'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 9 March 2013

लोकसहभागातून कामाविषयी डॉ. सुजय काकरमठचे ज्युनिअर्सना मार्गदर्शन


निर्माण ४ चा सुजय काकरमठ गेले ९ महिने सर्च येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या ४४ आदिवासी गावांना आरोग्यसेवा देत आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने MBBSची पदवी घेतली असून त्याच्या महाविद्यालयाने नुकतेच आयोजित केलेल्या ‘TRINITY’ परिषदेत त्याने एका परिसंवादात भाग घेतला. ‘वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्यक्षात काम करताना किती उपयोग होतो?’ याविषयी मांडणी करण्यासाठी वेगवेगळया भूमिकांमध्ये कार्यरत व्यक्तींना परिसंवादात निमंत्रित केले गेले होते. त्यात नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय काम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका सुजयने मांडली. याच परिषदेत डॉ. अभय बंग (नायना) यांना ‘Research with the people’ याविषयी बोलण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. नायनांनी युवा डॉक्टरांना ‘Go where the problems are and not where you are a problem’ असा मंत्र दिला. सामाजिक योगदान देण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘निर्माण’ची तोंडओळख करून दिली व याच महाविद्यालयाचा सध्या आदिवासींना आरोग्यसेवा देत असलेला निर्माणी म्हणून सुजयला आपले अनुभव मांडण्याची संधी दिली. सुजयने वैद्यकीय शिक्षण व internship दरम्यान त्याला पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याची धडपड व आदिवासींना आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव आपल्या भाषणातून मांडले. याच परिषदेच्या निमित्ताने नायना व सुजयने मुंबईतल्या निर्माणींसोबत संवाद साधला.
महाविद्यालयात बरेचदा प्रवाहाची दिशा आपली स्वप्ने ठरवत असतो. मात्र आव्हानात्मक, तरीही समाधान देणाऱ्या मार्गाचा प्रत्येकाला शोध असतो. महाविद्यालयात होणाऱ्या परिषदा, संमेलने ही अस्वस्थ तरुणाईसोबत संपर्क साधण्यासाठी उत्तम माध्यमे असल्याचे सुजयच्या अनुभवातून समजते.

No comments:

Post a Comment