'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 19 November 2012

Butterfly effect: स्थानिक लढाईचे मंत्रालयात पडसाद

निर्माणच्या नवख्या डॉक्टरने दिले प्रस्थापितांच्या गैरव्यवहाराला आव्हान


(टीप: ही लढाई लढणाऱ्या निर्माणीच्या सूचनेनुसार नाव व स्थळ यांचा उल्लेख टाळला आहे. सोयीसाठी या तरुण निर्माणी डॉक्टरला आपण ‘अ’ म्हणू. त्याला मदत करणाऱ्या निर्माणच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला ‘ब’ म्हणू, तर या घटनेतील भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘क्ष’ म्हणू.)

‘अ’ हा निर्माणी डॉक्टर महाराष्ट्रातील एका मागासलेल्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू आहे. या आरोग्यकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ‘क्ष’ यांची २६ जुलै रोजी निवड झाली. मात्र डॉ. ‘क्ष’ कागदोपत्री रुजू असूनही १२ ऑगस्ट पर्यंत आपल्या पथकात न फिरकल्यामुळे गावच्या पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली. ही तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ. ’अ’लाच डॉ. ‘क्ष’ यांच्या पथकात पूर्ण वेळ काम करण्याचे आदेश दिले. मात्र स्वतःच्या केंद्राची जबाबदारी असल्यामुळे डॉ. ‘अ’ने पथकाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान ‘ब’च्या सल्ल्यानुसार डॉ. ‘अ’ ने डॉ. ’क्ष’ आपल्या पथकात सेवा देतात का याची चौकशी सुरू केली. सरपंच-उपसरपंच यांनी ‘हो’ अशी ग्वाही दिली तर गावच्या पोलिसांनी व आश्रमशाळेने स्पष्टपणे ‘नाही’ म्हणून सांगितले. डॉ. ‘अ’ च्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यामुळे त्याने गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता डॉ. ‘क्ष’ हे पथकात फिरकत नाहीत हे स्पष्ट झालं. तक्रार करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे गेले असता असं लक्षात आलं की तोपर्यंत साक्षात डॉ. ‘क्ष’ हेच तालुका आरोग्य अधिकारी बनले आहेत.

आपल्या पथकाची जबाबदारी ३ वर्षे सांभाळणे अनिवार्य असूनही राजकीय ताकद पणाला लावून डॉ. ‘क्ष’ यांनी ही नियुक्ती करून घेतली हे स्पष्ट झाले. या नियुक्तीविरुद्ध डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. याची कुणकुण लागताच डॉ. ‘क्ष’ यांनी “’डॉ. ‘क्ष’ यांची नियुक्ती रद्द केल्यास तीव्र जनआंदोलन’ अशा आशयाची बातमी छापून आणली. ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराला भेटून ‘ब’ यांनी ही नियुक्ती कशी बेकायदेशीर आहे हे नियमांनुसार दाखवून दिले. सत्य समजताच त्या पत्रकारानेही या नियुक्तीविरुद्ध आवाज उठला. इतर वृत्तपत्रांनीही सुरात सूर मिसळला. बातमी पूर्ण महाराष्ट्रात गाजली. तातडीने मंत्रालयातून डॉ. ‘क्ष’ यांची तालुका आरोग्य अधिकारी या पदावरून नियुक्ती रद्द करून त्यांना आपल्या पथकाची जबाबदारी तत्परतेने स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्यामुळे इथून पुढे तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या पदी केवळ प्रशासकीय अधिकाऱ्याचीच नियुक्ती व्हावी असा महत्त्वाचा नियम बनवण्यात आला.

गल्ली असो वा दिल्ली, गैरव्यवहार सर्वत्रच घडत असतात. बऱ्याचदा अतिपरिचयादवज्ञा या न्यायाने आपण दुर्लक्षही करतो. परंतु डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी दाखवून दिले आहे की गल्लीतली लढाईसुद्धा दिल्लीचे तख्त हलवू शकते आणि या लढाईचा फायदा गल्लीपुरता मर्यादित न राहता सर्वव्यापी होतो.

No comments:

Post a Comment