'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 24 December 2013

बाटली आडवी !

बिटरगाव बु. (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान मतदानाद्वारे हटविण्यात महिला यशस्वी झाल्या.
गेल्या दोन वर्षापूर्वीपासून मन्याळी गावात संतोष व जयश्रीने ठाणेदार देवकते यांच्या मदतीने दारू (हातभट्टी) बंदीची मोहीम सुरू केली. मन्याळी गावात हातभट्टीची दारू बंद झाली. याच पद्धतीने पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या ३२ गावांत हातभट्टीची दारू बंद केली गेली. परंतु शासनमान्य देशी दारूच्या दुकानातून काही लोक दारू पिऊन येत होते. हे थांबवणं मोठं आव्हान होतं. यासाठी देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. दारूच्या परिस्थितीबद्दल बोलताना संतोष म्हणाला, “बिटरगावातील दारूच्या दुकानावर आठ ते दहा खेड्यांतील दारू पिणारे लोक रांगा लावत होते. या गावातही पिणार्‍यांचं प्रमाण वाढलं. चौदा-पंधरा वर्षाची मुलंदेखील दारूच्या आहारी चालली होती.”
दारूबंदीसाठी मतदान करण्यास येणाऱ्या स्त्रिया
आजूबाजूच्या गावातील दारूबंदी झाली त्यामुळे बिटरगावात महिला कार्यकर्त्या, ठाणेदार व काही कार्यकर्त्यांनी दारू बंदीची चळवळ राबवण्याचा विचार व्यक्त केला. चळवळ उभी राहिली. आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्यात आले व ९६% मतदानाने महिला विजयी झाल्या. यासाठी आमदार, तहसीलदार, ठाणेदार व बिटरगावातील महिला कार्यकर्त्यांसह, अ‍ॅटो चालक संघटना, ग्रामपंचायत आदीनी सहकार्य केले.

स्त्रोत – संतोष गवळे, sgawale05@gmail.com   

No comments:

Post a Comment