'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 21 March 2017

समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय?

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या दहा वर्षांत निर्माणच्या एकूण सहा बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची वेगळीनजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा प्रश्न :

तुमच्या मते समाजिक काम म्हणजे काय? त्याची गरज व व्याप्ती काय?

'सामाजिक काम करणे'/ 'चळवळीतला कार्यकर्ता बनणे'/ 'तळागाळातल्या (Bottom of the pyramid) लोकांच दुख: दूर करण्यासाठी काम करणे'/ 'व्यवस्थेत अंगभुत असणार शोषण कमी करण्यासाठी व्यवस्थापरिवर्तनाच काम करणे' म्हन्जे नेमकं काय? हे मला कधीच समजल नाही. चळवळ/ अन्याय/ दुख:/ व्यवस्था/ शोषण अशा शब्दांच धुकं पार करून गेलेले काही मित्र नक्कीच भेटले. पण ते जे काही करत होते त्याला 'सामाजिक काम' किंवा दुस-याला काहीतरी मदत करत असल्याची आणि स्वतःच काहीतरी नुकसान सोसत असल्याची भावना उत्पन्न करणार नाव द्याव अस नाही वाटल. त्यापैकी एखादा डॉक्टर म्हणून त्याच त्याच काम करत होता. एखादा इंजिनियर म्हणून तर एखादा शिक्षक म्हणून त्याच त्याच काम करत होता. एक जण तर भारतीय नागरिक म्हणून त्याच त्याच काम करत होता.
त्यामुळ मग मला अस वाटत की मी एक व्यक्ती म्हणून जगत असताना माझ्या गरजा भागवण्यासाठी इतरांनी केलेल्या कामाचा उपयोग मला होतो तसच मी पण इतरांची कुठलीतरी गरज भागवणारं काम कराव म्हंजे मग या देवाणघेवाणीतून समाज नावाची यंत्रणा चालू राहील. आता कोणाची कोणती गरज भागवण्यासाठी काम केल जातय यावरून काहीतरी वर्गीकरण करता येतील. पण तस न करता सगळ्याच गरजेच्या कामांना सारखच समजाव अस मला वाटत.
निरंजन तोरडमल, निर्माण ५


परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मित्राला भेटले. तिथे तो माझी ओळख करून देताना म्हणाला, ही चारुता, ही सध्या Public Health मध्ये पीएचडी करत आहे. हिने डॉ. अभय बंगांबरोबर काम केले आहे. मित्राची बहिण लगेच म्हणाली, “अरे वा तुझी आणि माझ्या आईची ओळख करून दिली पाहिजे, तिलाही सोशलवर्क ची आवड आहे.मी विचार करता करता अडखळले, बंग करतात ते सोशलवर्क आणि चारुता बंगांकडे काम करायची म्हणजे ती पण सोशलवर्क करते. चारुता Public Health शिकते म्हणजे Public Health हेही समाजकार्य झाले का? सामाजिक काम म्हणजे काय? त्याची व्याप्ती काय आणि कोणते काम असामाजिक असू शकते? माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले.
रूढार्थाने सामाजिक काम म्हणजे लोकांच्या थेट आयुष्याशी संबधित आणि नाममात्र किंवा कोणताही आर्थिक मोबदला ना घेता केलेले काम. मग ते अंध व्यक्तीला writer म्हणून काम करणे असो, नियमित रक्तदान करणे असो, गरजू लोकांना आरोग्यसेवा देणे असो, गरीब वस्तीतील मुलांसाठी अभ्यासाचे वर्ग घेणे असो किंवा बिल गेट्स फाउंडेशन करत असलेले HIV AIDS चे काम असो, ही सर्व कामे समाजिक कामातच मोडतात.
बँकेत काम करणारा कॅशिअर, भाजी विकणार हे देखील खरतर समाजोपयोगी काम करत असतात. अगदी विप्रो कंपनीतील इंजिनीअर सुद्धा उपयोगी कामच करत असतो. पण त्याचा लाभार्थी त्याला थेट दिसत नाही आणि याचा तो भरघोस मोबदला घेतो या निकषांवर तो समाजिक काम करत नाही असे ठरविले जाते. याविषयीचे माझे मत अजून पक्के नाही. सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारी व्यक्ती ही विप्रोमधील व्यक्तीपेक्षा किंचित अधिक श्रेष्ठ आहे का? माझ्या मते नाही, पण ही समाजधारणा मात्र आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे लिहायचं तर या लोकांच्या मताचा सध्या माझ्यावर इतका पगडा आहे मी सामाजिक कार्याची व्याख्या करू शकत नाही. पण हेही तितकच खर आहे कि हा प्रश्न जरी मला पडला असला तरी उत्तराची मला फारशी भूक नाही किंवा घाई नाही. कारण जो पर्यंत मी विध्वसंक काम करत नाही. तोपर्यंत मी समाजिक काम करते आहे असेच समजेन. सामाजिक किंवा असामाजिक हे वर्गीकरण येथे अकारण ठरते.
चारुता गोखले, निर्माण १


समाज या संकल्पनेची व्याप्ती बरीच मोठी आहे. समाजाचा, सिस्टीमचा रहाटगाडा सुरळीतपणे चालवा यासाठी असंख्य मानवीय नैसर्गिक घटक प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे काम करत असतात. समाजातील प्रत्येक घटक वेगवेगळी कामे करताना, सामाजिक जवाबदारी पार पडताना आपल्याला दिसतो. मी कामावरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दिसलेलं फुलपाखरू असू देत की चौकात उभा असणारा ट्राफिक हवालदार, प्रत्येकाच स्वतःच एक वैशिष्टपूर्ण स्थान आहे. शिक्षक मुलांना शिकवत असतात, डॉक्टर रोग्यांना सेवा देत असतो, बस ड्रायव्हर लोकांची ने-आन करत असतो, सफाई कामगार सफाई करतो इ. हे सर्व घटक महत्वाचे आहेत, ते सर्व सामाजिक कामच करत आहेत.
आक्रमक धर्मसत्ता, औद्योगीकरण, भांडवलशाही, सो कॉल्ड सिव्हिलायझेशन यांचा जागतिक रेटा व त्याचा मुठभर लोकांना झालेला फायदा यामुळे आहेरे आणि नाहीरे वर्ग समाजात उदयास आला आहे. शासन, राज्यकर्ते, नेते व सक्षम नागरिक यांचे उपेक्षित वर्गाकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या भौतिक व भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत व समाजामध्ये प्रचंड असमतोल निर्माण होतो.
म्हणजेच समाजाचा रहाटगाडा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्य दोन प्रकारच्या कामाची गरज आहे.
१.           रुटीन कामे करणे
२.           असमतोल दूर करणारी कामे करणे
मला वाटत जगातील विविध प्रकारचे असमतोल, विषमता, अन्याय दूर करणारे लोक एक अधिक चांगला माणूस म्हणून प्रतीके निर्माण करत असतात जी सिव्हिलायझेशन ला सकारात्मक दिशेने पुढे जाण्यास मदत करतात. वैज्ञानिक पद्धतीने, सर्जनशीलपणे, सह्वेद्नेला साक्ष ठेऊन समाजातील प्रश्न सोडवणाऱ्या बुद्धिमान तरुणांना मी सामाजिक कार्यकर्ता म्हणेन.
सामाजिक काम कशाला म्हणायचं याचा विचार करताना मी करत असलेल्या कामाची युटीलीटीकाय हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. थंडगार ज्यूस पिऊन बसलेल्या माणसासाठी पाण्याच्या एका ग्लासची युटीलीटी व उन्हातान्हात अनवाणी भटकणाऱ्या व्यक्तीसाठी पाण्याच्या त्याच ग्लासची युटीलीटी खूप वेगळी असेल. मला वाटत सामाजिक काम देखील असच आहे, पाण्याचा ग्लास तोच पण मी तो कुणाला देण्याच काम करत आहे यावरुन ते काम किती सामाजिक आहे हे ठरत.
प्रफुल्ल शशिकांत, निर्माण ५


मला वैयक्तिकदृष्ट्या सामाजिक कामात आनंद मिळतो, हे काम आव्हानात्मक आहे व त्याची गरज आहे म्हणून समाधान लाभते, या गोष्टींच्या पलीकडे जाउन मुळात सामाजिक कामाची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी विचार करायची संधी या प्रश्नामुळे मिळाली.
समाजाला सुरळीत चालण्यासाठी गरजेचे असे कायदेकानून व नीती बनवणे हे प्रामुख्याने शासकीय क्षेत्राचे (Government Sector) काम आहे असे मला वाटते. लोकांना जगण्यासाठी आवश्यक अशा वस्तू व सेवा पुरवणे हे मुख्यत: खाजगी आणि व्यवसाय क्षेत्राचे (Private Sector) काम आहे. मग सामाजिक क्षेत्राची गरज आणि व्याप्ती काय? टिपिकल सोशल वर्कअशा निव्वळ भावनिकदृष्ट्या बुळबुळीत पद्धतीने न बघता सोशल प्रॉब्लेम सॉल्विंगअशा दृष्टीने विचार केला असता मला या कामाचे खालील पैलू जाणवतात:-
1. समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आवश्यक सेवा पुरवणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
2. सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने लोकांना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे.
3. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक असे कल्पक व नाविन्यपूर्ण उपाय शोधणे.
4.  समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या, आपला वाटा उचलण्याच्या अनेकाविध लोकांच्या इच्छेसाठी एक चॅनेल ऑफ एक्स्प्रेशनम्हणून काम करणे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छूक लोक, जागरूक नागरिक, अशा विविध मंडळींचा समावेश होईल ज्यांना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायीत्त्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून सामाजिक क्षेत्र उपयुक्त ठरते.
5. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते (उदा. त्याग, परोपकार, शौर्य, साधेपणा व शुचिता, इ.) त्यांची कायम जाण राहावी म्हणून, ज्यांच्याकडे समाज एक आदर्श म्हणून बघू शकेल, ज्याद्वारे समाजाची नैतिक उंची वाढत राहील असे व्यक्ती आणि कृतींच्या रूपातील रोल मॉडेल्ससमाजापुढे येत राहावेत म्हणून.
6. जेव्हा कुठे अन्याय होत असेल अशा प्रसंगी जागल्या” (whistle blower) म्हणून भूमिका पार पाडणे.
           - अमृत बंग, निर्माण 1


सामाजिक काम खरंतर नदीप्रमाणे आहे. म्हणजे त्याची गरज तर आहे परंतु त्याची व्याप्ती ठरवणं अवघड आहे. सामाजिक काम म्हणजे सर्व सुखवस्तूंचा त्याग करून समाजसेवा करणे वगैरे असं मुळीच नाही. खरंतर माझे शिक्षण, कौशल्य, माझी मूल्ये व आवड या सर्वांची सांगड घालून कोणाचे हित होईल असे काम म्हणजे सामाजिक काम. त्यासाठी कोणताही मोठा त्याग करावा लागत नाही. याउलट असे काम करत असताना माझीच सर्वांगीण वाढ होणं अपेक्षित असते. आणि असे काम केल्याने माझ्याच जगण्याला अर्थ प्राप्त होईल.
कल्याणी पानसरे, निर्माण ६


समाजसेवा म्हणजे नैतिक बदल घडविणे. तो बदल मग गरजू व्यक्तीच्या मुलभूत गरजा मिळण्याचा असू शकतो, पर्यावरणाच्या विकासाचा असू शकतो किंवा कोणाची वैचारिक पातळी सुधारण्याचा असू शकतो.
  आज श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे (मला या पासून मुळीच नुकसान नाही) पण गरिबांना त्याचा काहीच फायदा न होता ते आणखी गरिब होत चालले आहेत. आर्थिक विषमता ज्या तेजीने वाढत आहे त्याच तेजीने सामाजिक क्षेत्रात काम करण्याची गरज पण वाढत आहे.
महात्मा गांधींचे वाक्य आठवते, “The World has enough for everyone’s need, but not enough for everyone’s greed.”  गरिबी, आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ह्रास, दुष्काळ, मातीची ढासळती सुपीकता, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण (ध्वनी, वायू, जल, मृदा), वाढत्या आजारांची समस्या, व्यसनं, भ्रष्टाचार, बेरोजगारी, तरुणांचे चुकीच्या मार्गांवर भटकणे, हे सर्व सामाजिक प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. असलं चित्र पाहतांना सामाजिक कामाची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागत नाही.
सामाजिक काम करणाऱ्या, करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांमध्ये निदान संवेदनशीलता जागृत होते, ज्याने त्यांची वृत्ती योग्य दिशेने धाव घेते. फक्त सामाजिक काम करणारेच नाहीत तर सामाजिक अस्पेक्ट्स ना लक्षात ठेवून दुसऱ्या क्षेत्रात काम करणारे सुद्धा, चांगले तरुण घडतात. मग तो तरुण सामाजिक क्षेत्रात असो कि सरकारी क्षेत्रात  कि कोर्पोरेट क्षेत्रात, तो आपली नैतिकता जपून कर्तव्य पार पाडतो.  चांगले तरुण घडणे या पेक्षा आणखी सामाजिक क्षेत्राची आणि कामाची व्याप्ती कशी मोजणार?
- प्रतिक उंबरकर, निर्माण ६


सोबत राहणाऱ्या काही व्यक्तींच्या समूहाला आपण समाज म्हणतो. अशा समाजात सर्वांना आनंदाने राहता यावं आणि समाज चिरकाल टिकवा यासाठी समाज काही नियम ठरवतो. बरेचदा किंवा आधीतर वेळेस हे नियम अलिखित असतात. बरेचदा लिखित देखील असू शकतात. पण समाजातील सर्व लोक एक समान नसतात. काही कारणांनी पुढे चालून इतरांच्या तुलनेत विविध दृष्टीने बलशाली असणारे लोक समाजचे नियम वाकवून त्यांचा स्वतःच्या हितासाठी गैरवापर करतात. यामुळे समाजात अनेक प्रकारच्या असमानतांचा जन्म होतो. समाजातील एका मोठ्या वर्गाचे त्यामुळे शोषण होऊ लागते. एक मोठा वर्ग ज्याचे प्रत्यक्ष शोषण नाही झाले तरी त्यांचे हक्क डावलून त्यांना उपेक्षित ठेवले जाते. त्यामुळे समाजाचे आरोग्य बिघडते, समाजात असंतोष निर्माण होऊ लागतो आणि तो समाज चिरकाल टिकण्यासाठी (sustain होण्यासाठी) अपात्र ठरतो.
आजचा आपला समाज काही अर्थाने असाच आहे हे आपल्याला दुर्दैवाने मान्य करायला हवं. या बिघडलेल्या समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी, समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मिळवून देण्यासाठी केल्या गेलेला प्रत्येक प्रयत्न म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक काम आहे.
समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी, आनंदी, निरोगी आणि sustainable समाजाच्या निर्मितीसाठी अशा प्रकारचं सामाजिक काम खूप महत्त्वाचं आहे.
अशा प्रकारच्या सामाजिक कामाची व्याप्ती खूप मोठी असू शकते. आज खूप लोकांचे हक्क डावलले जातायत, खूप लोकांवर अन्याय होतोय आणि सर्वात वाईट याचं वाटत कि यापैकी बऱ्याच लोकांना आपल्यावर अन्याय होतोय किंवा हा आपला हक्क आहे आणि तो डावलला जातोय हे माहिती देखील नाहीये. समाजात आज खूप मोठी असमानता आहे. ही असमानता अनेक स्वरुपांची आहे, त्यामुळे जगण्याची समान संधी लोकसंख्येच्या खूप मोठ्या वर्गाला मिळत नाहीये. पर्यावरणाचा जो ह्रास होतोय त्यातून तर आपण आपल्या स्वतःच्या देखील निरोगी जगण्याचा हक्क नाकारतोय. हे आणि असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कामाची व्याप्ती देखील तेवढी मोठी असायला हवी.
आपल्या आणि उद्याच्या पिढीच्या आनंदी, समाधानी जीवनाचा तेवढा एकच आशेचा किरण आहे असं मला वाटत. आज मी प्रयत्न केला नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. नक्कीच! 
- शैलेश जाधव, निर्माण ६


'सामाजिक काम' म्हटलं की 'मदर टेरेसा', 'महात्मा गांधी ' व्हायचय का? असा टोमणा हमखास मिळतो. पण एवढ्या दूरपर्यंत कशाला जाता? आयुष्य जगण्यासाठी केलेल्या प्रत्येक कृतीचा समाजावर काय, कसा आणि किती (चांगला /वाईट ) परिणाम होतोय, त्यावरून ते काम सामाजिक आहे की स्वतःपुरते मर्यादित आहे हे समाजच ठरवतो.
 जरा समाजाकडे पाहिले आणि माझी तिथे किती गरज आहे हे दिसण्याऐवजी माझ्या 'मी' पणाचा गंज चढलेल्या मेंदूला (मनाला) ह्या समाजातल्या घटकांची, शिस्तीची, मूल्यांची किती जास्त गरज आहे हे जाणवायला लागते.
समाजात रहायला आवडतं! मग आंधळेपणाचा आव तरी का आणायचा? कचरा इतरत्र टाकून, विडी सिगारेट चा धूर सोडून, गुटखा तंबाखूच्या पिचकार्‍या मारून; बसगाड्या, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ व दुर्गंधीत न करणे हेच मोठ्ठ सामाजिक काम आहे! त्याची नितांत गरज आहेच. आणि ह्या सर्व असंस्कृत कृती इतरांना करू न देणे ही सामाजिक कामाची व्याप्ती!
मला वाटते, एवढे भान असणे पुरेसे आहे, पुढच्या दूर पर्यंतच्या वाटचालींकरीता!
-         सुजाता पाटील, निर्माण ६.


 “आपल्या क्षमतेचा, कौशल्यांचा, विचारांचा लोकांसाठी वापर करून त्यांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हे करत असताना समाधान आणि आनंद मिळायला हवा.” – हेच काय ते सामाजिक काम. अजून काय वेगळं! असं वाटायला लागलेय मला.
आपल्याला ज्या कामाची गरज आहे असे वाटते ते न करता लोकांची काय गरज आहे?(आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेथील लोक) त्यांना काय हवे आहे याचा विचार करून त्यासाठी काम करणे म्हणजे नेमके काम !
हे काम करत असताना मी नाही ठरवले की माझ्या कामाची व्याप्ती काय असावी? रचनात्मक काम कोणत्याही क्षेत्रात, कोणासाठीही, कधीही, कोणीही आणि कोणत्याही माध्यमातून केले जाऊ शकते. त्याची व्याप्ती ठरवणे म्हणजे बंधन घातल्यासारखे वाटते. आपणच आपल्याला नव्याने ओळखत जातो आणि अधिकाधिक प्रगल्भतेने विषयाचा योग्य आशय समजून काम करतो. काम आपोआपच विस्तारत गेले पाहिजे. उदा. मी शिक्षण क्षेत्रात काम करते, तर त्यातील कोणत्याही/प्रत्येक पैलूवर मला काम करता आले पाहिजे, त्यासाठी मी माझ्या क्षमतांचा विकास केला पाहिजे. किमान तसा प्रयत्न करण्याची माझी तयारी असली पाहिजे.
-        अद्वैता वर्तक, निर्माण ५


खरे पहिले तर आपण करतो ती सगळी कामे सामाजिकच असतात, तरी पण यापैकी काहीच कामांना लोक रूढ अर्थाने सामाजिक कामम्हणतात. हा प्रश्न जर विचारायचाच असेल तर सोशल वर्कया शब्दापेक्षा सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हींगअसं शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल. असो.
आपल्या समाजात सध्या खूप साऱ्या समस्या आहेत. गरिबी आहे, व्यसनांचे प्रमाण खूप आहे, शेतकरी आत्महत्या, नद्यांचे प्रदूषण, भूजल पातळी खालावत आहे  इ. इ... ह्या समस्या सोडविण्यासाठी काम करणे म्हणजे समाजिक काम होय. आपल्या समाजातील समस्या खूप प्रकारच्या आहेत, त्यामुळे समाजिक काम करण्याचे प्रकार देखील खूप आहेत. समस्या फक्त गरिबांच्या नाहीत, फक्त ग्रामीण भागातल्या लोकांच्या नाहीत तर त्या सगळ्यांच्याच आहेत. फक्त आर्थिक नाहीत, आरोग्याच्या, पर्यावरणाच्या, शिक्षणाच्या, वाहतुकीच्या इ. सगळ्याच क्षेत्रात आहेत. त्यामुळे समाजिक काम करण्याच्या संधी देखील प्रत्येक क्षेत्रात आहेत. त्यामुळे शहरातील एखाद्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणे दोन्ही सामाजिकच कामे आहेत.
साधारणतः समाजिक बदल घडविण्याचे पाच प्रकार सांगितले जातात. (हे असेच वर्गीकरण करावे असे म्हणणे नाही, पण सामाजिक कामाची व्याप्ती समजायला याची मदत होईल.) याची काही उदाहरणे पाहू..
१.  सेवा गडचिरोलीतील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवण्याचे डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे यांचे कार्य
२.  शिक्षण यात फक्त मुलांचेच शिक्षण नाही, तर आरोग्य शिक्षण, कायद्याचे शिक्षण यांचा देखील समावेश करता येईल. उदा. वयमही संस्था पालघर येथे आदिवासींना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षण देते - वन हक्क कायदा, पेसा, माहितीचा अधिकार
३.  संघर्ष नर्मदा नदीवरील सरदार सरोवर विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली उभारलेले आंदोलन
४.  संशोधन डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावर जे संशोधन केलं आहे. ते अख्या जगामध्ये मान्यताप्राप्त झालं आणि त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले.
५.  सामाजिक उद्योजगता हरीश हांडे यांनी सौर उर्जा कंपनी ची स्थापना करून ग्रामीण भागात वीज पोहोचवली, विवेक सावंत यांनी MSCIT या कोर्स द्वारे हजारो लोकांना संगणक साक्षर केले.
-    आकाश भोर, निर्माण ५


          जन्म आणि मृत्य यामधील कालखंडास मी जगणं संबोधतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा जगण्याचा कालावधी येतो मात्र ते जगणं तेव्हाच पूर्ण होऊ शकत जेव्हा या प्रवासात कुठेतरी सामाजिक कामात आपले योगदान असेल. सामाजिक काम एखाद्या सरळ सोप्या व्याख्येत बांधता येणार नाही मात्र समाजातील वंचित, दुर्लक्षित समाजघटकांसाठी आपण केलेली एखादी कृती त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते एक सामाजिक काम म्हणता येईल.
           अविनाश पाटील, निर्माण ६

आकाश, शेखर, निखिल, प्रताप, अमोल, रंजन, भूषण, प्रणाली, श्वेता, विवेक आणि कल्याण यांची उत्तरे येथे वाचता येतील  –

No comments:

Post a Comment