'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 21 September 2022

शिक्षण व्यवस्था कशी असावी?

सध्याची शिक्षण व्यवस्था ही माहिती पुरवणे व काही प्रमाणात कौशल्यांचा विकास करणे यापुरती मर्यादित आहे. परंतु व्यक्तीचा आंतरिक विकास, समाजाप्रती कर्तव्यांची जाणीव आणि जीवनाचं ध्येय याकडे मात्र शिक्षण व्यवस्थेचं दुर्लक्ष होतं. याला पर्याय म्हणून महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावेंनी 'नई तालीम' या शिक्षण प्रक्रियेचा विचार मांडला. नेमकी काय आहे ही 'नई तालीम' शिक्षण प्रक्रिया? आणि शिक्षण व्यस्था कशी असावी? जाणून घेऊयात डॉ. अभय बंग यांचे मत.

‘Schooling system is for sake of schooling system’ असं आहे का? Schooling System ही शिक्षकांसाठी रोजगार हमी योजना आहे का? आई बाबांना पोरांची ८ तास कट कट नको म्हणून आहे का? खरं म्हणजे या तीनही प्रश्नांचं उत्तर हो आहे. वास्तव जर पाहिलं तर आजची Schooling System ही या तीनच गोष्टींवर चालते. व्यक्तीच्या आंतरिक क्षमता यांच्या प्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शिक्षण असतं. दुसरं – ज्या समाजामध्ये आणि निसर्गामध्ये माणूस वाढतो त्या सृष्टीचे अनेक परिणाम त्याच्यावर होतात. आणि त्या समाज आणि सृष्टीच्या प्रती त्याचं काही उत्तरदायित्व देखील असतं. या दोन गोष्टी पूर्ण करायला खरं म्हणजे शिक्षण व्यवस्था असायला हवी. आजची Schooling System हे करत आहे का? काही प्रमाणात करत आहे. पण बहुतेक वेळा मात्र मुलांना मदत करायच्या ऐवजी मारक जास्त ठरत आहे.


नई तालीम शिक्षण प्रक्रिया

महात्मा गांधी आणि विनोबांनी नई तालीम या नावाच्या शिक्षण प्रक्रियेचे खूप खोल आणि प्रगल्भ विचार मांडलेले आहेत. या नई तालीम पद्धतीची मान्यता नक्की काय आहे? एक उदाहरण समजून घेऊया. आपल्यापैकी किती लोकांना सायकल चालवता येते? तर जवळपास सर्वांना येते. सर्वांनी कोणत्या शाळेत शिकली होती का? कोणती ट्युशन लावली होती का? कसे शिकलो आपण? सायकल शिकायच्या आधी ग्रॅव्हिटी, फोर्स, व्हेलॉसिटी हे सर्व माहिती नव्हतं. बस चालवायला लागलो आणि शिकलो. अशिक्षित लोकसुद्धा कोणत्याही थिअरी किंवा क्लासशिवाय हे शिकतात. तर जीवन हे माणसाला शिकायची संधी देत असतं. सायकल आपल्याला कोणत्या शाळेत किंवा ट्यूशन क्लासमध्ये नाही शिकवली गेली. प्रत्येक मुलात ती प्रेरणा, ती इच्छा असते ती विशिष्ट गोष्ट करायची. का असते ती प्रेरणा व इच्छा हे देवालाच ठाऊक. आपले आजी-आजोबा म्हणतात की आपण पडू शकतो, लागू शकतं, तरी आपण धोका पत्करतो. ती एक प्रबळ प्रेरणा आहे जी माणसाला शिकायची संधी देते. आपण बोलायला चालायला तसेच शिकतो. बालपणी आपण बोलायला कधी शिकलो हे आपल्याला आठवत पण नसेल. बस आपण शिकलो. या देशात असंख्य महिला आहेत ज्या गवत कापतात. त्या हे काम कोणत्या शाळेत शिकल्या आहेत – तर जीवनाच्या शाळेत शिकल्या आहेत.

जीवन ही सर्वात मोठी शाळा आहे. त्यामूळे आजच्या शाळेची कमतरता ही आहे की ती जीवनापासून तोडून शिकवते. म्हणून ती अपयशी ठरते. ती अपयशी ठरते हे लोकांना दिसू नये म्हणून विद्यार्थ्यांना ९९% गुण देतात. विद्यार्थ्यांना काही येत नाही हे कळू द्यायचं नाही म्हणून शिक्षक ९९% गुण देतात आणि मग बाहेर आल्यानंतर हे दिसतं की इंजिनीयर पदवीधरांपैकी ७०% लोकांना इंजिनीयरींग येत नाही! जीवनाच्या शाळेत असं कधी घडत नाही. जीवनाच्या शाळेत सायकल शिकलो म्हणजे शिकलो! असं तर नाही ना की त्यातले ७०% मुलं सायकल शिकूनही सायकल शिकले नाहीत? ही जीवनाची शाळा मोठी सुंदर आहे आणि म्हणून नई तालीमचा विचार शिक्षणाच्या बाबतीत हा आहे की जीवन आणि शिक्षण यात फारकत नसावी.

तर नई तालीम म्हणजे काय? सरळ जीवनावर उडी घेत जीवन जगता जगता जे काही तुम्ही काम करता त्यातून शिकणे. यामुळे उलट चांगलं शिक्षण घडतं. सध्या मात्र जीवन आणि शिक्षण हे दोन कप्पे केले आहेत – पहिले २० वर्ष नुसतं शिक्षण, जीवनाचा पत्ताच नाही आणि मग एकदा शिक्षण संपले आणि पदवी हातात आली, IIT असो की TISS ची असो, मग शिक्षण बंद. मग फक्त काम करा. विनोबांच्या शब्दांमध्ये जीवनाची विभागणी अशी आहे – ‘कर्महीन शिक्षण म्हणजे आळशी शिक्षण आणि दुसरं बिनडोक कर्म म्हणजे कामच काम कर्म नाही’. म्हणून नई तालीम असं म्हणते की ‘जीवन हेच शिक्षण’ आणि जीवन जगता जगता तुम्ही अतिशय सुंदर शिक्षण मिळवू शकता. तर जसं चालायला शिकलो, बोलायला शिकलो, हे तसंच आहे.

शिक्षण व्यवस्था कशी असावी?

आता प्रश्न असा आहे की शाळा असाव्यात की असू नये? तर आजच्या स्वरूपात नाही. शिक्षण प्रक्रिया असावी की असू नये? तर जरूर असावी. पण अशी की जी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक शिक्षणाच्या क्षमतेला आणि इतर ज्या त्यांच्यामध्ये क्षमता असतील त्या जोपासेल. कल्पना करा तेंडुलकर जर चुकून IIT मध्ये गेला असता तर काय झालं असतं? विचार करा तेंडुलकर in IIT. अयोग्य माणूस अयोग्य जागीच्या शिक्षण प्रक्रियेत गेला तर काय होतं? तेंडुलकरने त्या ऐवजी सरळ हातात बॅट घेतली. त्याला आठवीमध्येच लक्षात आलं की हेच माझं जीवन आहे. त्याने तेच केलं आणि आपल्याला माहिती आहे काय झालं. बिल गेट्स यांनी काय केलं? ते हार्वर्डमध्ये होते. हार्वर्डच्या एका कॉनव्होकेशन सोहळ्यात त्यांना बोलवलं होत. तर तिथे भाषण देताना ते म्हणाले, “कदाचित पहिल्यांदा घडत असावं की हार्वर्डच्या एका ड्रॉप-आऊटला तुम्ही कॉनव्होकेशनला बोलवलं आहे.” त्यांनी BSC देखील पूर्ण केलं नव्हतं. ड्रॉप-आऊट झाले आणि “मला सरळ कॉम्पुटर बनवायचा आहे आणि यात शिक्षकांची काही गरज नाही” म्हणाले. त्यांनी Microsoft Windows तयार केलं. एडिसन ने काय केलं? त्यांच्या नावावर आज जितके पेटंट आहेत तेवढे दुसऱ्या कोणाच्या नावावर या इतिहासात नाहीत.

तर शिक्षण अश्या प्रकारच्या कर्तुत्वाला, विकासाला, Problem Solving ला तुमच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमतेला, त्या कसल्याही असोत, जोपासणारं हवं. ते करता करता त्याचे कौशल्य प्राप्त करणं ही जीवनामध्ये चांगली संधी असते.

आजची शिक्षण व्यवस्था ते होऊ देत नाही. मग अश्या Institutional Education ऐवजी De-Schooling बरं. तर शाळा आणि स्वतःच्या बाहेर सरळ जीवनात कर्तव्य आणि कर्म करता करता शिक्षण घेता येईल का? तर जरूर घेता येईल. हेच नई तालीम ही शिक्षण प्रक्रिया म्हणते. म्हणून नई तालीम ही शाळा नाही तर शिक्षण प्रक्रिया आहे.

Thursday 15 September 2022

क्षमता आणि काम

आपल्या जीवनाचा अतिशय मोठा भाग व्यापणारं आपलं 'काम' नेमकं कोणतं हे कसं ठरवायचं?
'इंटरेस्ट' हे काम निवडण्याचं योग्य निकष आहे का?
मी माझ्या क्षमता कशा ओळखू?

असे अनेक प्रश्न तरुण - तरुणींना पडत असतात. निर्माणच्या शिबिरार्थींसोबत संवाद साधताना डॉ. अभय बंग यांनी या प्रश्नांचा उलगडा केला. खालील लेख हा त्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


मराठी मध्ये एक म्हण आहे - ''दुरून डोंगर साजरा''. एक काम करताना दुसरं काम फार चांगलं वाटतं. दुसऱ्या कामावर गेला रे गेला की अजून तिसरं कोणतं तरी काम चांगलं वाटतं. कारण करत असलेल्या कामाची अडचण वाटते आणि अडचण वाटली की माणसाला inviting वाटायला लागतं. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार विषय निवडावा, कामाचं क्षेत्र निवडावं. आपला इंटरेस्ट मात्र फार फसवा असतो. लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात असतो - तर फेसबुक, व्हॉट्सऍप, सेल्फी. इच्छा व इंटरेस्ट हे घातक मार्गदर्शक असतात. शिवाय माणसाचं मन सहसा शॉर्टकट्स, तात्काळ सुख बघतं. ते म्हणतं की तिथे काही करावं लागणार नाही, प्रयत्न करावे लागणार नाहीत, काही अडचण नसेल, इंटरनेटवर वेळ घालवता येईल. अशा परिस्थितीत इंटरेस्टच्या मागे धावणाऱ्या मनाचं ऐकावं का? अंतरमन वेगळं आहे - ते आतून खोलवरून तुम्हाला मार्गदर्शन करतं. एक सुंदर वाक्य आहे - 'If things are going easy be warned you must be descending down'. आपल्याला खाली घसरतांना, घसरगुंडीहून घसरताना किती छान वाटतं! तेच पायऱ्या चढताना किती धाप लागते! कोणालाही पायऱ्या चढायला आवडत नाही, घसरताना खूप छान वाटतं.


काम ठरवण्याचे निकष
त्यामुळे काम ठरवण्यासाठी इंटरेस्ट ही कसोटी लावू नये. जे जास्त वंचित आहेत त्यांना याची गरज आहे का? - हा झाला बाह्य सामाजिक निकष. मी जे करतो आहे त्या विषयाची, त्या कामाची समाजाला कितपत गरज आहे यालाच विनोबांनी म्हटलंय ''स्वधर्म''. माझ्या समाजाची जी गरज आहे ते तर पूर्ण करणं माझे कर्तव्यच आहे. तर एक निकष लागतो समाजाला याची किती गरज आहे हा. त्याच्यामध्ये गांधींनी आपल्याला अतिशय चांगली कसोटी सांगितलेली आहे. गांधीजी म्हणाले होते - ''तुमच्या मनात जेव्हा काय करावे अशी शंका येईल, तेव्हा तुम्ही पाहिलेली सर्वांत गरीब, हतबल व्यक्ती आठवून विचार करा की तुमच्या निर्णयाने त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो का! तेव्हा तुमच्या शंकांचं निरसन होईल.”

ही कसोटी फार सुंदर आहे. ही कसोटी abstract नाही. ती नेमकी तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीच्या रूपात बोलते. तर ही कसोटी लावून विचार करा की जे काम तुम्ही करत आहात, त्यामुळे या माणसाला काही फायदा होतो आहे का? दुसरं म्हणजे असं की त्या क्षेत्रातील टॅलेंट किंवा क्षमता असणं. तर एक - समाजाची गरज कशामध्ये आहे? त्यासाठी ही गांधीजींची कसोटी आणि दुसरं म्हणजे माझ्यामध्ये त्याची क्षमता असणं. जर हे कळत नसेल की माझी क्षमता कशात आहे तर ३-४ प्रकारच्या गोष्टी करून बघाव्यात. त्यातून जीवन हळूहळू आपल्याला दाखवतं की आपल्याला काय चांगलं जमतं. समाजाची गरज आणि माझी क्षमता यांचं चांगलं कॉम्बिनेशन कुठे आहे तिथे आपला कर्तव्यबोध असतो.


आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात?
दोन उदाहरणे पाहू. एक वेट-लिफ्टर असतो. वेट-लिफ्टिंग करतो. त्याला जर असा प्रश्न पडला की माझी क्षमता किती वजन उचलायची आहे तर त्याला ती कशी कळेल? अर्थात, वजन उचलून. तसंच आपली क्षमता किती आहे हे कळण्यासाठी एकच मार्ग आहे - त्या प्रश्नाला भिडून पाहणे – ‘Go where the problems are’. आता तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमचं पाहिलं प्राधान्य काय? IIT मध्ये मिळालेली ऍडमिशन पूर्ण करणे हे तुमचं पाहिलं प्राधान्य आहे का? की आपल्याला क्षमता आहेत की नाही हे तपासून घेणं तुमचं पाहिलं प्राधान्य आहे हे ठरवलं पाहिजे.

आता दुसरं उदाहरण पाहू. तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर गेलात. अनेक गाड्या तयार आहेत. आता लवकरच सुटणार आहेत. एका गाडीमध्ये छान जागा रिकामी आहे, डब्बा रिकामा आहे, सुंदर आहे, नरम आहे, स्वच्छ आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये थोडी गर्दी आहे. तुम्ही कोणत्या गाडीत बसायचे ठरवाल? ती गाडी कुठे जाणार आहे व तुम्हाला कुठे जायचं आहे यावर ते अवलंबून आहे. सीट रिकामी आहे IIT, MTECH, PG साठी. ती तुम्ही नाही घेतलीत तर त्या सीटचं काय होईल ते IIT वाले बघून घेतील. त्यांना दुसरा कोणीतरी सापडेलच. पण तुम्हला तिथे जायचं नसेल आणि चुकून त्या सीटवर बसलात तर काय होईल? दुसरीकडे पोहोचाल. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला आणि सिट रिकामी आहे मद्रासला जाण्यासाठी तर बसाल का? नाही.

तुम्हाला पोहोचायचं कुठे ते पहिलं ठरवलं पाहिजे. कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते हे त्या डब्यासारखं आहे. सीट मिळते आहे पण मला तिथे जायचं आहे का? जायचं असेल तर संधी घ्यावी. पण मी म्हणेन की त्याची स्पष्टता मिळवावी. अन्यथा आयुष्यातील २ वर्षे वाया जातील. ‘Every year of education conditions you.’ एकदा समजा तुम्ही मिळत असलेल्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मग पुढे क्षमतांचा विचार करायचा ठरवलात तर खूप उशीर झाला असेल. कारण ते २ वर्ष तुम्हाला Condition करतात. २ वर्षांनी निर्णय घेणं तुम्हाला जास्त कठीण होईल. तेव्हा तुम्ही विचार कराल - ‘MSc. / M.Tech. झालं - आता काही न करणे म्हणजे किती वाईट’! तेव्हा तुमचं ऍडमिशन तुमचं भवितव्य ठरवेल. पण तुमचं भवितव्य Accident of Admission नका बनू देऊ. तुम्हाला कशामध्ये क्षमता आहे आणि समाजामध्ये कशाची गरज आहे याच्यावर भवितव्य ठरवा. आणि मग त्यानुसार ऍडमिशन निवडा. हा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला काय क्षमता मिळवायच्या आहेत, कोणती कौशल्ये मिळवायची आहेत ते ठरवा.

तर मी म्हणेन की आधी जो प्रश्न सोडवायचा आहे तो थोडा समजून घ्यावा. आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि मग जर गरज पडली काही विविध गोष्टी शिकायची तर जरूर मग IIT असोत किंवा दुसरं काही असो, जिथे जाण्याची गरज आहे तिथे गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. क्षमता पूर्ण प्राप्त केल्या पाहिजेत. पण पहिलं या प्रश्नचं उत्तर शोधून घेतलं पाहिजे की ‘Is it where I want to go?’ ती गाडी नाही तर मला भलतीकडेच पोहोचवायची. शेवटी रेल्वे स्टेशनवर गेलेला एक अनाडी प्रवासीदेखील योग्य गाडी निवडण्याचा शहाणपणा दाखवतो. पण शिक्षणाचा मार्ग निवडताना आपण सगळेच तो शहाणपणा का दाखवत नाही?



Tuesday 6 September 2022

'मी' नावाचा गुंता

 

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सातत्याने व वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे अनेक कारणांसाठी आवश्यक ठरते. ‘मी’पणाच्या गुंत्यात मी अडकलो आहे का? – हे तपासून पाहणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण. पण नक्की काय व कसा असतो हा ‘मी’पणाचा गुंता?

निर्माणच्या एका शिबिरात डॉ. अभय बंग यांनी उलगडला 'मी' नावाचा गुंता! खालील लेख हा डॉ. अभय बंग यांनी शिबिरार्थींसोबत साधलेल्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


माझा रस कशात आहे?

जरी आपण एखादा प्रश्न सोडवतोय असं आपल्याला वाटत असलं तरी अखेरीस आपण वेगळ्या समस्येशी लढत असतो. ती समस्या आहे आपण स्वतः - ‘I is the problem. आपण कितीही म्हटलं की समाजाचे प्रश्न सोडवतोय तरीही आपल्याला त्या प्रश्नात रस नसतो. आपल्याला रस असतो स्वतःमध्ये. आणि आपला - ‘स्व’चा गुंता सोडवण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्या बाह्य समस्येवर फार उर्जा लावत नाही. आपलं सतत सुरू असतं – ‘मी इथे असायला पाहिजे होतं की अजून कुठे असायला पाहिजे होतं?’ असं सारखं  ‘मी.. मी.. मी..’ सुरू असतं.

प्राधान्य कशाला – सामाजिक प्रश्न की स्वतःचा प्रश्न?

पाण्यातल्या शक्तिशाली भवऱ्यांचे इतके सामर्थ्य असते की ते अख्ख्या जहाजाला गिळून घेतात. परंतु, ह्या प्रचंड फिरणाऱ्या भवऱ्यांच्या मध्यभागी काही नसतं. भवऱ्याच्या गतीमुळे पाणी फिरतं आणि मध्यभागी एक  ‘Illusion’ निर्माण होतं. मनुष्याचं मन हे भवऱ्यासारखं असतं. ते एका ‘मी’ च्या भ्रमाभोवती फिरत असतं. आपण बहुतेकजण जेव्हा समाजातील किंवा वास्तवातील कामाला भिडतो, तेव्हा आपण त्या समस्येला भिडत नसतो. आपण मानसिकदृष्ट्या पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो हा की बहुतांश लोकांच्या बाबतीत काम सुरू करण्यापूर्वीच पुढचे निर्णय झालेले असतात. ‘इथे एक वर्ष करुन मग मास्टर्सला प्रयत्न करेन. मग ते मास्टर्स कशात करायचं?’ असे प्रश्न आधीपासून पडतात. त्यामुळे आपण त्या समस्येला गांभीर्याने भिडतही नाही. म्हणून फार काही त्यातून घडत नाही. सामाजिक काम करायला नाही, तर आपण स्वतःचा प्रश्न सोडवायला जात असतो. आपल्याला कशात रस आहे ते पाहत असतो. पण त्याला काही आपला दोष नाही. शिक्षण व्यवस्था, करिअर, कुटुंब, आई-वडील, सगळे असंच घडवतात आपल्याला. म्हणून आपण त्या सापळ्यात पडलेलो असतो. पदव्युत्तर शिक्षण कुठून घ्यायचं हे शोधण्यात उर्जा खर्ची पडत जाते आणि म्हणून मूळ समस्येबाबत तसं ठोस काही घडत नाही. त्यतून असा प्रश्नही निर्माण होतो - समस्या सोडवयला जे शिक्षण पाहिजे ते त्या समस्येवर काम करतानाच नाही घेऊ शकत का? पण सहसा ते करायचं धाडस कोणी करत नाही. बहुतेकांना MTech, MD, PHD हेच आकर्षित करतात.


दिशाहीन क्षमता विकास काय कामाचा?  

एके वर्षी मी २ ऑक्टोबरला हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी उपस्थतीत होतो. तिथे श्रोत्यांमध्ये जवळपास १०० भारतीय विद्यार्थी होते. त्यातही बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी. त्यांना भेटून 'तुम्ही काय करणार?' असे विचारले असता प्रत्येकाचे उत्तर – ‘माहित नाही, कोणीतरी जॉब देईल, कोणीतरी डेटा ऍनॅलिसिस करायचे काम देईल, कोणीतरी संशोधनात समाविष्ट करेल, आमचे शिक्षक काहीतरी प्रोजेक्ट देतील’ - असेच काहीसे होते. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, जगातील उत्कृष्ट व मानांकित विद्यापीठांमधील हुशार विद्यार्थ्यांची ही उत्तरे होती. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था एखाद्या समस्येला तोंड देण्यासाठी लागणारे – Confidence आणि Competence – दोन्ही देत नाही. शैक्षणिक व्यवस्थाच विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. मग ती असुरक्षितता पदवी प्राप्त करूनदेखील पुरेसं ज्ञान नसण्याची असो किंवा थेट एखाद्या प्रश्नाला भिडून काम करत ज्ञान प्राप्त करणे मारक ठरण्याची भीती असो. म्हणून मग क्षमता वाढवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय स्वीकारला जातो. मुळात उच्च शिक्षण घेणे व क्षमता वाढवणे गैर नाही. पण क्षमता वाढवून कोणत्या समस्येवर काम करणार ते ठरवणे गरजेचे असते. अनेकांना कुठे जायचं हे ठाऊक नसतानाच गाडीत बसायची घाई झालेली असते. जर आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या निर्णयामुळे वाया घालवायची नसतील तर मी म्हणेन की जीवनातील समस्यांना सामोरे जा. आणि तेही पुढील शिक्षणाचा विचार न करता. ती समस्या सोडवायचा प्रयत्न करा.

चुकाल तेव्हा शिकाल

समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना अडचणी येतील. कारण सुरवातीला Competence कमी पडू शकतो. पण ती तर सुरुवातच असते. आज माझं वय ६७ आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी एकही काम असं केलं नाही ज्यात मी चुकलो नाही. ५० वर्षांच्या अनुभवानंतरही जेव्हा मी एखादं काम करतो तेव्हा पहिले मी चुकतोच. चुकतो आणि मग त्यातून मी शिकतो.

गांधीजींनी लिहिलेल्या एका पुस्तकातील प्रसंग सांगतो. वर्ष होतं १९४६. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना गांधीजींच्या मनात प्रश्न निर्माण झाले - देशाच्या आरोग्याचं काय? खेड्यापाढ्यामध्ये आरोग्याचं काय होईल? गांधीजी त्या प्रश्नाच्या मागे लागले. पुण्याला मेहेता नावाचे एक डॉक्टर होते. Naturopathy करायचे. गांधीजी स्वतःचा उपचार इथे करायचे. तिथेच एक संस्था स्थापन करून गांधीजींनी ठरवलं की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेच्या प्रश्नावर काम करायचं. प्रश्नाची व्याप्ती समजून ते स्वतः कामाला लागले. पण १५ दिवस काम केल्यावर त्यांनी एक वाक्य लिहिलं - ''I was a fool''. त्यांचं म्हणणं होतं की इतके दिवस काम केल्यावरदेखील त्यांना समजलं नाही की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेवर काम करण्यासाठी पुण्यात न राहता खेड्यात जाणे आवश्यक आहे. त्यांनी हे सर्वांसमक्ष मान्य केलं. गांधीजी ही चूक करू शकतात, मग आपण तर फार छोटे आहोत. म्हणून अपयशी होणं, गोंधळून जाणं यामुळे वाईट वाटून घेण्याची गरज नसते. सामाजिक समस्या सोडवणं खूप सोपं असतं तर आपली गरजच पडली नसती.                

कामातूनच होते ‘स्व’ ची ओळख

‘मला तो प्रश्न किती भिडला? मला तो प्रश्न किती हलवतो? मी त्यावर अवलंबून आहे का? की आता सर्व सोडून पळू आणि विद्यापीठाचा आसरा घेऊ? की जीवनाचा विद्यापीठामध्येच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू?’ – असे अनेक प्रश्न पडत असतात. आज कितीही अंधार असला तरी उद्या सूर्य उगवणार आहे असा आंतरिक विश्वास असणं महत्त्वाचं असतं. म्हणून SEARCH या आमच्या संस्थेचा लोगो जर पाहिला असेल तर अंधारामध्ये आडवी-तिडवी वाट आहे, काटेरी आहे, फार काही रुळलेली, मांडलेली नाही. तो राजमार्ग नाही. पण ती अंधारलेली वाट सोडण्यासाठी, एक नवी वाट शोधण्यासाठी, एक विश्वास पाहिजे. तो विश्वास पाहिजे निर्माण कसा करावा? तो टीकवून कसा ठेवावा? जेव्हा ठेच लागते, गोंधळलेलं वाटत असेल, तेव्हा तो विश्वास कसा निर्माण करावा? मी असं मानतो की आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळलं आणि तो जर नुसता भौतिक खेळ नसेल तर त्या सोबत विश्वास येतो. तो विश्वास आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला भाग पाडतो – ‘या कर्तव्याशिवाय मला गत्यंतर काय? – If not this, then what else?’ आपल्याला या ठेचा खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जितक्या ठेचा खाऊ तेवढेच एक पाऊल पुढे जात राहू. हाच विश्वास निर्माण होण्याचं दुसरं कारण असू शकतं प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केलेल्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं वाचन. ते प्रेरणादायी असतं. इथे गांधीजींच्या आयुष्यातील एका प्रसंगांचे उदाहरण घेता येईल. गांधीजींचे वडील मरण पावले होते व इतर भावंडे जास्त शिकले नव्हते. वकिली करून गांधीजीनी घरी सुख व समृद्धी आणावी म्हणून कर्ज काढून त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं गेलं. शिकून भारतात परत आल्यावर मात्र गांधीजींना आपली वकिली चालत नसल्याचा अनुभव आला. १ – २ वर्षे प्रयत्न करून मग गांधीजी दक्षिण आफ्रिकेत एका वकिलाचे सहकारी म्हणून काम करू लागले. खरंतर, ब्रिटनमधील बॅरिस्टरची पदवी ही मोठी पदवी मानली जायची, अगदी आजच्या काळात IIT सारखी. पण पदवी असूनदेखील येत काही नाही हे लक्षात येताच गांधीजी आफ्रिकेत गेले. तिथे त्यांच्यावर एका मागे एक अपमानाचे प्रसंग कोसळले. Pietermaritzburg या ठिकाणी तर त्यांना ट्रेनमधून फेकून दिलं गेलं. अपमानित मनस्थितीत ते तिथेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्रभर कुडकुडत राहीले. ब्रिटनमध्ये त्यांनी असा भेदभाव पहिला नव्ह्ता. त्या क्षणी भारताचं तिकीट काढून घरी परत जावं असं वाटत असल्याचं त्यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केलं आहे. ‘किती कठीण आहे अवस्था! इथे लोक अपमान करतात, वाईट वागतात! मी काय करू? पळून जाऊ का परत भारतात?’, असं मनात विचारांचं काहूर सुरु होतं. पण गांधीजी तिथेच थांबले. त्यांना तिथे स्वतःचे ध्येय सापडलं. स्वतःप्रमाणे इतर भारतीयांचाही जो अपमान होत आहे त्यासाठी न्याय मिळवण्याचा निश्चय त्यांनी केला.

मी स्वतः Pietermaritzburg येथे जाऊन आलो आहे. माझ्यासाठी ते एक तीर्थक्षेत्रच आहे. गांधीजींच्या जीवनातील त्या क्रांतिकारी दिवसाला जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रध्यक्ष होते. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व ओळखून त्यांनी त्या रेल्वे स्थानकात गांधीजींचा पुतळा आणि एक वेटिंग रूम तयार करून घेतली. १९९६ साली त्या पुतळ्याचे अनावरण करताना मंडेला म्हणाले होते, “गांधी नावाचा बॅरिस्टर भारताने आम्हाला पाठवला आणि २० वर्षांनी आम्ही भारताला एक महात्मा परत पाठवला.” गांधीजींनी अविकसित देशांतील जनतेच्या हाती वसाहतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक शस्त्र दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तो मोहनदास करमचंद गांधी नावाचा स्थित्यंतराचा क्षण आपल्याही जीवनात येतो. जेव्हा आपल्याला पाणी प्रश्न कठीण वाटतो, जेव्हा आरोग्य सेवा कशी द्यायची हे कळत नसते, जेव्हा एखादा ‘Governance Issue’ सोडवता येत नसतो, तेव्हा तो आपल्या जीवनातला ‘प्लॅटफॉर्म’ असतो. त्या क्षणी आपण काय निर्णय घेतो यावर आयुष्याची गाडी पुढे कुठे जाणार आहे हे ठरतं. सुदैवाने, मोठ्या संकटांतून जावं लागणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असतं. त्या उदाहरणांना भेट दिली पाहिजे. कठीण परिस्थतीत अनेकदा शैक्षणिक व्यवस्थेचा आसरादेखील घ्यावासा वाटतो. विद्यापीठांनी जणू विद्यार्थ्यांना प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं – When you face a problem come back to us for higher education. भीती वाटली की एखादं बाळ आईच्या कुशीत जात तसंच काहीसं असतं हे. पण एका टप्प्यानंतर आईकडे जाता येत नसतं. आपल्यासमोरील समस्या आपल्यालाच सोडवावी लागते. तो प्रश्न सोडवताना आपल्यातलं Unknown हे Unfold होत असतं. ते झाकण दूर होताना त्रास होतो. ‘माझ्यात काय क्षमता आहेत? मी काय करू शकतो?’ – या प्रश्नांना सामोरे जाताना त्रास होतो. पण ते झाकण जर आपण दूर करू शकलो तर त्या समस्येला भिडता-भिडता आपल्याला स्वतःचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूती – ‘मी कोण आहे? कसा आहे? माझ्यात क्षमता काय आहे?’ इतरवेळी आपण केवळ अंदाज बांधत असतो. प्रत्यक्ष माहिती नसतं. सध्याची पिढी ‘सेल्फी’मध्ये अडकून पडली आहे. पण ‘सेल्फ’ काय आहे? ‘तू कोण आहेस?’असं विचारलं तर तरुणतरुणी गोंधळून जातात. ‘Self is like a Ray of Light – the ray is invisible when it passes but it becomes visible when it falls on an obstacle.' बस आपणही असेच आहोत. एका खोलीत बसून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होत नसते. एखाद्या आव्हानाला धडक दिल्यावरच आपल्याला स्वतःच्या क्षमता, मर्यादा व आत्मविश्वासाची जाणीव होते. स्वतःचे सगळे भ्रम दूर होतात. 'स्व' ची ओळख होते. म्हणून ‘सेल्फ’ काय आहे हे समजून घेण्यासाठी सेल्फी घेऊ नका. थेट एखाद्या प्रश्नाला भिडा.



एक जन्म तुमचा आईच्या पोटात झाला. दुसरा जन्म तुमचा तुम्ही स्वतः करणार आहात. जेव्हा तुम्ही समस्येला भिडाल, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. तेव्हा तुम्हाला स्वतःचा साक्षात्कार होईल – Who  am I, What am I & Whose am I? या तीनही प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. मग या दुसऱ्या जन्माचं बाळंतपण स्वतः करावं लागेल. स्वतःच स्वतःला जन्म द्यावा लागेल.