'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Showing posts with label संपादकीय. Show all posts
Showing posts with label संपादकीय. Show all posts

Monday, 9 July 2018

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,

कसे आहात? पाऊस सुरु आहे ना?
शोधग्राममध्ये नुकताच पाऊस सुरु झालाय. उन्हाळ्यात भकास झालेली जमीन आता अंकुर धरू लागली आहे. सर्वत्र हिरवा रंग पसरायला सुरुवात झाली आहे. तर कुठे वृद्ध अजस्त्र वृक्ष मातीच्या ओलाव्यातून मुळे निसटून कोसळत आहे. जणू काही त्यांची उंची मुळांना झेपलीच नाही.
काही दिवसांपूर्वी असाच एक अजस्त्र वृक्ष कोसळला – दादाजी खोब्रागडे. त्यांची उंची कदाचित आपल्या समाजाला कधीच झेपली नाही. दादाजींचं शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंतच, कदाचित समाज त्यांना शास्त्रज्ञ म्हणून ओळखलतही नसेल, पण दादाजींनी संशोधन केलेले तांदळाचे वाण आज घरोघरी वापरल्या जात आहे. दादाजींना काही दिवसांपूर्वी लकाव्याचे झटके आले होते, उपचारार्थ त्यांना नागपूरला हलवण्यात आले. पण शरीर उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दादाजींचा मृत्यू सुकर आणि सन्मानाने व्हावा म्हणून म्हणून शेवटचे दोन दिवस त्यांना शोधग्राममध्ये आणण्यात आले होते. हॉस्पिटलच्या चमूने त्यांची मनापासून सेवा केली. अखेर मां दंतेश्वरी दवाखान्यात ३ जूनला दादाजी काळाच्या पडद्याआड गेले.
निर्माण परिवाराकडून दादाजींना भावपूर्ण श्रद्धांजली.

समाजसेवकांचं अंतिम पर्व सन्मानाचं व्हावं...
सोमवारी, ४ जून रोजी दुपारी २ वाजता दादाजी खोब्रागडे यांच्या देहाला शोधग्राममधील कार्यकर्त्यांनी अंतिम निरोप दिला. प्रार्थना म्हणण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं शव त्यांच्या मूळ गावी नागभिड तालुक्यातील नांदेडला पाठवण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी नागपूरवरून त्यांना शोधग्राममधील दवाखान्यात बेशुद्धावस्थेत आणण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा आणि नातू हेदेखील त्यांच्यासोबत होते. महिनाभरात त्यांना लकव्याचे तीन झटके येऊन गेले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील बातमीनंतर त्यांना नागपूरला चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण पुढे उपचार शक्य नाही हे कळून चुकल्यावर त्यांचा अंतिम काळ काढण्यासाठी त्यांच्या घरचे दादाजींना शोधग्राममध्ये घेऊन आले. इथं त्यांना दखल करून घेतलं. याचं कारण होतं, अंतिम मानवाधिकार. ‘डेथ विथ डिग्निटी’. सन्मानानं माणसाला मरता आलं पाहिजे. मृत्यूच्या वेळी तरी शरीराची विटंबना होऊ नये. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत त्याची सेवा करायची आणि त्याला सन्मानानं अखेरच्या श्वासापर्यंत जगू द्यायचं. शोधग्राममध्ये त्यांना दाखल केल्यावर येथील डॉक्टरांच्या संपूर्ण टीमनं शेवटचा क्षण येईपर्यंत अतिशय मनोभावे त्यांची सेवा केली.

दादाजींनी धानाच्या संशोधनात भरपूर काम केलं आहे आणि सर्वांना आता ते माहीत आहे. पण आमचं आणि दादाजींचं एक नातं होतं. हे म्हणजे संशोधकाचं. ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नावर गेली तीस वर्षं आम्ही गडचिरोलीमध्ये संशोधन करत आहोत. ग्रामीण जनतेचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. दादाजींनी स्वतःच्या प्रतिभेनं आणि निरीक्षणानं धानाचे नवनवे वाण शोधून काढले. हे एक अद्वितीय संशोधन होतं. आज लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. आपण आज जो उच्च प्रतीचा तांदूळ खातो, यात दादाजींचं खूप मोठं योगदान आहे. पण संशोधनाच्या बाबतीत ते आमचेही गुरू होते. वयानं १२ वर्ष ज्येष्ठ होते. आमच्या संशोधनाला विज्ञानाच्या उच्च शिक्षणाचं, तंत्रज्ञानाचं पाठबळ आहे. पण दादाजींना असं कुठलंच पाठबळ नव्हतं. ते हाडाचे शेतकरी होते. शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. पण केवळ आपली निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर दादाजींनी तांदळाचे नऊ वेगवेगळे वाण (एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू) विकसित केले. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आम्ही सलाम करतो.
एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो. प्रकाशझोतात आणि प्रतिष्ठेचं वलय असलेल्या समाजसेवकांना ही अडचण येणार नाही, पण जे निर्धन आहेत, साधनहीन आहेत, खेड्यात राहून निरपेक्ष सेवा करतात, अशा समाजसेवकांची मोठी पिढी आता वृद्ध झाली आहे. ज्या काळात त्यांनी समाजसेवा सुरू केली, तेव्हा या क्षेत्रात ‘प्रतिष्ठा’ असा शब्द प्रचलित नव्हता. त्यांनी कधीही धन गोळा केलं नाही. कधी समाजसेवेचा प्रचारही केला नाही. दादाजी खोब्रागडे यांनी तर धानाच्या वाणाचं कधी पेटंटदेखील घेतलं नाही.
असे अनेक समाजसेवक आज वृद्ध झाले आहेत. त्यांच्या अंतिम पर्वाची सोय आपला समाज कशी करणार आहे? त्यांच्या अन्नपाण्याची सोय हा प्रश्न तर आहेच, पण आजारपणाची सोय हा कळीचा मुद्दा ठरतो. कधीतरी वर्तमानपत्राद्वारे एखाद्याची शोकांतिका प्रगट होते आणि समाजाचं लक्ष अचानक वेधलं जातं. पण अशी शोकांतिका प्रगट होणं किंवा एखाद्या समाजसेवकाला तशी मागणी करावी लागणं, हे आपल्या समाजाला शोभत नाही. त्यामुळे एक प्रगत राज्य आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रानं, अशा प्रकारच्या साधनहीन समाजसेवकांचं अंतिम पर्व समाधानानं जावं, त्यांना योग्य ती सेवा मिळावी यासाठी एक व्यापक व्यवस्था उभी केली पाहिजे. समाज आणि शासन दोघांची ही जबाबदारी आहे. दादाजी खोब्रागडे यांच्या अंतिम पर्वाच्या निमित्तानं हा प्रश्न आपल्या दारी आज दत्त म्हणून उभा आहे. जो सोडवणं आपली जबाबदारी आहे.
- डॉ. अभय बंग

आमचं संशोधकाचं नातं होतं – डॉ. अभय बंग - https://www.youtube.com/watch?v=7gLqk2e2as8


निर्माण ८.२ अ शिबीर
निर्माण ८ च्या शिबीर मालिकेतील बिगर-वैद्यकीय चमूचे दुसरे शिबीर २३ जून ते १ जुलै शोधग्राम येथे नुकतेच पार पडले. शेती, अभियांत्रिकी, विज्ञान, कला, पत्रकारिता, वाणिज्य अशा विविध ज्ञानशाखांतून आलेल्या ४१ शिबिर्थ्यांनी आपआपल्या जीवनात कशाप्रकारे सामाजिक बदलाला हातभार लावतील, यावर विचारमंथन केले.
·       सामाजिक काम करण्याच्या इच्छेचे निर्णयात रुपांतर करणे.
·       सामाजिक कृती करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास निर्माण करणे.
·       सामाजिक प्रश्न सोडवण्याचे विविध अप्रोच आणि पद्धती समजून घेणे.
·        सामाजिक बदलाच्या विविध केस स्टडीजचा अभ्यास करणे.
·       सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या रोल मोडल्सशी संवाद साधणे.
·        आपल्या भवतालाबाहेरच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक स्वरूपाचे प्रश्न समजणे.
ही शिबिराची मुख्य उद्दिष्टे होती.
            नेहमीप्रमाणे मागील ६ महिन्यांचा शिबिरार्थ्यांचा अनुभव कसा राहिला, काय कृती केली, काय वाचलं, काही नवीन सापडलं, काय अडचणी आल्या, काही नवे प्रश्न पडले याबद्दल सर्वजण बोलत होते. शिबिरात अम्मांनी स्त्री प्रजनन अंग आणि मासिक पाळी याबद्दल मांडणी केली. माणसाच्या मुलभूत प्रेरणा कुठल्या, माहितीचा अधिकार वापरून काय बदल घडवून आणता येऊ शकतो आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे वेगवेगळे पर्याय याबद्दल अमृतने मांडणी केली. सामाजिक प्रश्न मोजायचा कसा आणि सामाजिक कामात डेटाची उपयुक्तता योगेश दादाने अधोरेखित केली. २००८ साली आलेल्या जागतिक मंदीने माणसासमोर मोठे प्रश्न उपस्थित केले, म्हणून जागतिक अर्थव्यवस्था कशी चालते याबद्दल सुनील काकांनी मार्गदर्शन केले. प्रतिक उंबरकर (निर्माण ६) याने स्थलांतराचा प्रश्न आणि तो करत असलेले काम याबद्दल शिबिरार्थ्यांशी बोलला. नायनांनीही प्रश्नोत्तरीच्या स्वरुपात शिबिरार्थ्यांशी गप्पा मारल्या.

शिबिरात अर्थातच काही उत्कृष्ट पुस्तके सादर झाली. ‘मुंबई-दिल्लीत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ असं ठणकावून सांगणाऱ्या मेंढा (लेखा) या गावात जाऊन देवाजी तोफा या आदिवासी नेत्याशी गप्पा मारल्या. सामुहिक वनहक्क मिळवण्याचा लढा ते ग्रामस्वराज्य हे चर्चेचे विषय होते. बालमृत्यू रोखण्यासाठी गडचिरोलीत झालेला क्रांतिकारी प्रयोग – एचबीएनसी – आनंद दादाने समजावून सांगितला. क्वेस्ट, पालघर या संस्थेचे प्रमुख निलेश निमकर यांनी भारताच्या शिक्षणाची दशा आणि दिशा याबद्दल थोडक्यात मांडणी केली. एकेदिवशी शिबिरात विवेक सावंतांनी शिबिरार्थ्याशी प्रश्नोत्तरी केली. अशा विविध वैचारिक व्यंजनांची मेजवानी असलेले निर्माण ८.२ अ चे शिबीर पार पडले.
            अर्थपूर्णतेच्या शोधात निघालेल्या सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा!

कुमार निर्माणची कार्यशाळा संपन्न
शालेय वयीन मुला-मुलींनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधावा, परिसरातील प्रश्न बघावे, त्या प्रश्नांवर कृतीच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा आणि हे सगळं करत असताना समाजाच्या प्रयोगशाळेत मानवतेची मूल्य त्यांच्यात खोलवर रुजावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कुमार निर्माणच्या निमंत्रकांचं दुसरं शिबीर मे महिन्यात जळगाव आणि पुणे येथे पार पडलं. दोन्ही ठिकाणी मिळून ८० निमंत्रक या दोन दिवसीय शिबिरास  उपस्थित होते.कुमार निर्माणचं पाचवं सत्र जानेवारी २०१८ पासून सुरु झालं आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि मुलांसोबत काम करताना जरुरी अशी कौशल्ये व माहिती प्रदान करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते. मे महिन्यातील रखरखत्या उन्हात शिबीर असून देखील निमंत्रकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
शिबिरात ‘वयात येतानाचे अवघड प्रश्न’ याविषयी श्रीमती शुभदा जोशी यांनी सत्र घेतले. कुमार निर्माण आणि शालेय पाठ्यपुस्तके यांची सांगड कशी घालता येईल याविषयी सायली तामणे हिने मांडणी केली. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामात सहभागी असल्याने सायलीने पाठ्यपुस्तक निर्मितीची प्रक्रिया देखील थोडक्यात सांगितली. याशिवाय ‘कुमार निर्माण’, ‘कल्पक बनूया’, ‘Fact-Fiction-Fantasy’ ही सत्रे प्रणाली व शैलेश यांनी घेतली.
            शिबिराच्या आयोजनात शाम, आकाश, प्रफुल्ल यांनी विशेष सहकार्य केलं. बाहेरच्या तप्त वातावरणात मनाला गारवा आणि प्रेरणा देणाऱ्या ‘आदमी हो तुम की उठो आदमी को प्यार दो..’ या गाण्याने शिबिराची सांगता झाली.

Wednesday, 17 January 2018

नमस्कार मित्रमैत्रीणींनो...

२०१७ वर्ष संपून २०१८ हे नवीन वर्ष आलं. सरणारा प्रत्येक क्षणतसा नवीन असतोच, आपल्यासोबत नवीन शक्यता घेऊन येतो. आपल्याकडे वर्षहे एकक सेलिब्रेट करण्याची पद्धत आहे. काळाच्या पट्टीवर (टाईम स्केलवर) बघायला गेलं तर वर्षहे एकक इतकं छोटं आहे (एक अब्जांशचा ०.०७ वा भाग!) की त्याची किती दखल घ्यावी हा प्रश्न पडतो. तर दुसऱ्याच बाजूला, समाजाच्या दुनियादारीत हेच एकक खुपच मोठं वाटतं. जगात प्रत्येक सेकंदाला ८ जीव वयाचं एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर मरतात, भारतात एका मिनिटाला ५१ बालके जन्म घेतात, एका तासाला ४५० भारतीय जोडपी लग्न करतात, दिल्लीत प्रती दिवस४ बलात्कार होतात, सरासरी ५०० भारतीय शेतकरी प्रत्येक महिन्याला आपली जीवनयात्रा संपवतात, इ. इ.
समाजातील विषमता, अन्याय, अत्याचार त्यांचं वर्षसाजरे करत नाहीत, प्रत्येक दिवसाला (क्षणाला!) वर्तमानपत्रातून त्यांचं अस्तित्व जाणवत असतं. त्यामुळे प्रत्येकच क्षणाला ह्या शक्तींना प्रतिकार करणारी कृती करणे महत्त्वाचे ठरते. तयांशी दोन हात करणाऱ्या निर्माणी प्रतिशक्तीची द्वैमासिकदखल/ कौतुक घेऊन आलोय ह्या अंकांत...
नवीन वर्षातील ३,१५,३६,००० सेकंदाच्या सर्व निर्माणींना खूप साऱ्या शुभेच्छा!


निर्माणचे सातवे Alumni Workshop
माझ्या शिक्षणाचा/ कामाचा सामाजिक प्रश्नांशी काय संबंध आहे?’, ‘पैसे कमवण्यापलीकडे माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?’ ह्या प्रश्नासोबत सुरु झालेला निर्माणचा प्रवास पूर्णवेळ सामाजिक कामापर्यंत नेणाऱ्या निर्माणच्या शिबिरार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात शोधग्रामला कार्यशाळा होते. हे त्याचे सातवे वर्ष! शोधग्राममधीलपूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ह्यावर्षी कार्यशाळा नोव्हेंबर महिन्यात पार पडली.
२५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित निर्माणच्या ह्या कार्यशाळेत एकूण ४० शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मागच्या वर्षभरात आपल्या कामाविषयी किंवा प्रश्नाविषयीची निरीक्षणे, त्यातून झालेले शिक्षण, ह्या प्रवासात स्वतःविषयी जाणवणारे काही महत्त्वाचे बदल आणि मुद्द्यांचे सर्वांनी शेअरिंग केले. इतिहासाचे अभ्यासक प्रा. रामचंद्र गुहा यांनी शिबिरात निर्माणींशी संवाद साधला. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आपण साकारत आहोत का, राजकीय स्वातंत्र्य मिळून गेल्या ७० वर्षांत आपण काय साधलं ह्या विषयावर त्यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. व्हेअर इंडिया गोज्ह्या पुस्तकाचे लेखक, प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थतज्ञ डीन स्पिअर्स यांनी भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नावर स्काईपद्वारे मांडणी केली. आपल्या कामासंदर्भात आणि समाजातील राजकीय परिस्थितीवर शिबिरार्थ्यांनी नायनांसोबत संध्याकाळी प्रश्नोत्तरी केली.
            शोधग्राममधून नवी ऊर्जा आणि उमेद घेऊन सर्व निर्माणी आपापल्या जागी परतले.
प्रा. रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या गडचिरोली भेटीबद्दल द टेलिग्राफया इंग्रजी दैनिकात लिहिलेला लेख:


निर्माण ८.१ अ शिबीर
            मागील ३ महिने निर्माण ८ साठी चालवलेल्या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या शिबिरार्थ्यांचे गटाचे पहिले शिबीर २७ डिसेंबर, २०१७ ते ४ जानेवारी, २०१८ या दरम्यान शोधग्रामला पार पडले. निर्माण ८.१ अ शिबिरात एकूण ५४ शिबिरार्थी सहभागी झाले होते. तारुण्यभान ते समाजभानअशी या शिबिराची थीम होती.
·       स्वतःच्या लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार होणे.
·       स्वचा विस्तार स्वच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे.
·       अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी.
ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची होती.
            वयात आल्यावर जागृत होणारे कुतूहल आणि पुरुष प्रजनन इंद्रिये हा विषय अम्मांनी समजावून सांगितला. डॉ. आरती आणि अमोलने स्वचा स्वीकार, सुनील काकांनी सामाजिक विषमता हे विषय समजावून सांगितले. माया स्टोरी, जितो जितना जीत सको अशा खेळांतून स्वतःसाठी काही मुल्ये शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. अमृतने सर्चच्या कामाबद्दल सांगताना एखाद्या सामाजिक संस्थेकडे कसे बघावे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला. सामाजिक काम करण्यामागे माझ्या प्रेरणा काय आहेत, याचे आत्मपरीक्षण केले, वेगवेगळ्या पुस्तकांतून सामाजिक-राजकीय-आर्थिक परिप्रेक्ष विस्तारले, आकाशने घेतलेल्या सेशनमधून माझी आर्थिक गरज आणि आर्थिक नियोजन समजून घेतले. गावात एक दिवस घालवल्यावर तिथल्या प्रश्नांवर निरीक्षणे नोंदवली. पी. साईनाथ यांच्या विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरील कामावर आधारित निरोज् गेस्टही डॉक्युमेंटरी पाहिली.

            
आनंद दादाने गडचिरोली, मुंबई आणि दिल्ली अशा त्याच्या गेल्या १० वर्षांच्या कामातून झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर केले. डॉ. मनवीन (निर्माण ७), प्रतिक (निर्माण ६), डॉ. सुरज (निर्माण ५), गजानन (निर्माण ७), संकेत (निर्माण ७) आणि रविंद्र (निर्माण ६) यांनी आपापल्या कामाविषयी आणि वैयक्तिक प्रवासाविषयी थोडक्यात शिबिरार्थ्यांसोबत शेअरिंग केले. मनातल्या असुरक्षितता, स्वधर्म, शिक्षणाचे खरे प्रयोजन, आई-वडिलांशी संवाद, जोडीदार, इ. अनेक प्रश्नांना नायनांनी शिबिरात झालेल्या प्रश्नोत्तरीच्या सेशनमध्ये उत्तरे दिली. आणि शेवटच्या दिवशी आपल्यासाठी एका मोठ्या ध्येयाचा विचार करून पुढील सहा महिन्यांसाठी स्वतःचा कृतीकार्यक्रम सर्व शिबिरार्थ्यांनी बनवला.
            निर्माण परिवारात नव्याने दाखल झालेल्या निर्माणींचे स्वागत!



कुमार निर्माणचे पाचवे सत्र सुरु
समाजाप्रती असलेली उदासीनता, आजूबाजूंच्या घटकांकडे बघून मिळणारे मर्यादित संस्कार आणि माध्यमांचा भडीमार ह्या सर्वांमुळे दिवसेंदिवस मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा आणि एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. अभ्यासात हुशार असण्यासोबतच सामाजिक जोडही गरजेची आहे, याबाबत बोललंच जात नाही. सर्वांगीण विकासाचे अनेक पर्याय/ क्लासेस बाजारात उपलब्ध असताना, मुलांमध्ये सामाजिक जोड निर्माण करणारी प्रक्रिया आजूबाजूला दिसत नाही. याच विचारातून डॉ. अभय बंग आणि मा. विवेक सावंत यांनी कुमार निर्माणया संकल्पनेची मांडणी केली.
शालेय वयोगटातील मुलामुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणेहे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
कुमार निर्माणचा या वर्षीचा पुढील टप्पा सुरु झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे, नव्या पिढीवर विश्वास ठेवणारे व त्यांना मार्गदर्शन करू इच्छिणारे नागरिक, बदल स्वतःपासून सुरु होतो याची समज असणारे तरूण व प्रयोगशील शिक्षक हे परिसरातील मुलांचे गट तयार करून मुलांचे भवितव्य घडवण्यात योगदान देवू शकतात.
अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
कुमार निर्माण कार्यकारी गट
शैलेश: ९५०३०६०६९८
प्रणाली: ९७६७४८८३३७


जुई आणि गजानन निर्माण टीममध्ये सामील
कोल्हापूरची जुई जामसांडेकर (निर्माण ५) ३० डिसेंबर, २०१७ पासून निर्माण टीममध्ये ६ महिन्यांसाठी काम करण्यास सर्चमध्ये रुजू झाली आहे. जुईने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेले आहे आणि याआधी ४ वर्षे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिला कामाचा अनुभव आहे. सायकोलॉजी या विषयात तिला विशेष रस आहे. ती सध्या  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून सायकोलॉजी या विषयाचे पदवित्तर शिक्षण घेत आहे. निर्माणसाठी येणाऱ्या युवा वयोगटाचे वैशिष्ट्ये काय असतात, विज्ञान शाखेत ह्या वयोगटावर अस्तित्त्वात असलेले साहित्य वाचून निर्माण प्रक्रियेला अभिप्राय देणे, निर्माण शिबिराच्या आयोजनात मदत करणे, तसेच डॉ. आरतीला (निर्माण ४) मानसिक आरोग्याच्या कामात मदत करणे अशा मुख्य जबाबदाऱ्या पुढचे ६ महिने मुख्यत्वे ती सांभाळणार आहे.
मुळचा लाखांदूरचा (जि. भंडारा) असलेला गजानन बुरडे निर्माण टीमसोबत काम करण्यासाठी सर्चमध्ये रुजू झाला आहे. शिक्षणाने इंजिनिअर असलेला गजानन निर्माणच्या ८ व्या बॅचचा शिबिरार्थी आहे. निर्माण शिबिरांच्या आयोजनात मदत करणे, निर्माण ऑफिसचे काम सुरळीत चालण्यासाठी लागणारा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट देणे, निर्माण संबंधित कामाचे डॉक्युमेंटेशन आणि डेटा सांभाळणे ही त्याच्या कामाची मुख्य जबाबदारी असणार आहे.

जुई आणि गजाननचे निर्माण टीममध्ये स्नेहपूर्वक स्वागत!

Tuesday, 10 January 2017

‘जीवन निष्ठा’

आपण सर्वच निर्माणी ठराविक काळाच्या अंतराने आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या प्रेरणा तपासत असतो. आणि त्याबद्दल कधी कधी असुरक्षितही असतो. निर्माण ७.१ अ शिबिरात एका शिबिरार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नायनांनी ‘जीवन निष्ठा’ म्हणजे काय, ती कशी येते याबद्दल सांगितलं.

मी लहानपणी ज्या शाळेत शिकलो, सेवाग्रामच्या शाळेमध्ये, तिथे एक पद्धत होती. विनोबांचा जो जन्मदिन असायचा त्याला ‘भूमी-क्रांती दिन’ म्हणायचे. का, कारण ज्याला अजिबात भूमी नव्हती, जमीन नव्हती, जगण्याचं कोणतंच साधन नव्हतं, त्याच्या उद्धारासाठी विनोबांनी आंदोलन केलं. तर त्यादिवशी आमच्या शाळेमध्ये, आश्रमामध्ये, एक प्रयोग व्हायचा की मजुराचं जीवन समजून घेतलं पाहिजे. त्याचं जीवन समजून घ्यायचं असेल तर त्याचं जीवन अनुभवायला पाहिजे. ते फक्त बौद्धिकरित्या नाही समजणार. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला अन्नाचा एकही कण मिळायचा नाही. शेतामध्ये दिवसभर आम्ही मजुरासारखं काम करायचो. जेवढे काही पन्नास साठ लोकं आम्ही होतो, शिक्षकही आमच्याच सोबत. आणि दिवसाच्या शेवटी आमच्या कामाचं मोजमाप व्हायचं. किती जमिनीतलं गवत कापलं, किती ज्वारीची कापणी केली, किती माती ओढली, असं काम असायचं. मग त्या कामाचं आम्हाला शेतमजुरीच्या रेटने पैसे मिळायचे. आणि जे कितीक आणे मिळायचे, त्यातून संध्याकाळचा आमचा स्वयंपाक व्हायचा. फक्त तेवढ्याच पैशांवर. आणि बस्स, त्याच स्वयंपाकात आम्हाला जेवायला लागायचं. अर्धी-मुर्धी भाकरी यायची हाती. तीच खाऊन आम्ही झोपायचो. भूक लागलेली असायची, रडूही यायचं. पण तरीही, मजुराची भूक काय असते, गरीबाची भूक काय असते, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा जीवनभर कायमचा सोबत राहिला.
ज्यांच्या गरजा अजिबातच पूर्ण होत नाहीत, जगण्यालाही जी किमान अपेक्षा असते तेही ज्यांना मिळत नाही अशा लोकांच्या जितक्या जवळ जाता येईल तितकी तुमची सामाजिक प्रश्न सोडवण्याची प्रेरणा मजबूत होत जाईल. मग ती प्रेरणा केवळ बौद्धिक राहत नाही, बौद्धिकतेच्या खोल जाते. ‘हे बघा आकडे, पर्यावरणाचा किती ऱ्हास होतोय’ फक्त असं राहत नाही, तर आकड्यांच्या पलीकडे जाते. तो माझा, जीवनाचा, वास्तववादी अनुभव बनून जातो. तर काही गोष्टी अनुभवाच्या पातळीवरती स्वतः जगल्या पाहिजेत आणि त्या जगत असलेल्या लोकांच्या जवळदेखील गेलं पाहिजे. आपण फक्त बघतो, खरं म्हणजे बघणे हे अनुभवाला substitute नाहीये. ते अप्रत्यक्षच राहतं. मी त्याची भूक पाहिली, म्हणजे मला समजते का त्याची भूक? नाही. भूक काही बघून समजण्याची गोष्ट नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तर तो अनुभव जितका मला घेता येईल, तितकी मला त्याची गरज कळते. म्हणून माझ्या गरजा कमी करण्याला, त्याचा प्रश्न सोडवण्याला एक पक्का मानवी आधार मिळतो.
गांधीजींनी एकदा विनोबांना एक जबाबदारी दिली. त्यावेळी लोकं चरख्यावर सुत कातायचे. कातणारे मजूर, त्यांना मजुरी मिळायची. मग किती मीटर कातलं, त्याचे रेट ठरलेले असायचे. त्यावर ज्याची त्याची मजुरी मिळायची. त्यावेळी मीटर वैगेरे भानगड नव्हती, यार्न होतं. ६४० यार्नचं एक युनिट होतं आणि त्याच्या आधारावर मजुरी मिळायची. भारतामध्ये असे लाखो कातणारे मजूर होते, त्यांची गांधीजींकडे एकदा तक्रार आली, की ही मजुरी अपुरी पडतीये. आणि खादी विकणारे जे मॅनेजर्स होते, खादी भांडारातले, ते म्हणत होते की आधीच खादी महाग आहे, विकता विकता नाकी नऊ येतात. लोकांना समजावून सांगायला कठीण जात आम्हाला. तुम्ही याच्याहून जास्त मजुरी द्याल मजुरांना, तर खादी इतकी महाग होईल की विकणं अजून अवघड होऊन बसेल. तर गांधीजींनी विनोबांना याचं न्यायाधीश म्हणून नेमलं. गांधीजी, “मला सांग की किती मजुरी ठेवावी.” विनोबांनी त्या विषयावर तीसेक वर्ष काम केलेलं होतं, म्हणायला गेलं तर विनोबा त्या विषयाचे खरंच महर्षी होते. त्यावर विनोबा म्हणाले की “मला ६ महिन्याचा वेळ पाहिजे”. गांधीजी म्हणाले, “अरे घाई आहे. तिकडे मजुरांना उत्तर द्यायचंय”. “नाही मला ६ महिने पाहिजे. तसं नाही उत्तर देऊ शकत मी” विनोबा. “ठीके घे”. ६ महिने विनोबांनी गांधीजींशी काहीच संपर्क केला नाही. ६ महिन्यांनंतर विनोबा आले गांधीजींना भेटायला तर ३० पौंड वजन कमी झालेलं, शरीर अगदीच किडकिडीत झालेलं. ते पाहून गांधीजींनी विचारलं, “काय झालं रे तुला?” त्यावर विनोबा उत्तरले “काही नाही. तुम्ही मला काम दिलं होतं की कातणीची मजुरी किती असावी. तेव्हापासून गेली ६ महिने मी रोज ८ तास कातण्याचंच काम करतोय. आणि त्या कातण्यातून मजुरीच्या रेटने ६ पैसे इतकी मजुरी मिळवता येते. ६ महिने मी जगून पाहिलं ६ पैश्यांमध्ये. तर माझा निष्कर्ष एवढाच की आज जी मजुरी आपण देतो कातणाऱ्यांना त्यातून अशी स्थिती होते. त्यामुळे मजुरी वाढवली पाहिजे.” ह्या उत्तरात गांधीजींना कुणाच्या दुसऱ्या तर्काची गरजच नाही पडली. सगळ्या खादीच्या मॅनेजर्सचा विरोध बाजूला ठेऊन, गांधीजींनी मजुरी तिप्पटीने वाढवली. तर स्वतः प्रत्यक्ष ते जगणं किंवा करणं किंवा अनुभवणं हे महत्त्वाचं ठरतं. आपल्या कामामध्ये, मतामध्ये निष्ठा आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी.
पण काही अनुभव घेताही येत नाहीत, उदाहरणार्थ बालमृत्यूचा अनुभव. माझं मुल काही कधी मेलं नाही, त्याची गरजही नाही मला. पण बालमृत्यू मी माझ्या उघड्या डोळ्यांनी इतक्या जवळून पाहिले की तेच पुरेसे होते मला हलवून टाकायला. २०-३० वर्ष माझी ती प्रेरणा टिकली कारण अतिशय हादरवून टाकणारे अनुभव गाठीशी होते. तर प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे ती जी निष्ठा आहे, ती जी प्रेरणा आहे, ती निव्वळ एक हॉबी किंवा एक adventurous अनुभव किंवा एक intellectual asset राहत नाही. त्याच्या पलीकडे जाते. आणि ती जेव्हा जाते, तिला आपण ‘जीवन निष्ठा’ म्हणतो. बौद्धिकतेच्या पलीकडे जाणारी आणि मला दुसऱ्याच्या तर्काची, अर्ग्युमेंटची गरज राहणार नाही अशी ती माझ्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. अशी ‘जीवन निष्ठा’ आपण मिळवली पाहिजे.
आपल्या आजूबाजूच्या समाजात दिसणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्नांना, समाज घटकांना समजून घेण्यासाठी आणि त्यासोबतच आपला ‘स्व’ अधिक उन्नत व्हावा व आपल्या जीवननिष्ठा अधिक दृढ व्हाव्या या उद्देशाने आपण ‘निर्माण’ अंतर्गत कृती शिक्षणाचा उपक्रम सुरु केला आहे. ज्यात गेल्या दोन वर्षात आपण दुष्काळ हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत दुष्काळामुळे होरपळणारा समाज घटकही जवळून पाहिला. हा प्रयत्न म्हणजेच नायनांनी सांगितलेल्या जीवननिष्ठा दृढ करण्याचा भाग होता, असं म्हणता येईल. इथून पुढेही अशाच प्रकारे सामाजिक प्रश्नांच्या, वंचित समाज घटकांच्या अधिकाधिक जवळ जाऊन आपल्या निष्ठा, प्रेरणा समृद्ध करूयात.

Wednesday, 31 August 2016

नमस्कार मित्रमैत्रिणींनो...

मनापासून धन्यवाद !
            निर्माणची ७वी बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे. ७व्या बॅचच्या प्रसिद्धीसाठी सर्व निर्माणी, 'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व सर्चमधील विविध कामात सहभागी स्वयंसेवक मित्र, निर्माण समुदाय, पत्रकार मित्र, प्राध्यापक मित्र यांनी निर्माणच्या अर्जाला व अस्वस्थ युवांना एकमेकांपर्यंत पोहोचवले; आपापल्या गावांतील कॉलेजेस मध्ये पोस्टर्स लावले, फेसबुक व्हाट्सअॅपवर आव्हाने-पोस्टर्स-व्हिडीओ शेअर केले, वर्तमानपत्रांतून निर्माणचे आव्हान तरूणांपर्यंत पोहोचवले. ३० ऑगस्टअखेर निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील ३०४ जणांनी महाराष्ट्राबाहेरून ६ जणांनी अर्ज भरला आहे. अजूनही अर्ज येतच आहेत.
            सप्टेंबरमध्ये मुलाखती सुरू होणार आहेत. १५ ऑक्टोबरला निर्माणसाठी निवड झालेल्या युवांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत या मुलाखती होणार आहेत. यादरम्यान शक्य तेंव्हा मुलाखती घ्यायला आणि मुलाखत घेणाऱ्या टीमला भेटायला नक्की या. प्रसिद्धीसाठी तुम्ही केलेल्या सहकार्यासाठी कृतज्ञता व मुलाखतींदरम्यान तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहेच.



निर्माण – दस साल बाद...
            समाजातील विविध समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणा-या युवांना संघटीत करणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन, कौशल्ये पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण ही प्रक्रिया सुरू झाली. बघताबघता निर्माणला १० वर्षेही पूर्ण झाली. या १० वर्षांत ३६ शिबिरांमध्ये ७१० निर्माणींनी सहभाग घेतला. यात ४० % मुली होत्या. यापैकी सर्वाधिक शिबिरार्थी (२८९) वैद्यकीय पार्श्वभूमीचे असून त्यांच्यासाठी सुयोग्य अशी वेगळी शिक्षणप्रक्रियाही सतत विकसित होत आहे. ७१० पैकी केवळ निर्माणी मुस्लीम असून मुस्लीम युवांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज यानिमित्ताने जाणवली. ४६० निर्माणींनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले असून आजच्या दिवशी त्यापैकी १२२ जण पूर्ण वेळ सामाजिक समस्यांवर काम करत आहेत, तर इतर जण आपापल्या परीने आपला वेळ, कौशल्ये, आर्थिक मदत देतच आहेत. विशेष गोष्ट म्हणजे निर्माणच्या कुटुंबातील १०० युवांनी निर्माणी मित्र/मैत्रिणीलाच जोडीदार म्हणून निवडले आहे ! याचदरम्यान आपल्याला ८८ रिसोर्स पर्सन्सनी निर्माण व निर्माणींच्या वैचारिक वाढीत हातभार लावला आहे.
            या काळात निर्माण शिबिरांशिवाय कुमार निर्माण, कृती शिक्षण कार्यक्रम ('झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व सर्चमधील विविध कामात कृतीतून शिक्षणाची संधी), IITB सोबत कार्यशाळा असे विविध कार्यक्रम विकसित होत आहेत.
            तसेच या काळात निर्माणची वेबसाईट, मुखपत्र सीमोल्लंघन, फेसबुक पेज, विकी पेज, युट्युब चॅनेल ही माध्यमे प्रस्थापित झाली असून प्रिंट मेडिया मध्येही निर्माणबद्दल आकर्षण राहिले आहे.
            दशकपूर्तीचे औचित्य साधत या १० वर्षांचा आढावा पुढील ५ वर्षांची वाटचाल याविषयी चिंतन करण्यासाठी 'बायफ' पुणे येथे १०-११ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. बैठकीला निर्माण कुमार निर्माण टीमशिवाय नायना, आनंद करंदीकर, विवेक सावंत, MKCLKF चे उदय पंचपोर नरेंद्र खोत उपस्थित होते.

निर्माण टीमचा विस्तार
            अमोल शैलेश रखमा हेमा श्रीकांत (दोघेही निर्माण ) नव्याने, तर अमृत बंग पुन्हा रुजू झाल्यामुळे निर्माण टीमला बळकटी आली आहे.
            अमोल गेले महिने 'झुंज दुष्काळाशी'चा समन्वयक म्हणून कार्यरत होता. आताही त्याची मुख्य जबाबदारी कृतीशिक्षण कार्यक्रम असणार आहे. रखमा प्रामुख्याने निर्माण प्रसिद्धी व निवड प्रक्रियेशी संबंधित जबाबदा-या सांभाळेल. अमृतने गेल्या वर्षभरात University of Pennsylvania येथे MS (Non-Profit Leadership) हे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याच्या कौशल्यांचा निर्माणला नक्कीच फायदा होईल.

२०१५-१६ च्या दुष्काळाने माझा निर्णय बदलला - प्रतीक उंबरकर
            प्रतीक उंबरकर (निर्माण ) पाचवा 'कर के देखो' फेलो बनला आहे. या फेलोशिप अंतर्गत पुढचे वर्ष तो 'समाज प्रगती सहयोग' या संस्थेसोबत मनरेगा पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करणार आहे. 'समाज प्रगती सहयोग' पर्यंतचा त्याचा प्रवास त्याच्याच शब्दांत...
            "निर्माणच्या शिबिरांदाराम्यान मी 'शेतमालाची प्रक्रीया' आणि 'कमी खर्चाची शेती' या विषयांवर काम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार BAIF बरोबर काम करायचे असे नियोजन केले होते. या कामांची पद्धत शिकून घ्यायची आणि नंतर स्वतःच्या गावात काम करायचे असे ठरवले होते. पण २०१५-१६ च्या दुष्काळाने माझ्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. आजच्या परीस्थितीत पाण्याची समस्याच मोठी वाटायला लागली आहे.
            माझ्या गावात ८० ते ९० फुटांवर विहिरीला पाणी आहे. तरीही शेतकऱ्याची मोटर हिवाळ्यात दोन ते तीन तासांमध्ये पाणी सोडणे बंद करते. ज्या शेतकऱ्याचे बोअर वेल आधी स्प्रिंकलरचे १५ नोझल पाणी सोडायची त्यांची आता ८ नोझलच पाणी फेकते. गावात नळाला पिण्याचे पाणी ज्या बोअर वेल पासून यायचे ती बोअर वेल सुद्धा उन्हाळ्यात दूषित पाणी सोडायला लागली आहे. या उन्हाळ्यात गावात टँकरने पाणी यायला सुरुवात झाली. दोन दिवस मी स्वतः टँकरवर बसून लोकांना पाणी वाटायचं काम केलं. पाणी वाटताना लोकांची भांडणे बघितली. शेजारी एकमेकांसोबत चांगली राहणारी मंडळीसुद्धा पाण्यासाठी भांडत होती.
            'ग्रॅज्यूएशन झालं आता पुढे काय करणार?' असा प्रश्न विचारणाऱ्या वरिष्ठ मंडळीला मी उत्तर द्यायचो 'गावात शेती कारणार'. या उत्तरावर लोकं म्हणतात 'पुढे शेतात पाणीच नाही तर कशी करणार शेती? नोकरी कर, गावात थांबून काहीच फायदा नाही.' या लोकांच्या उत्तराने गावातील तरुण वर्ग शेतीला घाबरतोय.
            या उन्हाळ्यात पाहलेली परिस्थिती मला पाणी प्रश्नाकडे आकर्षित करून गेली. अजय होले आणि प्रताप मारोडे यांच्या सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी मला 'समाज प्रगती सहयोग (SPS)' सोबत काम करायला सुचवलं.”
            प्रतीकला त्याच्या कामासाठी आणि शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतीक उंबरकर (निर्माण ),

झुंज दुष्काळाशी: दृष्टीआडचा दुष्काळ
            रोजगार हमी योजना गावा-गावात पोहचवणे, पाणलोटाची कामे करणे, गावाचा-शेतीचा अभ्यास सर्वे करणे अशा वेगवेगळ्या कृतींचा समावेश असलेली निर्माणची ‘झुंज दुष्काळाशी’ ही मोहीम जून महिन्याअखेरीस नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून ७५ युवांनी यावर्षी मोहिमेत सहभाग नोंदवला. ‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनुभवलेला दुष्काळ, युवांना आलेले अनुभव आणि झालेले शिक्षण शेअर करण्यासाठी; त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा दुष्काळाच्या व्यापक सामाजिक-आर्थिक-राजकीय चित्राशी संबंध समजून घेण्यासाठी आणि युवांना न दिसलेला दुष्काळ जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथे ‘झुंज दुष्काळाशी’ चे सांगता शिबीर ३० जून ते ३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
            शिबिरात युवांनी कृती कार्यक्रमांदरम्यान त्यांना आलेले अनुभव, पडलेले प्रश्न, झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर केल्यामुळे गटाचे सामूहिक शिक्षण झाले. याशिवाय या शिबिरात विविध मान्यवरांची सत्रे झाली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस, बाटलीबंद पाणी, बिअर-मद्य कारखाने, आयपीएल या मुद्द्यांवर अश्विनीताईंनी भूमिका मांडली. या सत्रादरम्यान अश्विनी ताईंसोबत प्रश्नोत्तरी चांगलीच रंगली. ‘शहर आणि दुष्काळ’ यांचं नातं सांगताना विजय दिवाण यांनी मोठी धरणे, कुंभमेळा, औद्यागिकीकरणामुळे होणारा पाणी स्त्रोतांचा ऱ्हास समजावून सांगितला. औरंगाबाद महानगरपालिकेने केलेल्या पाण्याच्या खासगीकरणाविरूद्ध यशस्वी लढ्याची गोष्ट त्यांनी शब्दांतून उभी केली. महाराष्ट्रातील पाणी, सिंचन आणि धरणांचा गाढा अभ्यास असलेले प्रदीप पुरंदरे यांनी सरकारची असून नसलेली जलनीती, ‘कायदा आहे नियम नाही’, ‘समिती आहे मिटिंग नाही’, ‘खातं आहे अधिकारी आणि ऑफिस नाही’ हा असा जलव्यवस्थापनातला सरकारी पातळीवरचा सावळा गोंधळ खूप सोप्या पण तितक्याच अभ्यासपूर्ण शब्दांत त्यांनी युवांसमोर मांडला. दुष्काळ या समस्येसोबत तिच्या उपायांविषयीही चर्चा झाली. विजयअण्णा बोराडे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची, तर उमा असोलेकर यांनी भूजल व्यवस्थापनाची पद्धत, त्यामागील शास्त्र व विचार समजावून दिला.
दुष्काळाखेरीज युवांसाठी उपयुक्त अशी सत्रेही झाली. प्रफुल्ल शशिकांतने ‘Happiness and Meaning’ असे interactiveसत्र घेतले. युवांचे झालेले शिक्षण ऐकण्यासाठी आणि स्वतःचे अनुभव शेअर करण्यासाठी शिबिरात नायनाही उपस्थित राहिले होते. वर्ध्याला शाळेत असताना रसोईच्या कामाने भविष्यात मजूरांची किमान मजूरी वाढण्यात कसा हातभार लावला, ७२च्या मराठवाड्याच्या दुष्काळात स्वयंसेवक म्हणून गेल्यावर सार्वजनिक आरोग्याचे काय दर्शन झालं हे नायनांनी सर्वासोबत शेअर केले.
हे शिबीर आयोजित करण्यासाठी निर्माणचा त्रिशूल कुलकर्णी व मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथील त्याचे सहकारी यांनी मनापासून सहकार्य केले. शिबिराचा शेवट पुढील वर्षाचा कार्यक्रम कसा असावा, यावर युवांच्या सूचना आणि कल्पना जाणून घेत झाला.
शिबिरात ग्रामीण भागातील युवांची त्यांच्या गावाबद्दल, तिथल्या प्रश्नांबद्दल तळमळ आणखी वाढलेली दिसत होती; दुष्काळाची भीषणता वाढवण्यात शहरांच्या असलेल्या भूमिकेविषयी जाणीव झाल्यावर शहरी युवा पाणी प्रश्नाबद्दल जबाबदार दिसत होते. ग्रामीण-शहरी युवांचे एकत्र येणे; पाण्यासारख्या विषयावर चर्चा, अनुभव शेअर करणे; पाणीतज्ञांचे मार्गदर्शन असे अनुभवांनी आणि शिक्षणाने समृद्ध शिबीर औरंगाबादला पार पडले. आणि मोहिमेची ‘सांगता’ करणाऱ्या या शिबिराने खूप साऱ्या नवीन प्रश्नांना, विचारांना आणि कृतीकल्पनांना प्रत्येकाच्या मनात ‘सुरूवात’ करून दिली !
           
पाणी मागतात च्यायला
            या शिबीरातील मार्गदर्शक प्रदीप पुरंदरे यांनी त्यांच्या सत्रानंतर त्यांची पुढील कविता वाचून दाखवली.

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतातच्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतातच्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा.
पाणी मागतातच्यायला


साहेब जाऊन आले परवा चायनाला
केवढी प्रगती केली राव त्यांनीथ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनलेपयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतातच्यायला