'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 10 May 2013

डॉ. रामानंद जाधवला जारावंडीवासियांचा भावपूर्ण निरोप


रामानंद जाधव (निर्माण ४) हा गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी (ता. एटापल्ली) येथील प्राथमिक आरोग्य पथकात गेले एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर करारानुसार एक वर्ष शासकीय सेवा देणे आवश्यक असते. हा करार रामानंदने ३० मार्चला पूर्ण केला. रामानंदने घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे एका महिन्याला बाह्यरुग्ण विभागाला भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या १७८ वरून ९९० पर्यंत वाढली. आपला कार्यकाळ संपवून परतताना जारावंडीच्या गावकऱ्यांनी त्याला भावपूर्ण निरोप दिला. यासाठी त्यांनी २५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावातील सामान्य जनतेपासून तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस व इतर सरकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या सर्वांनीच रामानंदच्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी रामानंद याला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी स्वखर्चातून सामूहिक जेवणदेखील ठेवले होते. रामानंद पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करणार असून पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा!

No comments:

Post a Comment