'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 17 January 2018

नमस्कार मित्रमैत्रीणींनो...

२०१७ वर्ष संपून २०१८ हे नवीन वर्ष आलं. सरणारा प्रत्येक क्षणतसा नवीन असतोच, आपल्यासोबत नवीन शक्यता घेऊन येतो. आपल्याकडे वर्षहे एकक सेलिब्रेट करण्याची पद्धत आहे. काळाच्या पट्टीवर (टाईम स्केलवर) बघायला गेलं तर वर्षहे एकक इतकं छोटं आहे (एक अब्जांशचा ०.०७ वा भाग!) की त्याची किती दखल घ्यावी हा प्रश्न पडतो. तर दुसऱ्याच बाजूला, समाजाच्या दुनियादारीत हेच एकक खुपच मोठं वाटतं. जगात प्रत्येक सेकंदाला ८ जीव वयाचं एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर मरतात, भारतात एका मिनिटाला ५१ बालके जन्म घेतात, एका तासाला ४५० भारतीय जोडपी लग्न करतात, दिल्लीत प्रती दिवस४ बलात्कार होतात, सरासरी ५०० भारतीय शेतकरी प्रत्येक महिन्याला आपली जीवनयात्रा संपवतात, इ. इ.
समाजातील विषमता, अन्याय, अत्याचार त्यांचं वर्षसाजरे करत नाहीत, प्रत्येक दिवसाला (क्षणाला!) वर्तमानपत्रातून त्यांचं अस्तित्व जाणवत असतं. त्यामुळे प्रत्येकच क्षणाला ह्या शक्तींना प्रतिकार करणारी कृती करणे महत्त्वाचे ठरते. तयांशी दोन हात करणाऱ्या निर्माणी प्रतिशक्तीची द्वैमासिकदखल/ कौतुक घेऊन आलोय ह्या अंकांत...
नवीन वर्षातील ३,१५,३६,००० सेकंदाच्या सर्व निर्माणींना खूप साऱ्या शुभेच्छा!


निर्माणचे सातवे Alumni Workshop
माझ्या शिक्षणाचा/ कामाचा सामाजिक प्रश्नांशी काय संबंध आहे?’, ‘पैसे कमवण्यापलीकडे माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?’ ह्या प्रश्नासोबत सुरु झालेला निर्माणचा प्रवास पूर्णवेळ सामाजिक कामापर्यंत नेणाऱ्या निर्माणच्या शिबिरार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात शोधग्रामला कार्यशाळा होते. हे त्याचे सातवे वर्ष! शोधग्राममधीलपूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ह्यावर्षी कार्यशाळा नोव्हेंबर महिन्यात पार पडली.
२५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित निर्माणच्या ह्या कार्यशाळेत एकूण ४० शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मागच्या वर्षभरात आपल्या कामाविषयी किंवा प्रश्नाविषयीची निरीक्षणे, त्यातून झालेले शिक्षण, ह्या प्रवासात स्वतःविषयी जाणवणारे काही महत्त्वाचे बदल आणि मुद्द्यांचे सर्वांनी शेअरिंग केले. इतिहासाचे अभ्यासक प्रा. रामचंद्र गुहा यांनी शिबिरात निर्माणींशी संवाद साधला. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आपण साकारत आहोत का, राजकीय स्वातंत्र्य मिळून गेल्या ७० वर्षांत आपण काय साधलं ह्या विषयावर त्यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. व्हेअर इंडिया गोज्ह्या पुस्तकाचे लेखक, प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थतज्ञ डीन स्पिअर्स यांनी भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नावर स्काईपद्वारे मांडणी केली. आपल्या कामासंदर्भात आणि समाजातील राजकीय परिस्थितीवर शिबिरार्थ्यांनी नायनांसोबत संध्याकाळी प्रश्नोत्तरी केली.
            शोधग्राममधून नवी ऊर्जा आणि उमेद घेऊन सर्व निर्माणी आपापल्या जागी परतले.
प्रा. रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या गडचिरोली भेटीबद्दल द टेलिग्राफया इंग्रजी दैनिकात लिहिलेला लेख:


निर्माण ८.१ अ शिबीर
            मागील ३ महिने निर्माण ८ साठी चालवलेल्या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या शिबिरार्थ्यांचे गटाचे पहिले शिबीर २७ डिसेंबर, २०१७ ते ४ जानेवारी, २०१८ या दरम्यान शोधग्रामला पार पडले. निर्माण ८.१ अ शिबिरात एकूण ५४ शिबिरार्थी सहभागी झाले होते. तारुण्यभान ते समाजभानअशी या शिबिराची थीम होती.
·       स्वतःच्या लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार होणे.
·       स्वचा विस्तार स्वच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे.
·       अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी.
ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची होती.
            वयात आल्यावर जागृत होणारे कुतूहल आणि पुरुष प्रजनन इंद्रिये हा विषय अम्मांनी समजावून सांगितला. डॉ. आरती आणि अमोलने स्वचा स्वीकार, सुनील काकांनी सामाजिक विषमता हे विषय समजावून सांगितले. माया स्टोरी, जितो जितना जीत सको अशा खेळांतून स्वतःसाठी काही मुल्ये शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. अमृतने सर्चच्या कामाबद्दल सांगताना एखाद्या सामाजिक संस्थेकडे कसे बघावे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला. सामाजिक काम करण्यामागे माझ्या प्रेरणा काय आहेत, याचे आत्मपरीक्षण केले, वेगवेगळ्या पुस्तकांतून सामाजिक-राजकीय-आर्थिक परिप्रेक्ष विस्तारले, आकाशने घेतलेल्या सेशनमधून माझी आर्थिक गरज आणि आर्थिक नियोजन समजून घेतले. गावात एक दिवस घालवल्यावर तिथल्या प्रश्नांवर निरीक्षणे नोंदवली. पी. साईनाथ यांच्या विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरील कामावर आधारित निरोज् गेस्टही डॉक्युमेंटरी पाहिली.

            
आनंद दादाने गडचिरोली, मुंबई आणि दिल्ली अशा त्याच्या गेल्या १० वर्षांच्या कामातून झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर केले. डॉ. मनवीन (निर्माण ७), प्रतिक (निर्माण ६), डॉ. सुरज (निर्माण ५), गजानन (निर्माण ७), संकेत (निर्माण ७) आणि रविंद्र (निर्माण ६) यांनी आपापल्या कामाविषयी आणि वैयक्तिक प्रवासाविषयी थोडक्यात शिबिरार्थ्यांसोबत शेअरिंग केले. मनातल्या असुरक्षितता, स्वधर्म, शिक्षणाचे खरे प्रयोजन, आई-वडिलांशी संवाद, जोडीदार, इ. अनेक प्रश्नांना नायनांनी शिबिरात झालेल्या प्रश्नोत्तरीच्या सेशनमध्ये उत्तरे दिली. आणि शेवटच्या दिवशी आपल्यासाठी एका मोठ्या ध्येयाचा विचार करून पुढील सहा महिन्यांसाठी स्वतःचा कृतीकार्यक्रम सर्व शिबिरार्थ्यांनी बनवला.
            निर्माण परिवारात नव्याने दाखल झालेल्या निर्माणींचे स्वागत!



कुमार निर्माणचे पाचवे सत्र सुरु
समाजाप्रती असलेली उदासीनता, आजूबाजूंच्या घटकांकडे बघून मिळणारे मर्यादित संस्कार आणि माध्यमांचा भडीमार ह्या सर्वांमुळे दिवसेंदिवस मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा आणि एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. अभ्यासात हुशार असण्यासोबतच सामाजिक जोडही गरजेची आहे, याबाबत बोललंच जात नाही. सर्वांगीण विकासाचे अनेक पर्याय/ क्लासेस बाजारात उपलब्ध असताना, मुलांमध्ये सामाजिक जोड निर्माण करणारी प्रक्रिया आजूबाजूला दिसत नाही. याच विचारातून डॉ. अभय बंग आणि मा. विवेक सावंत यांनी कुमार निर्माणया संकल्पनेची मांडणी केली.
शालेय वयोगटातील मुलामुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणेहे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
कुमार निर्माणचा या वर्षीचा पुढील टप्पा सुरु झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे, नव्या पिढीवर विश्वास ठेवणारे व त्यांना मार्गदर्शन करू इच्छिणारे नागरिक, बदल स्वतःपासून सुरु होतो याची समज असणारे तरूण व प्रयोगशील शिक्षक हे परिसरातील मुलांचे गट तयार करून मुलांचे भवितव्य घडवण्यात योगदान देवू शकतात.
अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
कुमार निर्माण कार्यकारी गट
शैलेश: ९५०३०६०६९८
प्रणाली: ९७६७४८८३३७


जुई आणि गजानन निर्माण टीममध्ये सामील
कोल्हापूरची जुई जामसांडेकर (निर्माण ५) ३० डिसेंबर, २०१७ पासून निर्माण टीममध्ये ६ महिन्यांसाठी काम करण्यास सर्चमध्ये रुजू झाली आहे. जुईने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेले आहे आणि याआधी ४ वर्षे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिला कामाचा अनुभव आहे. सायकोलॉजी या विषयात तिला विशेष रस आहे. ती सध्या  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून सायकोलॉजी या विषयाचे पदवित्तर शिक्षण घेत आहे. निर्माणसाठी येणाऱ्या युवा वयोगटाचे वैशिष्ट्ये काय असतात, विज्ञान शाखेत ह्या वयोगटावर अस्तित्त्वात असलेले साहित्य वाचून निर्माण प्रक्रियेला अभिप्राय देणे, निर्माण शिबिराच्या आयोजनात मदत करणे, तसेच डॉ. आरतीला (निर्माण ४) मानसिक आरोग्याच्या कामात मदत करणे अशा मुख्य जबाबदाऱ्या पुढचे ६ महिने मुख्यत्वे ती सांभाळणार आहे.
मुळचा लाखांदूरचा (जि. भंडारा) असलेला गजानन बुरडे निर्माण टीमसोबत काम करण्यासाठी सर्चमध्ये रुजू झाला आहे. शिक्षणाने इंजिनिअर असलेला गजानन निर्माणच्या ८ व्या बॅचचा शिबिरार्थी आहे. निर्माण शिबिरांच्या आयोजनात मदत करणे, निर्माण ऑफिसचे काम सुरळीत चालण्यासाठी लागणारा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट देणे, निर्माण संबंधित कामाचे डॉक्युमेंटेशन आणि डेटा सांभाळणे ही त्याच्या कामाची मुख्य जबाबदारी असणार आहे.

जुई आणि गजाननचे निर्माण टीममध्ये स्नेहपूर्वक स्वागत!

No comments:

Post a Comment