'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 5 June 2024

सृष्टी आणि युवांची जीवनदृष्टी

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन. खरंतर आता अशी परिस्थिती आहे की वर्षातील कुठलातरी एक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून निर्देशित करुन भागण्यासारखा नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकच दिवस, त्यातील जगणे, नागरिक – ग्राहक – उत्पादक यापैकी कुठल्याही भूमिकेमधील आपले निर्णय आणि वर्तन, हे सर्वच पर्यावरणीयदृष्ट्या सुसंगत कसे असेल, कमीत कमी नुकसानदायक आणि शक्यतो पर्यावरण संवर्धन करणारे कसे असेल याचा विचार करणे हे अत्यावश्यक झाले आहे.

निर्माणच्या निमित्ताने विविध तरुण-तरुणींशी झालेल्या संवादात आम्हाला असे आढळून आले आहे की ‘ग्लोबल वॉर्मिंग’ बाबतीत अनेक युवांनी काहीना काही ऐकले असते, शाळेत थोडेफार वाचले असते. याबद्दल अगदीच अनभिज्ञ असणारे किंवा ‘क्लायमेट चेंज वगैरे झूट है’ असे म्हणणारे सहसा कोणी सापडत नाही. त्याबाबतीत भारतातील परिस्थिती अमेरिकेपेक्षा बरी आहे असे म्हणायला हवे. पण आपले युवा क्लायमेट चेंजविषयी निरक्षर जरी नसले तरी बहुतेकांची समज ही साधारण इयत्ता आठवीच्या दर्जाची असते. कारण त्यानंतर फारसे कोणी काही वाचलेच नसते. या विषयाचे गांभीर्य, त्याची व्याप्ती आणि तीव्रता, त्यासंबंधीचे विज्ञान व फॅक्टस, त्वरित कृतीची निकड, कृतीच्या विविध शक्यता व पर्याय, माझ्या वैयक्तिक जगण्यातील निर्णयांची पर्यावरणीय किंमत इ. बद्दल अनेकांना फारच जुजबी माहिती असते. २१व्या शतकातील आपल्या सगळ्यांच्याच जगण्याला क्लायमेट चेंजचा आयाम हा टाळून चालण्यासारखा नाही. त्यादृष्टीने, विशेषत: युवांचा विचार सुरू व्हावा म्हणून काही मुद्दे:

१. युवांनी सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की क्लायमेट चेंजच्या विषयाचे सर्वात जास्त महत्त्व हे, प्रौढ अथवा वृद्ध व्यक्तींपेक्षाही अधिक, तरुणांसाठी आहे. असे समजा की एक आगगाडी चालली आहे आणि पुढे दूरवर एक दरी आहे. जे लोक अधेमध्येच गाडीतून उतरणार आहेत त्यांना गाडीचे पुढे जाऊन काय होणार याची फार फिकीर असेलच असे नाही. पण जे लोक गाडी दरीत कोसळायची वेळ येईल तोपर्यंत गाडीत बसून असणार आहेत त्यांच्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गाडीची सध्याची दिशा काय, वेग काय, तिला ब्रेक्स कसे लावता येतील, स्टीअरिंग व्हीलद्वारे दिशा कशी बदलवता येईल हे सर्व केवळ काल्पनिक नाहीत तर अस्तित्वाशी घट्टपणे निगडित असे प्रश्न आहेत. आणि यांची उत्तरे शोधायची सर्वाधिक गरज, जबाबदारी आणि संधी ही युवांकडेच आहे. परिस्थितीचे हे गांभीर्य आणि निकड ध्यानात घेऊन त्यानुसार आपल्या क्षमतांना आणि ऊर्जेला ध्येयाकडे केंद्रित करणे हे माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी अनिवार्य आहे.

२. क्लायमेट चेंज बाबतचे नविनतम विज्ञान समजून घेत राहणे आवश्यक आहे. ‘ऑल इज वेल सिनारिओज’ किंवा ‘डूम्स डे सिनारिओज’ या दोन्हींच्या पलीकडे जाऊन नेमके फॅक्टस काय आहेत, उत्तरांच्या संभावना काय आहेत, त्यांची परिणामकारकता व मर्यादा काय आहेत, तसेच संबंधित राजकारण आणि अर्थकारण या विषयी समज विकसित होणे गरजेचे आहे. अगदी वैज्ञानिक जर्नल्स मध्ये प्रकाशित होणारे शोधनिबंध वाचणे कदाचित सगळ्यांना शक्य होणार नाही. पण अनेक चांगली पुस्तके आणि डॉक्युमेंटरीज आहेत ज्या द्वारे अभ्यासाला सुरुवात करता येईल. मराठीमध्ये अतुल देऊळगावकर यांनी या विषयाबाबतीत विपुल लेखन केले आहे. नुकतेच ‘सृष्टिधर्म’ हे कमलाकर साधले यांचे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोबतच इंग्रजीमधील काही सुंदर पुस्तके सुचवायची झाली तर ‘द अनइनहॅबिटेबल अर्थ’ हे डेविड वॉलेस-वेल्स यांचे अप्रतिम पुस्तक, बिल गेट्सचे ‘हाऊ टू अव्हॉईड अ क्लायमेट डिझास्टर’, रामचंद्र गुहा यांचे ‘हाऊ मच शुड अ पर्सन कंझ्यूम’, वक्लाव्ह स्मिल यांचे ‘नंबर्स डोन्ट लाय’ व ‘हाऊ द वर्ल्ड रिअली वर्क्स’, एलिझाबेथ कोलबर्ट यांचे ‘अंडर अ व्हाईट स्काय’, डिटर हेल्म यांचे ‘नेट झिरो’ या काही पुस्तकांचे अगदी जरुर वाचन करावे. सोबतच अल गोर यांची ‘ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ’, लिओनार्दो डि कॅप्रिओची ‘बिफोर द फ्लड’, डेव्हिड अटेनबरो यांची ‘अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट’, यान आर्थस-बर्ट्रन्ड यांची ‘होम’ अशा काही अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरीज देखील बघता येतील.

३. उत्साहाला मोजमापाची आणि सातत्याची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा दर वर्षी पावसाळ्यात त्याच त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारे अनेक उत्साही युवक गट आपण बघत असतो. पण केलेल्या उपक्रमांचे नेमके फलित काय, किती झाडे जगली, त्यांची वाढ कशी आहे, त्यांना योग्य पाणी व खत मिळते आहे का, इ. बाबी बघत राहणे व जरुर तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. या पलीकडे जाऊन ज्या कुठल्या विद्याशाखेमध्ये आपण शिक्षण घेत असू त्याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे, इंटर्नशिप, प्रोजेक्टस अथवा थिसिस करतांना क्लायमेट चेंजच्या मुद्द्याला समर्पक असे विषय निवडता येतील का हे शोधता येईल. यातून पर्यावरण बदलाचा प्रश्न हा निव्वळ छंद किंवा प्रासंगिक सेवेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे एक व्यापक, गुंतागुंतीची, गहन समस्या सोडविण्याचा सर्जनक्षम अनुभव म्हणून बघण्याची सवय लागेल.

४. काही दिवसांपूर्वी RIBA म्हणजेच रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे माजी अध्यक्ष श्री. सुनंद प्रसाद हे आमच्याकडे गडचिरोलीला आले होते. पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या ग्लोबल वार्मिंगविषयी असलेली तोकडी कृतीशीलता बघून ते फार अस्वस्थ होते. त्यांच्यामते सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत तिकडे बरीच जागरूकता निर्माण झाली होती. पण त्यानंतर मात्र तेल कंपन्या आणि इतर कॉर्पोरेट हितसंबंध यांनी अगदी सुनियोजितपणे मोहीम उघडून पर्यावरणाच्या विषयाबाबत आणि त्यावर काम करत असलेल्या वैज्ञानिक व कार्यकर्त्यांविषयी संशयाचे व अविश्वासाचे वातावरण पैदा केले. त्यामुळे या चळवळीची मोठी पीछेहाट आजच्या स्थितीत झाली आहे असे सुनंद यांचे म्हणणे होते. भारतात देखील असे होऊ घातले आहे का हे आपण काळजीपूर्वक तपासात राहायला हवे. पर्यावरणीय कृती किंवा पर्यावरणरक्षणाच्या मुद्द्यांना गांभीर्याने घेणे हे जणू विकास-विरोधी आहे, विकास हवा असेल तर थोडा फार निसर्गाचा नाश अटळ आहे असे आजकाल बर्‍याचदा भासवले जाते. युवांना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की असे व्हायची गरज नसून, सुंदर निसर्ग आणि निरोगी पर्यावरण हे खरेतर सम्यक विकासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, वैशिष्ट्य आहे. त्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प, योजना वा कार्यपद्धती या उलट मुळात विकास-विरोधी आहेत. निवडणुकांमध्ये मत देताना देखील धर्म, जात अशा फूटीच्या राजकारणाला बळी न पडता पर्यावरणीय कृती ही ज्यांच्या विचारांमध्ये आणि जाहीरनाम्यात अग्रस्थानी आहे अशांना मत देण्याची आता वेळ आली आहे.


५. माझ्या दैनंदिन जगण्यात मी अधिकाधिक पर्यावरण सुसंगत कसा जगू शकतो? तरुण-तरुणी घरी, हॉस्टेल, फ्लॅट्स, कॉलेज कॅम्पस असे जिथे कुठे असतील तिथे विचारपूर्वक कृती करू शकतात आणि आपली एन्व्हायर्नमेंटल फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकतात. दुर्दैवाने अनेक ठिकाणी असे चित्र पाहायला दिसते की जिथे कॉलेज प्रशासनावरील आपला राग व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी सुट्टीत घरी जातांना देखील हॉस्टेल रूम्सचे सर्व दिवे व पंखे मुद्दामहून सुरु ठेवून जातात, काही ठिकाणी गच्चीत असलेले सोलर पॅनल्स उगाच मस्ती म्हणून फोडले जातात. असले बेजबाबदार वर्तन योग्य नाही हे युवांना उमजले पाहिजे. हॉस्टेलच्या पार्किंगमध्ये अनेकविध आकर्षक (पण वाईट मायलेज असलेल्या) बाईक्स उभ्या असलेल्या दिसतात. सहसा विद्यार्थी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेला की पालकांकडून कौतुकाची भेट म्हणून या घेतलेल्या असतात. त्यांचा वापर बहुतांश वेळेस एक किलोमीटरच्या परीघात कॉलेजच्या आवारात फिरण्यासाठी होतो. हे टाळून या ऐवजी सायकलने अथवा पायी जाणे हे आता ‘कूल’ समजले पाहिजे. नाहीतर पृथ्वी ‘हॉट’ होणार आहे!

६. सरतेशेवटी हे महत्त्वाचे सत्य लक्षात घ्यायला हवे की सृष्टीचा प्रश्न हा अनेक बाबतीत युवांच्या जीवनदृष्टीशी निगडित आहे. ‘ज्यादा से ज्यादा पैसा कमाओ और चाहे जो ऐष करो’ अशी चंगळवाद वाढवणारी प्रवृत्ती ही पर्यावरणविघातक तर आहेच पण सोबतच ‘नवनवीन गोष्टी, सेवा, अनुभवांवर पैसा खर्च करणारा एक ग्राहक’ अशीच जर युवांकडे बघण्याची (आणि युवांची स्वत:कडे बघण्याची) दृष्टी प्रबळ होत असेल तर ती एक मोठी शोकांतिका आहे. ‘बेपर्वा उपभोग घेणारा’ यापलीकडेही माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे काय याचा प्रामाणिक शोध युवांनी घेण्याची गरज आहे. निसर्गापासून आणि आपल्या सामुदायिक मुळांपासून फारकत झाल्याने आलेला एकटेपणा कसा सोसावा हे न कळल्याने अनेक युवा वाढीव उपभोगवादाकडे वळतात. उठसुठ ऍमेझॉन, स्विगीवरुन येणारे पार्सल्स हे त्याचेच द्योतक आहेत. दरवर्षी जगात होणार्‍या मानवनिर्मित कार्बन एमिशन्सच्या 8% हे सिमेंटच्या प्रॉडक्शन मधून होते. मग मी गरज नसतांनाही नवीन घर बांधायलाच हवे का? दोन, तीन, चार फ्लॅट्स विकत घ्यायलाच हवेत का? नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी असे सांगतात की आपली मिळकत जर 10% नी वाढली तर आपले कार्बन उत्सर्जन 9% ने वाढते. असे होणार नाही अशा पद्धतीने त्या वाढीव मिळकतीचा उपयोग युवा मित्र-मैत्रिणींना करता येईल का?


2021 ते 2031 हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे तसेच ते ‘अपरिवर्तनीय क्लायमेट चेंजला रोखण्याचे’ देखील (शेवटचे) दशक असणार आहे. भारतीय युवा या आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहेत का?

अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.




Saturday 1 June 2024

युवांचा अर्थपूर्ण करियरचा शोध - अभिमन्यू ते अर्जुन व्हाया सिद्धार्थ


युवांपुढच्या व त्यांच्या पालकांच्या मनातील विविध प्रश्नांपैकी त्यांना सगळ्यात कळीचा वाटणारा एक प्रश्न म्हणजे युवांचे करियर. बारावीनंतर काय करावे, कुठल्या कोर्सला प्रवेश घ्यावा, कशात ‘स्कोप’ आहे, इ. बाबत माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याविषयी बोलणे मी टाळणार आहे. करियर म्हणजे केवळ कुठली डिग्री करावी इतका मर्यादित मुद्दा नसून मला नेमके जीवनात काय करायचे आहे याचा विचार आहे. प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या ‘वर्क कॉन्ट्रिब्यूट्स टू साल्व्हेशन’ या धर्तीवर आपले करियर म्हणजे समाजाशी (काहींसाठी देवाशी) असलेली आपली नाळ. जीवनातला सर्वात अधिक वेळ ज्या गोष्टीत जाणार, ज्यातून समाजावर आपला काहीएक परिणाम होणार, अपत्यांव्यतिरिक्त काही ‘लेगसी’ राहणार आणि पृथ्वीतलावरील मर्यादित वास्तव्यादरम्यान व्यक्तिश: काही केल्याचे आपल्याला समाधान मिळणार अशी बाब म्हणजे करियर! अशा करियर निवडीसाठीच्या निकषांचा आणि करियरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये युवांची मनोभूमिका कशी असावी याबाबतचा काही ऊहापोह मी करणार आहे.

1. शिक्षणाने काय साध्य व्हावे याबाबत विनोबांनी म्हटले आहे आर्थिक, बौद्धिक व मानसिक असे त्रिविध स्वावलंबन! सर्वात पहिली बाब म्हणजे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नये म्हणून प्रत्येक तरुणाने आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सध्याचा १०% बेरोजगारीचा दर चिंताजनक आहेच. पण काम मिळत नाही म्हणून बेरोजगार असणार्‍यांसोबतच वर्षानुवर्षे एका डिग्रीनंतर दुसरी डिग्री, एका परीक्षेनंतर दुसरी (स्पर्धा) परीक्षा अशा न थांबणार्‍या ट्रेडमिलवर आपले अनेक युवा आहेत हे देखील काळजी करायला लावणारे वास्तव आहे. म्हणूनच निव्वळ पदव्यांच्या मागे न लागता काही कौशल्य अंगी बाणवणे आणि लवकरात लवकर स्वत:च्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी स्वयंपूर्ण होणे ही युवांच्या करियर वाटेवरील प्राधान्याची बाब असावी. पालकांनीही त्यांच्या पाल्याला स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहन द्यावे, ते आवश्यक करावे.


2. दुसरी बाब म्हणजे त्याची बुद्धी स्वयंभू बनणे आणि तो स्वतंत्रपणे विचार करू शकणे, गरज भासेल तशी नवी आवश्यक ज्ञानप्राप्ती करू शकणे. एकविसाव्या शतकातील सातत्याने आणि वेगाने बदलत असलेल्या काळात खरा ‘स्कोप’ व ‘सिक्युरिटी’ त्यांनाच राहील जे वेळेनुसार सतत शिकून नवीन गोष्टी आत्मसात करू शकतील. आताचे करियर म्हणजे ‘एकदाचा सेटल होऊन जा कसा’ असा मामला राहणार नाही. म्हणून युवांनी देखील कामाच्या संधी शोधताना ‘कमी काम, बक्कळ दाम आणि जादा आराम कुठे’ असा विचार न करता उलटपक्षी जिथे त्यांना भरपूर मेहनत करण्याचा, नवीन कौशल्ये शिकण्याचा, विविध जबाबदार्‍या व आव्हानांना सामोरे जाण्याचा अवकाश मिळेल अशा पर्यायांचा सक्रियपणे शोध घ्यावा. कामाव्यतिरिक्त स्वत: प्रयत्नपूर्वक वाचन व ‘ऑनलाईन लर्निंग’ करावे. गरजांपुरतीचे आर्थिक स्वावलंबन साधल्यानंतर निव्वळ जादा कमाईच्या मागे धावण्यापेक्षा ज्यातून लांब पल्ल्याचे ‘करियर कॅपिटल’ विकसित होईल अशा बाबींवर प्रयत्न केंद्रित करणे युवांसाठी उपयुक्त असेल. यामध्ये कौशल्य प्राप्ती, सामाजिक वास्तवाचे आणि जग कसे चालते याचे आकलन, ‘कनेक्शन्स व मेंटरशिप’, विश्वासार्हता, नैतिकता व रोल मॉडेल्सचे ‘बेंचमार्क्स’, इ. गोष्टींचा समावेश होतो. या काळात युवा कोणासोबत, कशासोबत वेळ घालवतात हा त्यांच्या वैयक्तिक वाढीचा आणि चारित्र्याचा प्रमुख कारणीभूत घटक असतो.

3. विनोबांनी सांगितलेली तिसरी बाब म्हणजे स्वत:च्या मनावर व इंद्रियांवर ताबा मिळवण्यास शिकणे. व्यवस्थापन शास्त्रात म्हण आहे की ‘यू गेट हायर्ड फॉर युअर ऍप्टिट्यूड अँड फायर्ड फॉर युअर ऍटिट्यूड’. एक जबाबदार युवा, कार्यकर्ता, नागरिक बनत असतांना माझ्या वृत्तीला आणि वर्तनाला मी योग्य वळण कसे देतो हा अत्यंत महत्त्वाचा पण दुर्दैवाने बव्हंशी दुर्लक्षित विषय राहतो. यावर स्वत:हून लक्ष देणे, गरजेनुसार इतरांकडून अभिप्राय घेणे आणि आवश्यक ते बदल करणे हे युवांच्या यशस्वी करियरसाठी अत्यावश्यक आहे.

4. माझे मेंटर, एमकेसीएलचे संस्थापक श्री. विवेक सावंत यांच्याकडून तरुण वयात मला मिळालेला अत्यंत उपयुक्त सल्ला म्हणजे आपला जगाकडे बघायचा दृष्टीकोन आणि मनोभूमिका कशी ठेवावी तर ‘मी इथे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही!’ मला अनेक तरुण-तरुणी ते जे काही करत आहेत त्यात सतत "मला काय मिळेल" अशा वंचकाच्या मानसिकतेत दिसतात. आणि कदाचित म्हणूनच बर्‍याचदा दु:खी वा चिंताग्रस्त असतात. सध्याची एकूणच व्यक्तिवादी विचारपद्धती, स्वकेंद्री शिक्षण, व कधी कधी पालकांचे अवास्तव प्रेम हे सगळेच युवांमध्ये एक प्रकारची ‘चाईल्ड मेंटालिटी’ भरवत असते. त्यामुळे जगाकडे, कामाकडे, करियरकडे, नातेसंबंधाकडे बघतांना, अगदी जोडीदाराची निवड करतानादेखील ‘यामध्ये माझ्यासाठी काय, मला काय मिळेल?’ असा युवांचा दृष्टीकोन दिसतो. जणू मी सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे आणि माझ्या अपेक्षा, आकांक्षा, आवडी पूर्ण करण्याची जबाबदारी ही इतरांची, समाजाची आहे हा भाव युवांच्या ‘ऍडल्ट’ बनण्याच्या मार्गात अडथळा तर ठरतोच पण सोबतच सततच्या असमाधानाला देखील कारणीभूत ठरतो. त्यापेक्षा मी इतरांना काय देऊ शकतो असा विचार केल्यास केवळ तक्रारी करणे वा स्वत:लाच कुरवाळण्यापेक्षा आपल्या हातात काय यावर लक्ष देता येते, उपाय-केन्द्रित सक्षम भूमिकेतून विचार होतो, उत्साही वाटते आणि आपण उपयुक्त व सकारात्मक अशी काही तरी कृती करण्यात गुंततो. वाढत्या वयानुसार हे संक्रमण होणे हे जबाबदार तरुण बनण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे.

5. यापुढचे आव्हान म्हणजे डिग्रीच्या, सोशल मीडिया फॉलोअर्सच्या आणि पुरस्कारांच्या यशाला भूलून न जाता जीवनात प्रत्यक्ष कर्तृत्व करून दाखवणे आणि निव्वळ ‘सेल्फ प्रमोशन’ न करता प्रामाणिकपणे आपल्या कामाचा परिणाम तपासणे. यशाच्या या ‘ऍसिड टेस्ट’कडे लवकरात लवकर वळून त्याचा गंभीरपणे अवलंब करणे हे ज्यांना ‘लंबी रेस का घोडा’ व्हायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या जॉब मार्केटमध्ये रेझ्युमेची आणि लिंक्डइन प्रोफाईलची चलती आहे. मला अनेक तरुण मुला-मुलींच्या बाबतीत जाणवतं की त्यांची निवडप्रक्रिया व निर्णय हे त्यांच्या मनातल्या एका काल्पनिक रेझ्युमेवर त्यांचं आयुष्यं कसं दिसेल या पद्धतीने होतात. जगण्याची प्रत्येक पायरी किंवा पुढचा टप्पा त्या रेझ्युमेवर पुढची ओळ कशी दिसायला हवी या रीतीने आखल्या जातो. इथे मग सामाजिक काम देखील एक ‘एक्झोटिक व्हॉलंटियरिंग एक्सपिरीयन्स’ बनतो. इतका ‘शॉर्ट साएटेड’ विचार मला फार संकुचित आणि दु:खद वाटतो. ‘समाजाला कशाची गरज आहे, मला काय जमतं आणि मी काय देऊ शकतो’ असा विचार करून प्रत्यक्ष जीवनात कुठला प्रश्न सोडवायला घेतला, त्यात काय परिणाम साध्य केला यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारताचे युवा स्वत:च्याच रेझ्युमेचे ‘कंझ्युमर’ बनतात की समाजासाठी योगदान देणारे ‘प्रोड्यूसर’ बनतात हा कळीचा मुद्दा राहील.

6. सरतेशेवटी तात्कालिक फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाणारं काहीतरी लांब पल्ल्याचं स्वप्नं, ज्याच्या आधारावर माझ्या जगण्याला काही दिशा प्राप्त होईल असा पर्पज / उद्देश्य शोधता येणं हे युवांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आणि जबाबदारी आहे. शिक्षण घेणे हे काही आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही. ते एक साधन आहे, आणि म्हणूनच ते नेमकं कशासाठी वापरलं पाहिजे याविषयी चिंतन होणं आवश्यक आहे. स्वत:च्या नेमक्या आर्थिक गरजांची कल्पना येऊन त्याबाबत स्वावलंबी बनणे ही करियरकडून असलेली प्राथमिक अपेक्षा. पण या पुढचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे, या जीवनाचे काय करु हा आहे.


माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?

निर्माणद्वारे युवांच्या केलेल्या अभ्यासात आम्हाला सापडले की 85% युवा ‘माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?’ यावर आठवड्यातून किमान एकदा विचार करतात मात्र केवळ 37% युवांना असे वाटते की त्यांच्या कॉलेजच्या/कामाच्या ठिकाणचे वातावरण हे याचा शोध घेण्यासाठी अनुकूल आहे. या शोधासाठी नीट संधी न मिळाल्यामुळे बाहेरच्या जगात जी काही फॅशनेबल उत्तर आहेत त्यांचाच अवलंब करायचा याव्यतिरिक्त दुसरा पर्याय बहुतांश युवांसमोर उरत नाही. आर्थिक असुरक्षिततेचा बागुलबुवा करून, सेटल होण्याच्या अवाजवी अपेक्षा आणि अमर्यादित उपभोगाच्या आकांक्षा तयार करून तरुण वयातील कृतीशीलता व जीवनाविषयक प्रयोगशीलता खुंटून टाकणे हे योग्य नाही. तरुणांचे जीवन म्हणजे निव्वळ अर्थव्यवस्थेत विकण्याचे उत्पादन नाही. मला असं वाटतं की या युवा पिढीला अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मात्र ‘स्व:’ची आणि ‘स्वधर्मा’ची ओळख ही निव्वळ गुहेत बसून नाही तर समाजाच्या गरजांना सामोरे जाऊन होते. निर्जीव माहितीचे भेंडोळे, परीक्षा व पदव्यांचा सुळसुळाट, रेझ्युमेची शर्यत, ‘सक्सेस’ची जीवघेणी स्पर्धा, अवाजवी आर्थिक अपेक्षांचे ओझे आणि आत्ममग्नता यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या युवा अभिमन्युंचा ‘माझा स्वधर्म काय’ हा शोध घेणारा अर्जुन व्हावा अशी आशा! आणि यासाठीचा मार्ग म्हणजे सिद्धार्थाप्रमाणे आपल्या महालाच्या बाहेर पडून समाजातील प्रश्न व आव्हाने काय हे समजून घेणाच्या प्रयत्न करणे. निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा अर्थपूर्ण जगण्याच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो!


   अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.