 18 ते 24, 18 ते 29, ...) हे युवावस्थेसाठी म्हणून वापरले जातात. यात दुर्दैवाने अजून सार्वमत नाही. व्याख्येचाच गोंधळ असेल तर भारतात नेमके युवा किती याच्या उत्तरांत देखील तफावत येणारच. काही तरी ठोस नेमकेपणा हवा म्हणून निर्माणमध्ये आम्ही 18 ते 29 या वयोगटाला युवा म्हणून मानायचे असे ठरवले आहे (त्यामागची काही वैज्ञानिक व व्यावहारिक कारणे पुढे येतील). या सदरासाठी देखील आपण तीच व्याख्या कायम ठेऊया.

तर 18 ते 29 या वयोगटात भारताची 22% लोकसंख्या आहे. म्हणजे एकूण 26 कोटी लोक! आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडेंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे हे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे. 2021 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 28 वर्षे होते, म्हणजेच भारताची अर्धी लोकसंख्या ही 28 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि उरलेली अर्धी अधिक वयाची होती. तुलनेसाठी म्हणून त्याच सुमारास चीनचे ‘मिडियन’ वय हे 37, पश्चिम युरोपचे 45 व जपानचे 49 वर्षे होते. जगातल्या सर्वाधिक तरुण देशांपैकी एक हा भारत आहे. पण सोबतच हे समजून घेणे देखील गरजेचे आहे की ही अमर्यादित काळासाठी उपलब्ध असलेली संधी नाही. 2031 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 31 वर्षे होणार आहे आणि त्यापुढे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. आपण कोणीच आज जितके तरुण आहोत तितके भविष्यात नसणार, हे जसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तिकरीत्या खरे तसेच ते देशाच्या पातळीवर देखील खरे आहे. म्हणूनच युवांच्या बाबतीतली आपली समज वाढणे आणि त्यांच्या सकारात्मक वाढीला, कर्तृत्वक्षमतेला खतपाणी घालणे ही येत्या दशकातली कळीची बाब असणार आहे. हे नीट करता यावे यासाठी युवावस्था नेमकी काय, ती कशी उदयाला आली / येते, तिची प्रमुख लक्षणे (फीचर्स) काय, त्यादरम्यानच्या प्रमुख समस्या काय, इ. बाबतीत आपले समाज म्हणून आकलन विस्तारणे आवश्यक आहे.


अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील रिसर्च प्रोफेसर जेफ्री आर्नेट यांनी 2000 साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रख्यात शोधपत्रिकेत लिहिलेल्या निबंधात या मधल्या अवस्थेचे विस्तृत वर्णन करून तिला ‘इमर्जिंग ऍडल्टहूड
’ असे नाव दिले आहे. एरिक्सन यांच्या ‘लाईफस्पॅन थियरी’ मधील पौंगडावस्था ते प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अशी ही नवीन पायरी आता मानली जात आहे. आर्नेट यांचा हा शोधनिबंध एक मैलाचा दगड ठरला असून त्यानंतर आता इमर्जिंग ऍडल्टहूड हा एक गंभीर अभ्यासाचा विषय बनला आहे. या विषयाला पूर्णत: वाहून घेतलेले आणि दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे इमर्जिंग ऍडल्टहूड याच नावाचे एक जर्नल देखील आहे ज्यामध्ये जगभरातून येणारे शोधनिबंध असतात. दुर्दैवाने जगातील सर्वात जास्त इमर्जिंग ऍडल्ट्स (म्हणजेच 18 ते 29 वयोगटातील आपले युवा अथवा यूथ) ज्या भारत देशात आहेत तिथून मात्र फारच कमी (जवळजवळ नाहीतच) असे या विषयावरचे शोधनिबंध प्रकाशित होतात. भारतासाठीच्या महत्त्वाच्या अशा आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर (उदा. मलेरिया, टीबी) जसे भारतीयांनी नाही तर पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी संशोधन केले, तसे काहीसे याबाबतीत व्हायचे नसेल तर आपल्या देशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, सामाजिक संस्था, इत्यादींनी आपल्याकडील या 26 कोटी इमर्जिंग ऍडल्ट्स / यूथ / युवांबाबत संशोधन करणे, त्यांना समजून घेणे व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी विविध उपक्रम विकसित करणे हे अत्यावश्यक आहे.

जन्मल्यापासून पुढे मनुष्याची वाढ टप्प्याटप्प्याने कशी होते याबाबत मानसशास्त्रामध्ये एरिक एरिक्सन यांची ‘लाईफस्पॅन थियरी’ महत्त्वाची मानली जाते. बालपण ते प्रौढावस्था यांच्या मध्ये पौंगडावस्था (ऍडॉलेसन्स) ही एक पायरी यात मानली गेली आहे. जी. स्टॅन्ली हॉल हे अॅडोलेसन्सच्या वैज्ञानिक अभ्यासाचे जनक मानले जातात. त्यांनी 1904 साली या विषयावर पहिल्यांदा दोन खंडांचे पुस्तक लिहिले. त्यांतर हळुहळु ऍडॉलेसन्स हा घरोघरी वापरला जाणारा शब्द झाला. (हॉल यांच्या इतर दोन विशेषता म्हणजे ते अमेरिकेतील सायकॉलॉजीचे पहिले पीएचडी आणि अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे संस्थापक!)

आपण जर ओघाने आपल्या आजी-आजोबा, पणजोबा यांच्या पीढीच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली तर असे लक्षात येईल की काही दशकांपूर्वीपर्यन्त माणसे पौंगडावस्थेतून सरळ प्रौढावस्थेत पदार्पण करीत. उच्च शिक्षणाचे प्रमाण फारसे नसे व त्यासाठी फार वर्षे देखील लागत नसत. लग्न व मुलबाळ लवकर होत असे. एकूणच प्रौढ जीवनाच्या जबाबदार्‍या विशीतच स्वीकारल्या जात आणि माणसे कुटुंब व काम यामध्ये चटकन ‘सेटल’ होत असत. 

मात्र हळुहळु हे स्वरूप बदलायला लागले आहे. आता पौंगडावस्था ते प्रौढावस्था असे लगेच संक्रमण होत नसून या प्रवासाला बराच कालावधी लागतोय. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले असून आजकाल अनेकदा 27 - 28 वयापर्यंत (अनेकदा त्याच्याही पुढे) लोक औपचारिक शिक्षण घेत असतात. लग्न होण्याचे वय वाढत चालले आहे आणि साहजिकच मुले देखील उशिरा होत आहेत. तरुण-तरुणी ‘सेटल’ होण्याआधी विविध पर्याय (कामाचे, जागेचे, जीवनशैलीचे, जोडीदाराचे) ‘एक्स्प्लोअर’ करु इच्छितात व त्यासाठी वेळ घेताहेत. ज्या 18 ते 29 वयोगटाला आपण युवा म्हणतोय त्यातील अनेक जण हे आता ‘ऍडॉलेसेन्ट’ तर नाही पण पूर्णत: ‘ऍडल्ट’ देखील नाही अशा एका मधल्या अवस्थेत आहेत.

बालमृत्युचा प्रश्न पूर्णत: संपला जरी नसेल तरी आपल्या देशासाठी ते आता तेवढे मोठे आव्हान उरलेले नाही. जगण्याची संधी मिळून आता युवावस्थेत पोहोचलेल्या (आणि पुढील वर्षांत येऊ घातलेल्या) कोट्यवधी तरुण – तरुणींना आपण कसे घडवतो, घडायला मदत करतो हा आता आपल्यापुढचा सर्वात कळीचा प्रश्न असणार आहे.

युवावस्थेतील महत्त्वाची लक्षणे काय, यूथ फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय, युवांना पडणारे मुख्य प्रश्न कोणते, ‘पर्पज’ ही संकल्पना नक्की काय व युवांसाठी त्याचे महत्त्व काय, करियरची निवड, मूल्यव्यवस्था, आर्थिक गरजा व आकांक्षा, भावनांविषयी जागरूकता व व्यक्त होता येणे, युवा व व्यसने, युवांची सामाजिक जबाबदारी व कृतीशीलता, इ. अनेक विषय या सदरातील पुढील लेखांत आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्यातील माहितीचा उपयोग करुन ज्याला अधिक समजून घेता येईल आणि ज्याच्या विकासात योगदान देता येईल असा तुमच्या परिचयातील किमान एक इमर्जिंग ऍडल्ट शोधून ठेवा! भेटूच लवकर! 




अमृत बंग 

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत. 

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे. 

amrutabang@gmail.com