'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 21 September 2022

शिक्षण व्यवस्था कशी असावी?

सध्याची शिक्षण व्यवस्था ही माहिती पुरवणे व काही प्रमाणात कौशल्यांचा विकास करणे यापुरती मर्यादित आहे. परंतु व्यक्तीचा आंतरिक विकास, समाजाप्रती कर्तव्यांची जाणीव आणि जीवनाचं ध्येय याकडे मात्र शिक्षण व्यवस्थेचं दुर्लक्ष होतं. याला पर्याय म्हणून महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावेंनी 'नई तालीम' या शिक्षण प्रक्रियेचा विचार मांडला. नेमकी काय आहे ही 'नई तालीम' शिक्षण प्रक्रिया? आणि शिक्षण व्यस्था कशी असावी? जाणून घेऊयात डॉ. अभय बंग यांचे मत.

‘Schooling system is for sake of schooling system’ असं आहे का? Schooling System ही शिक्षकांसाठी रोजगार हमी योजना आहे का? आई बाबांना पोरांची ८ तास कट कट नको म्हणून आहे का? खरं म्हणजे या तीनही प्रश्नांचं उत्तर हो आहे. वास्तव जर पाहिलं तर आजची Schooling System ही या तीनच गोष्टींवर चालते. व्यक्तीच्या आंतरिक क्षमता यांच्या प्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शिक्षण असतं. दुसरं – ज्या समाजामध्ये आणि निसर्गामध्ये माणूस वाढतो त्या सृष्टीचे अनेक परिणाम त्याच्यावर होतात. आणि त्या समाज आणि सृष्टीच्या प्रती त्याचं काही उत्तरदायित्व देखील असतं. या दोन गोष्टी पूर्ण करायला खरं म्हणजे शिक्षण व्यवस्था असायला हवी. आजची Schooling System हे करत आहे का? काही प्रमाणात करत आहे. पण बहुतेक वेळा मात्र मुलांना मदत करायच्या ऐवजी मारक जास्त ठरत आहे.


नई तालीम शिक्षण प्रक्रिया

महात्मा गांधी आणि विनोबांनी नई तालीम या नावाच्या शिक्षण प्रक्रियेचे खूप खोल आणि प्रगल्भ विचार मांडलेले आहेत. या नई तालीम पद्धतीची मान्यता नक्की काय आहे? एक उदाहरण समजून घेऊया. आपल्यापैकी किती लोकांना सायकल चालवता येते? तर जवळपास सर्वांना येते. सर्वांनी कोणत्या शाळेत शिकली होती का? कोणती ट्युशन लावली होती का? कसे शिकलो आपण? सायकल शिकायच्या आधी ग्रॅव्हिटी, फोर्स, व्हेलॉसिटी हे सर्व माहिती नव्हतं. बस चालवायला लागलो आणि शिकलो. अशिक्षित लोकसुद्धा कोणत्याही थिअरी किंवा क्लासशिवाय हे शिकतात. तर जीवन हे माणसाला शिकायची संधी देत असतं. सायकल आपल्याला कोणत्या शाळेत किंवा ट्यूशन क्लासमध्ये नाही शिकवली गेली. प्रत्येक मुलात ती प्रेरणा, ती इच्छा असते ती विशिष्ट गोष्ट करायची. का असते ती प्रेरणा व इच्छा हे देवालाच ठाऊक. आपले आजी-आजोबा म्हणतात की आपण पडू शकतो, लागू शकतं, तरी आपण धोका पत्करतो. ती एक प्रबळ प्रेरणा आहे जी माणसाला शिकायची संधी देते. आपण बोलायला चालायला तसेच शिकतो. बालपणी आपण बोलायला कधी शिकलो हे आपल्याला आठवत पण नसेल. बस आपण शिकलो. या देशात असंख्य महिला आहेत ज्या गवत कापतात. त्या हे काम कोणत्या शाळेत शिकल्या आहेत – तर जीवनाच्या शाळेत शिकल्या आहेत.

जीवन ही सर्वात मोठी शाळा आहे. त्यामूळे आजच्या शाळेची कमतरता ही आहे की ती जीवनापासून तोडून शिकवते. म्हणून ती अपयशी ठरते. ती अपयशी ठरते हे लोकांना दिसू नये म्हणून विद्यार्थ्यांना ९९% गुण देतात. विद्यार्थ्यांना काही येत नाही हे कळू द्यायचं नाही म्हणून शिक्षक ९९% गुण देतात आणि मग बाहेर आल्यानंतर हे दिसतं की इंजिनीयर पदवीधरांपैकी ७०% लोकांना इंजिनीयरींग येत नाही! जीवनाच्या शाळेत असं कधी घडत नाही. जीवनाच्या शाळेत सायकल शिकलो म्हणजे शिकलो! असं तर नाही ना की त्यातले ७०% मुलं सायकल शिकूनही सायकल शिकले नाहीत? ही जीवनाची शाळा मोठी सुंदर आहे आणि म्हणून नई तालीमचा विचार शिक्षणाच्या बाबतीत हा आहे की जीवन आणि शिक्षण यात फारकत नसावी.

तर नई तालीम म्हणजे काय? सरळ जीवनावर उडी घेत जीवन जगता जगता जे काही तुम्ही काम करता त्यातून शिकणे. यामुळे उलट चांगलं शिक्षण घडतं. सध्या मात्र जीवन आणि शिक्षण हे दोन कप्पे केले आहेत – पहिले २० वर्ष नुसतं शिक्षण, जीवनाचा पत्ताच नाही आणि मग एकदा शिक्षण संपले आणि पदवी हातात आली, IIT असो की TISS ची असो, मग शिक्षण बंद. मग फक्त काम करा. विनोबांच्या शब्दांमध्ये जीवनाची विभागणी अशी आहे – ‘कर्महीन शिक्षण म्हणजे आळशी शिक्षण आणि दुसरं बिनडोक कर्म म्हणजे कामच काम कर्म नाही’. म्हणून नई तालीम असं म्हणते की ‘जीवन हेच शिक्षण’ आणि जीवन जगता जगता तुम्ही अतिशय सुंदर शिक्षण मिळवू शकता. तर जसं चालायला शिकलो, बोलायला शिकलो, हे तसंच आहे.

शिक्षण व्यवस्था कशी असावी?

आता प्रश्न असा आहे की शाळा असाव्यात की असू नये? तर आजच्या स्वरूपात नाही. शिक्षण प्रक्रिया असावी की असू नये? तर जरूर असावी. पण अशी की जी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक शिक्षणाच्या क्षमतेला आणि इतर ज्या त्यांच्यामध्ये क्षमता असतील त्या जोपासेल. कल्पना करा तेंडुलकर जर चुकून IIT मध्ये गेला असता तर काय झालं असतं? विचार करा तेंडुलकर in IIT. अयोग्य माणूस अयोग्य जागीच्या शिक्षण प्रक्रियेत गेला तर काय होतं? तेंडुलकरने त्या ऐवजी सरळ हातात बॅट घेतली. त्याला आठवीमध्येच लक्षात आलं की हेच माझं जीवन आहे. त्याने तेच केलं आणि आपल्याला माहिती आहे काय झालं. बिल गेट्स यांनी काय केलं? ते हार्वर्डमध्ये होते. हार्वर्डच्या एका कॉनव्होकेशन सोहळ्यात त्यांना बोलवलं होत. तर तिथे भाषण देताना ते म्हणाले, “कदाचित पहिल्यांदा घडत असावं की हार्वर्डच्या एका ड्रॉप-आऊटला तुम्ही कॉनव्होकेशनला बोलवलं आहे.” त्यांनी BSC देखील पूर्ण केलं नव्हतं. ड्रॉप-आऊट झाले आणि “मला सरळ कॉम्पुटर बनवायचा आहे आणि यात शिक्षकांची काही गरज नाही” म्हणाले. त्यांनी Microsoft Windows तयार केलं. एडिसन ने काय केलं? त्यांच्या नावावर आज जितके पेटंट आहेत तेवढे दुसऱ्या कोणाच्या नावावर या इतिहासात नाहीत.

तर शिक्षण अश्या प्रकारच्या कर्तुत्वाला, विकासाला, Problem Solving ला तुमच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमतेला, त्या कसल्याही असोत, जोपासणारं हवं. ते करता करता त्याचे कौशल्य प्राप्त करणं ही जीवनामध्ये चांगली संधी असते.

आजची शिक्षण व्यवस्था ते होऊ देत नाही. मग अश्या Institutional Education ऐवजी De-Schooling बरं. तर शाळा आणि स्वतःच्या बाहेर सरळ जीवनात कर्तव्य आणि कर्म करता करता शिक्षण घेता येईल का? तर जरूर घेता येईल. हेच नई तालीम ही शिक्षण प्रक्रिया म्हणते. म्हणून नई तालीम ही शाळा नाही तर शिक्षण प्रक्रिया आहे.

Thursday, 15 September 2022

क्षमता आणि काम

आपल्या जीवनाचा अतिशय मोठा भाग व्यापणारं आपलं 'काम' नेमकं कोणतं हे कसं ठरवायचं?
'इंटरेस्ट' हे काम निवडण्याचं योग्य निकष आहे का?
मी माझ्या क्षमता कशा ओळखू?

असे अनेक प्रश्न तरुण - तरुणींना पडत असतात. निर्माणच्या शिबिरार्थींसोबत संवाद साधताना डॉ. अभय बंग यांनी या प्रश्नांचा उलगडा केला. खालील लेख हा त्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


मराठी मध्ये एक म्हण आहे - ''दुरून डोंगर साजरा''. एक काम करताना दुसरं काम फार चांगलं वाटतं. दुसऱ्या कामावर गेला रे गेला की अजून तिसरं कोणतं तरी काम चांगलं वाटतं. कारण करत असलेल्या कामाची अडचण वाटते आणि अडचण वाटली की माणसाला inviting वाटायला लागतं. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार विषय निवडावा, कामाचं क्षेत्र निवडावं. आपला इंटरेस्ट मात्र फार फसवा असतो. लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात असतो - तर फेसबुक, व्हॉट्सऍप, सेल्फी. इच्छा व इंटरेस्ट हे घातक मार्गदर्शक असतात. शिवाय माणसाचं मन सहसा शॉर्टकट्स, तात्काळ सुख बघतं. ते म्हणतं की तिथे काही करावं लागणार नाही, प्रयत्न करावे लागणार नाहीत, काही अडचण नसेल, इंटरनेटवर वेळ घालवता येईल. अशा परिस्थितीत इंटरेस्टच्या मागे धावणाऱ्या मनाचं ऐकावं का? अंतरमन वेगळं आहे - ते आतून खोलवरून तुम्हाला मार्गदर्शन करतं. एक सुंदर वाक्य आहे - 'If things are going easy be warned you must be descending down'. आपल्याला खाली घसरतांना, घसरगुंडीहून घसरताना किती छान वाटतं! तेच पायऱ्या चढताना किती धाप लागते! कोणालाही पायऱ्या चढायला आवडत नाही, घसरताना खूप छान वाटतं.


काम ठरवण्याचे निकष
त्यामुळे काम ठरवण्यासाठी इंटरेस्ट ही कसोटी लावू नये. जे जास्त वंचित आहेत त्यांना याची गरज आहे का? - हा झाला बाह्य सामाजिक निकष. मी जे करतो आहे त्या विषयाची, त्या कामाची समाजाला कितपत गरज आहे यालाच विनोबांनी म्हटलंय ''स्वधर्म''. माझ्या समाजाची जी गरज आहे ते तर पूर्ण करणं माझे कर्तव्यच आहे. तर एक निकष लागतो समाजाला याची किती गरज आहे हा. त्याच्यामध्ये गांधींनी आपल्याला अतिशय चांगली कसोटी सांगितलेली आहे. गांधीजी म्हणाले होते - ''तुमच्या मनात जेव्हा काय करावे अशी शंका येईल, तेव्हा तुम्ही पाहिलेली सर्वांत गरीब, हतबल व्यक्ती आठवून विचार करा की तुमच्या निर्णयाने त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो का! तेव्हा तुमच्या शंकांचं निरसन होईल.”

ही कसोटी फार सुंदर आहे. ही कसोटी abstract नाही. ती नेमकी तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीच्या रूपात बोलते. तर ही कसोटी लावून विचार करा की जे काम तुम्ही करत आहात, त्यामुळे या माणसाला काही फायदा होतो आहे का? दुसरं म्हणजे असं की त्या क्षेत्रातील टॅलेंट किंवा क्षमता असणं. तर एक - समाजाची गरज कशामध्ये आहे? त्यासाठी ही गांधीजींची कसोटी आणि दुसरं म्हणजे माझ्यामध्ये त्याची क्षमता असणं. जर हे कळत नसेल की माझी क्षमता कशात आहे तर ३-४ प्रकारच्या गोष्टी करून बघाव्यात. त्यातून जीवन हळूहळू आपल्याला दाखवतं की आपल्याला काय चांगलं जमतं. समाजाची गरज आणि माझी क्षमता यांचं चांगलं कॉम्बिनेशन कुठे आहे तिथे आपला कर्तव्यबोध असतो.


आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात?
दोन उदाहरणे पाहू. एक वेट-लिफ्टर असतो. वेट-लिफ्टिंग करतो. त्याला जर असा प्रश्न पडला की माझी क्षमता किती वजन उचलायची आहे तर त्याला ती कशी कळेल? अर्थात, वजन उचलून. तसंच आपली क्षमता किती आहे हे कळण्यासाठी एकच मार्ग आहे - त्या प्रश्नाला भिडून पाहणे – ‘Go where the problems are’. आता तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमचं पाहिलं प्राधान्य काय? IIT मध्ये मिळालेली ऍडमिशन पूर्ण करणे हे तुमचं पाहिलं प्राधान्य आहे का? की आपल्याला क्षमता आहेत की नाही हे तपासून घेणं तुमचं पाहिलं प्राधान्य आहे हे ठरवलं पाहिजे.

आता दुसरं उदाहरण पाहू. तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर गेलात. अनेक गाड्या तयार आहेत. आता लवकरच सुटणार आहेत. एका गाडीमध्ये छान जागा रिकामी आहे, डब्बा रिकामा आहे, सुंदर आहे, नरम आहे, स्वच्छ आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये थोडी गर्दी आहे. तुम्ही कोणत्या गाडीत बसायचे ठरवाल? ती गाडी कुठे जाणार आहे व तुम्हाला कुठे जायचं आहे यावर ते अवलंबून आहे. सीट रिकामी आहे IIT, MTECH, PG साठी. ती तुम्ही नाही घेतलीत तर त्या सीटचं काय होईल ते IIT वाले बघून घेतील. त्यांना दुसरा कोणीतरी सापडेलच. पण तुम्हला तिथे जायचं नसेल आणि चुकून त्या सीटवर बसलात तर काय होईल? दुसरीकडे पोहोचाल. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला आणि सिट रिकामी आहे मद्रासला जाण्यासाठी तर बसाल का? नाही.

तुम्हाला पोहोचायचं कुठे ते पहिलं ठरवलं पाहिजे. कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते हे त्या डब्यासारखं आहे. सीट मिळते आहे पण मला तिथे जायचं आहे का? जायचं असेल तर संधी घ्यावी. पण मी म्हणेन की त्याची स्पष्टता मिळवावी. अन्यथा आयुष्यातील २ वर्षे वाया जातील. ‘Every year of education conditions you.’ एकदा समजा तुम्ही मिळत असलेल्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मग पुढे क्षमतांचा विचार करायचा ठरवलात तर खूप उशीर झाला असेल. कारण ते २ वर्ष तुम्हाला Condition करतात. २ वर्षांनी निर्णय घेणं तुम्हाला जास्त कठीण होईल. तेव्हा तुम्ही विचार कराल - ‘MSc. / M.Tech. झालं - आता काही न करणे म्हणजे किती वाईट’! तेव्हा तुमचं ऍडमिशन तुमचं भवितव्य ठरवेल. पण तुमचं भवितव्य Accident of Admission नका बनू देऊ. तुम्हाला कशामध्ये क्षमता आहे आणि समाजामध्ये कशाची गरज आहे याच्यावर भवितव्य ठरवा. आणि मग त्यानुसार ऍडमिशन निवडा. हा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला काय क्षमता मिळवायच्या आहेत, कोणती कौशल्ये मिळवायची आहेत ते ठरवा.

तर मी म्हणेन की आधी जो प्रश्न सोडवायचा आहे तो थोडा समजून घ्यावा. आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि मग जर गरज पडली काही विविध गोष्टी शिकायची तर जरूर मग IIT असोत किंवा दुसरं काही असो, जिथे जाण्याची गरज आहे तिथे गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. क्षमता पूर्ण प्राप्त केल्या पाहिजेत. पण पहिलं या प्रश्नचं उत्तर शोधून घेतलं पाहिजे की ‘Is it where I want to go?’ ती गाडी नाही तर मला भलतीकडेच पोहोचवायची. शेवटी रेल्वे स्टेशनवर गेलेला एक अनाडी प्रवासीदेखील योग्य गाडी निवडण्याचा शहाणपणा दाखवतो. पण शिक्षणाचा मार्ग निवडताना आपण सगळेच तो शहाणपणा का दाखवत नाही?



Tuesday, 6 September 2022

'मी' नावाचा गुंता

 

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सातत्याने व वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे अनेक कारणांसाठी आवश्यक ठरते. ‘मी’पणाच्या गुंत्यात मी अडकलो आहे का? – हे तपासून पाहणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण. पण नक्की काय व कसा असतो हा ‘मी’पणाचा गुंता?

निर्माणच्या एका शिबिरात डॉ. अभय बंग यांनी उलगडला 'मी' नावाचा गुंता! खालील लेख हा डॉ. अभय बंग यांनी शिबिरार्थींसोबत साधलेल्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


माझा रस कशात आहे?

जरी आपण एखादा प्रश्न सोडवतोय असं आपल्याला वाटत असलं तरी अखेरीस आपण वेगळ्या समस्येशी लढत असतो. ती समस्या आहे आपण स्वतः - ‘I is the problem. आपण कितीही म्हटलं की समाजाचे प्रश्न सोडवतोय तरीही आपल्याला त्या प्रश्नात रस नसतो. आपल्याला रस असतो स्वतःमध्ये. आणि आपला - ‘स्व’चा गुंता सोडवण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्या बाह्य समस्येवर फार उर्जा लावत नाही. आपलं सतत सुरू असतं – ‘मी इथे असायला पाहिजे होतं की अजून कुठे असायला पाहिजे होतं?’ असं सारखं  ‘मी.. मी.. मी..’ सुरू असतं.

प्राधान्य कशाला – सामाजिक प्रश्न की स्वतःचा प्रश्न?

पाण्यातल्या शक्तिशाली भवऱ्यांचे इतके सामर्थ्य असते की ते अख्ख्या जहाजाला गिळून घेतात. परंतु, ह्या प्रचंड फिरणाऱ्या भवऱ्यांच्या मध्यभागी काही नसतं. भवऱ्याच्या गतीमुळे पाणी फिरतं आणि मध्यभागी एक  ‘Illusion’ निर्माण होतं. मनुष्याचं मन हे भवऱ्यासारखं असतं. ते एका ‘मी’ च्या भ्रमाभोवती फिरत असतं. आपण बहुतेकजण जेव्हा समाजातील किंवा वास्तवातील कामाला भिडतो, तेव्हा आपण त्या समस्येला भिडत नसतो. आपण मानसिकदृष्ट्या पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो हा की बहुतांश लोकांच्या बाबतीत काम सुरू करण्यापूर्वीच पुढचे निर्णय झालेले असतात. ‘इथे एक वर्ष करुन मग मास्टर्सला प्रयत्न करेन. मग ते मास्टर्स कशात करायचं?’ असे प्रश्न आधीपासून पडतात. त्यामुळे आपण त्या समस्येला गांभीर्याने भिडतही नाही. म्हणून फार काही त्यातून घडत नाही. सामाजिक काम करायला नाही, तर आपण स्वतःचा प्रश्न सोडवायला जात असतो. आपल्याला कशात रस आहे ते पाहत असतो. पण त्याला काही आपला दोष नाही. शिक्षण व्यवस्था, करिअर, कुटुंब, आई-वडील, सगळे असंच घडवतात आपल्याला. म्हणून आपण त्या सापळ्यात पडलेलो असतो. पदव्युत्तर शिक्षण कुठून घ्यायचं हे शोधण्यात उर्जा खर्ची पडत जाते आणि म्हणून मूळ समस्येबाबत तसं ठोस काही घडत नाही. त्यतून असा प्रश्नही निर्माण होतो - समस्या सोडवयला जे शिक्षण पाहिजे ते त्या समस्येवर काम करतानाच नाही घेऊ शकत का? पण सहसा ते करायचं धाडस कोणी करत नाही. बहुतेकांना MTech, MD, PHD हेच आकर्षित करतात.


दिशाहीन क्षमता विकास काय कामाचा?  

एके वर्षी मी २ ऑक्टोबरला हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी उपस्थतीत होतो. तिथे श्रोत्यांमध्ये जवळपास १०० भारतीय विद्यार्थी होते. त्यातही बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी. त्यांना भेटून 'तुम्ही काय करणार?' असे विचारले असता प्रत्येकाचे उत्तर – ‘माहित नाही, कोणीतरी जॉब देईल, कोणीतरी डेटा ऍनॅलिसिस करायचे काम देईल, कोणीतरी संशोधनात समाविष्ट करेल, आमचे शिक्षक काहीतरी प्रोजेक्ट देतील’ - असेच काहीसे होते. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, जगातील उत्कृष्ट व मानांकित विद्यापीठांमधील हुशार विद्यार्थ्यांची ही उत्तरे होती. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था एखाद्या समस्येला तोंड देण्यासाठी लागणारे – Confidence आणि Competence – दोन्ही देत नाही. शैक्षणिक व्यवस्थाच विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. मग ती असुरक्षितता पदवी प्राप्त करूनदेखील पुरेसं ज्ञान नसण्याची असो किंवा थेट एखाद्या प्रश्नाला भिडून काम करत ज्ञान प्राप्त करणे मारक ठरण्याची भीती असो. म्हणून मग क्षमता वाढवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय स्वीकारला जातो. मुळात उच्च शिक्षण घेणे व क्षमता वाढवणे गैर नाही. पण क्षमता वाढवून कोणत्या समस्येवर काम करणार ते ठरवणे गरजेचे असते. अनेकांना कुठे जायचं हे ठाऊक नसतानाच गाडीत बसायची घाई झालेली असते. जर आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या निर्णयामुळे वाया घालवायची नसतील तर मी म्हणेन की जीवनातील समस्यांना सामोरे जा. आणि तेही पुढील शिक्षणाचा विचार न करता. ती समस्या सोडवायचा प्रयत्न करा.

चुकाल तेव्हा शिकाल

समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना अडचणी येतील. कारण सुरवातीला Competence कमी पडू शकतो. पण ती तर सुरुवातच असते. आज माझं वय ६७ आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी एकही काम असं केलं नाही ज्यात मी चुकलो नाही. ५० वर्षांच्या अनुभवानंतरही जेव्हा मी एखादं काम करतो तेव्हा पहिले मी चुकतोच. चुकतो आणि मग त्यातून मी शिकतो.

गांधीजींनी लिहिलेल्या एका पुस्तकातील प्रसंग सांगतो. वर्ष होतं १९४६. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना गांधीजींच्या मनात प्रश्न निर्माण झाले - देशाच्या आरोग्याचं काय? खेड्यापाढ्यामध्ये आरोग्याचं काय होईल? गांधीजी त्या प्रश्नाच्या मागे लागले. पुण्याला मेहेता नावाचे एक डॉक्टर होते. Naturopathy करायचे. गांधीजी स्वतःचा उपचार इथे करायचे. तिथेच एक संस्था स्थापन करून गांधीजींनी ठरवलं की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेच्या प्रश्नावर काम करायचं. प्रश्नाची व्याप्ती समजून ते स्वतः कामाला लागले. पण १५ दिवस काम केल्यावर त्यांनी एक वाक्य लिहिलं - ''I was a fool''. त्यांचं म्हणणं होतं की इतके दिवस काम केल्यावरदेखील त्यांना समजलं नाही की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेवर काम करण्यासाठी पुण्यात न राहता खेड्यात जाणे आवश्यक आहे. त्यांनी हे सर्वांसमक्ष मान्य केलं. गांधीजी ही चूक करू शकतात, मग आपण तर फार छोटे आहोत. म्हणून अपयशी होणं, गोंधळून जाणं यामुळे वाईट वाटून घेण्याची गरज नसते. सामाजिक समस्या सोडवणं खूप सोपं असतं तर आपली गरजच पडली नसती.                

कामातूनच होते ‘स्व’ ची ओळख

‘मला तो प्रश्न किती भिडला? मला तो प्रश्न किती हलवतो? मी त्यावर अवलंबून आहे का? की आता सर्व सोडून पळू आणि विद्यापीठाचा आसरा घेऊ? की जीवनाचा विद्यापीठामध्येच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू?’ – असे अनेक प्रश्न पडत असतात. आज कितीही अंधार असला तरी उद्या सूर्य उगवणार आहे असा आंतरिक विश्वास असणं महत्त्वाचं असतं. म्हणून SEARCH या आमच्या संस्थेचा लोगो जर पाहिला असेल तर अंधारामध्ये आडवी-तिडवी वाट आहे, काटेरी आहे, फार काही रुळलेली, मांडलेली नाही. तो राजमार्ग नाही. पण ती अंधारलेली वाट सोडण्यासाठी, एक नवी वाट शोधण्यासाठी, एक विश्वास पाहिजे. तो विश्वास पाहिजे निर्माण कसा करावा? तो टीकवून कसा ठेवावा? जेव्हा ठेच लागते, गोंधळलेलं वाटत असेल, तेव्हा तो विश्वास कसा निर्माण करावा? मी असं मानतो की आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळलं आणि तो जर नुसता भौतिक खेळ नसेल तर त्या सोबत विश्वास येतो. तो विश्वास आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला भाग पाडतो – ‘या कर्तव्याशिवाय मला गत्यंतर काय? – If not this, then what else?’ आपल्याला या ठेचा खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जितक्या ठेचा खाऊ तेवढेच एक पाऊल पुढे जात राहू. हाच विश्वास निर्माण होण्याचं दुसरं कारण असू शकतं प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केलेल्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं वाचन. ते प्रेरणादायी असतं. इथे गांधीजींच्या आयुष्यातील एका प्रसंगांचे उदाहरण घेता येईल. गांधीजींचे वडील मरण पावले होते व इतर भावंडे जास्त शिकले नव्हते. वकिली करून गांधीजीनी घरी सुख व समृद्धी आणावी म्हणून कर्ज काढून त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं गेलं. शिकून भारतात परत आल्यावर मात्र गांधीजींना आपली वकिली चालत नसल्याचा अनुभव आला. १ – २ वर्षे प्रयत्न करून मग गांधीजी दक्षिण आफ्रिकेत एका वकिलाचे सहकारी म्हणून काम करू लागले. खरंतर, ब्रिटनमधील बॅरिस्टरची पदवी ही मोठी पदवी मानली जायची, अगदी आजच्या काळात IIT सारखी. पण पदवी असूनदेखील येत काही नाही हे लक्षात येताच गांधीजी आफ्रिकेत गेले. तिथे त्यांच्यावर एका मागे एक अपमानाचे प्रसंग कोसळले. Pietermaritzburg या ठिकाणी तर त्यांना ट्रेनमधून फेकून दिलं गेलं. अपमानित मनस्थितीत ते तिथेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्रभर कुडकुडत राहीले. ब्रिटनमध्ये त्यांनी असा भेदभाव पहिला नव्ह्ता. त्या क्षणी भारताचं तिकीट काढून घरी परत जावं असं वाटत असल्याचं त्यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केलं आहे. ‘किती कठीण आहे अवस्था! इथे लोक अपमान करतात, वाईट वागतात! मी काय करू? पळून जाऊ का परत भारतात?’, असं मनात विचारांचं काहूर सुरु होतं. पण गांधीजी तिथेच थांबले. त्यांना तिथे स्वतःचे ध्येय सापडलं. स्वतःप्रमाणे इतर भारतीयांचाही जो अपमान होत आहे त्यासाठी न्याय मिळवण्याचा निश्चय त्यांनी केला.

मी स्वतः Pietermaritzburg येथे जाऊन आलो आहे. माझ्यासाठी ते एक तीर्थक्षेत्रच आहे. गांधीजींच्या जीवनातील त्या क्रांतिकारी दिवसाला जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रध्यक्ष होते. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व ओळखून त्यांनी त्या रेल्वे स्थानकात गांधीजींचा पुतळा आणि एक वेटिंग रूम तयार करून घेतली. १९९६ साली त्या पुतळ्याचे अनावरण करताना मंडेला म्हणाले होते, “गांधी नावाचा बॅरिस्टर भारताने आम्हाला पाठवला आणि २० वर्षांनी आम्ही भारताला एक महात्मा परत पाठवला.” गांधीजींनी अविकसित देशांतील जनतेच्या हाती वसाहतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक शस्त्र दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तो मोहनदास करमचंद गांधी नावाचा स्थित्यंतराचा क्षण आपल्याही जीवनात येतो. जेव्हा आपल्याला पाणी प्रश्न कठीण वाटतो, जेव्हा आरोग्य सेवा कशी द्यायची हे कळत नसते, जेव्हा एखादा ‘Governance Issue’ सोडवता येत नसतो, तेव्हा तो आपल्या जीवनातला ‘प्लॅटफॉर्म’ असतो. त्या क्षणी आपण काय निर्णय घेतो यावर आयुष्याची गाडी पुढे कुठे जाणार आहे हे ठरतं. सुदैवाने, मोठ्या संकटांतून जावं लागणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असतं. त्या उदाहरणांना भेट दिली पाहिजे. कठीण परिस्थतीत अनेकदा शैक्षणिक व्यवस्थेचा आसरादेखील घ्यावासा वाटतो. विद्यापीठांनी जणू विद्यार्थ्यांना प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं – When you face a problem come back to us for higher education. भीती वाटली की एखादं बाळ आईच्या कुशीत जात तसंच काहीसं असतं हे. पण एका टप्प्यानंतर आईकडे जाता येत नसतं. आपल्यासमोरील समस्या आपल्यालाच सोडवावी लागते. तो प्रश्न सोडवताना आपल्यातलं Unknown हे Unfold होत असतं. ते झाकण दूर होताना त्रास होतो. ‘माझ्यात काय क्षमता आहेत? मी काय करू शकतो?’ – या प्रश्नांना सामोरे जाताना त्रास होतो. पण ते झाकण जर आपण दूर करू शकलो तर त्या समस्येला भिडता-भिडता आपल्याला स्वतःचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूती – ‘मी कोण आहे? कसा आहे? माझ्यात क्षमता काय आहे?’ इतरवेळी आपण केवळ अंदाज बांधत असतो. प्रत्यक्ष माहिती नसतं. सध्याची पिढी ‘सेल्फी’मध्ये अडकून पडली आहे. पण ‘सेल्फ’ काय आहे? ‘तू कोण आहेस?’असं विचारलं तर तरुणतरुणी गोंधळून जातात. ‘Self is like a Ray of Light – the ray is invisible when it passes but it becomes visible when it falls on an obstacle.' बस आपणही असेच आहोत. एका खोलीत बसून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होत नसते. एखाद्या आव्हानाला धडक दिल्यावरच आपल्याला स्वतःच्या क्षमता, मर्यादा व आत्मविश्वासाची जाणीव होते. स्वतःचे सगळे भ्रम दूर होतात. 'स्व' ची ओळख होते. म्हणून ‘सेल्फ’ काय आहे हे समजून घेण्यासाठी सेल्फी घेऊ नका. थेट एखाद्या प्रश्नाला भिडा.



एक जन्म तुमचा आईच्या पोटात झाला. दुसरा जन्म तुमचा तुम्ही स्वतः करणार आहात. जेव्हा तुम्ही समस्येला भिडाल, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. तेव्हा तुम्हाला स्वतःचा साक्षात्कार होईल – Who  am I, What am I & Whose am I? या तीनही प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. मग या दुसऱ्या जन्माचं बाळंतपण स्वतः करावं लागेल. स्वतःच स्वतःला जन्म द्यावा लागेल.

Wednesday, 31 August 2022

NIRMAN Selection Process: A Period of Momentous Happenings!

After a long beak of over six months packed with invigorating workshops, outdoor publicity visits & much more, Simollanghan is back! With these enriching experiences in the last few months, we are ready to bring to you thought-provoking articles by Dr. Abhay Bang, inspiring journeys of young budding social change makers & the important updates about SEARCH, NIRMAN & Nirmanites.

 

Selection Process – NIRMAN 13

The journey of a young Nirmanite usually begins with the Selection Process. Each step in this process is a means to move forward to the next step while simultaneously being an end in itself. Over the last decade, thousands of youth, irrespective of their selection for the workshop, have benefited by participating in this process.

Use the link below to know how NIRMAN Alumni have gained intellectually by participating in the NIRMAN Selection Process.

https://youtu.be/Qv3ob9LIfpU

 

Application Form – An Introspective Tool

The first step in the process is the ‘Application Form’. The precisely curated questions in the form, seldom asked or discussed, make the applicant introspect about his / her own life & future as well as about the external of which they are an integral part.

An excerpt from the application form is given below –

Please tell us about a person (apart from your parents) who has had a major influence on you. Why do you think so?

What kind of work do you intend to do after your education/ if already working, what are you doing? What was your thought process while taking the decision?

The NIRMAN Application Form consists of more such intriguing questions about self as well as society. To view the application form, use the link below –

https://nirman.mkcl.org/doc/NIRMAN_Application_Form.pdf

Use the below link to watch a short video wherein Amrut Bang, Program Director – NIRMAN, explains the ‘Why & What’ of the Selection Process, revealing the real meaning of the word ‘Selection’ in NIRMAN’s context.

https://youtu.be/beBiFIDa9sw

Applications for NIRMAN 13 Batch are currently being invited till the 10th of September, 2022.


And the journey continues…

Post the submission of Application Forms, selected applicants are invited for a ‘Consultative Interview’ at the end of which they are given certain ‘Assignments’ which are to be submitted by a mutually decided deadline. Both the ‘Interview’ as well as the ‘Assignments’ are structured & suggested in a way to ensure that they add value to the concerned individual simultaneously allowing the team to get an insight about the current state of mind as well as the thought process of the interviewee. The selected cohort of approximately 150 youth are invited to Shodhgram, Gadchiroli, for NIRMAN Workshop & the journey continues in the form of a lifelong association.

 

Begin your journey today!

With enough curiosity created about the NIRMAN Selection Process, it is an ideal time to start your NIRMAN journey. Visit our website https://nirman.mkcl.org/ to know more about NIRMAN. Fill up & submit the Application Form (https://nirman.mkcl.org/doc/NIRMAN_Application_Form.pdf) & embark on a ‘Quest For Purposeful Life’!

If you have already been a part of the NIRMAN Workshops, do spread the word & help the young budding social change makers around you to start their search for a Meaningful & Flourishing life!




Thursday, 3 February 2022

The Perfect Alignment

 

Pravin Mulay is an Alumnus of NIRMAN 9. Pravin has completed his M.Tech from IIT Bombay. Currently, he is working with Farmers For Forests as a Research Associate.


Shodhgram - An area of 45 acres of land covered with greenery. With the atmosphere filled with enthusiasm as well as curiosity, a drone takes off to capture aerial views of the green cover. Taking successful aerial shots of the hundreds of trees spread across Shodhgram using the GIS technology, the drone lands safely. The man working on this concept of identifying & capturing the images of tress as well as assessing their carbon sequestration potential using machine learning is a 25 years old Emerging Adult, Pravin Mulay. 




An alumnus of IIT Bombay, where he completed his M.Tech; Pravin, belongs to the Karjat tehsil of Ahmednagar district & works as a Research Associate with the Farmers for Forests. Farmers for Forests is a not-for-profit organization working to protect & increase India’s biodiverse forest cover in close partnership with rural communities.


Formative Years & The ‘NIRMAN’ Turn

His M.Tech. years proved to be crucial in determining Pravin’s journey. He became a member of Group for Rural Activities (GRA) at IIT Bombay which worked on understanding different social issues as well as having a dialogue with people working on those issues, solidifying his social inclination. His associates at IIT Bombay later informed him about NIRMAN which brought about the turning point which he was waiting for.


“I got the answers of what I had to do, why I had to & how I had to at NIRMAN. I learnt the importance of going deep & understanding an issue from a local as well as global perspective. Instead of rushing for a solution, I tried to understand the issues of farmers as well as climate change in depth. I increased my reading & made field visits. I tried to understand the various problem solving approaches used by organizations and ruthlessly assess them analyze them on scientific basis,” says Pravin. 

 

The Quest for Purposeful Life

Pravin also shares how he charted his ‘Purpose’ journey. Pravin states, “Acharya Vinoba Bhave’s model of Swabhav-Swadharma-Yugdharma was crucial in me finding my purpose. I knew my nature which was apt for a research role. Looking around & witnessing the distressed state of farmers, I was aware of my duty to contribute for their well-being. Farmer for Forests ultimately provided me with the opportunity to also work on the climate change issue which was both universal as well as one of the most important factors leading to worrisome plight of farmers. It was a perfect alignment of what was required, what I liked & what was potential.”


Not just the perfect alignment of options, but Pravin’s thought process proved to be equally important in his decision making.  He thought more about his own financial needs rather than chasing salary packages & asked himself what he really wanted rather than succumbing to peer pressure. His intention to make appropriate use of his education for general problem solving was crucial & so was his communication with parents. Instead of bluntly declaring his decision to work in social sector, Pravin focused on explaining his parents why he himself felt important to work in social sector. Indeed, things were not easy, yet Pravin’s thought process drove him to stay on the course of his purposeful journey.

 


Working on ‘Something Important’


According to Pravin, the operating model of Farmers for Forests, which is based on the concept of Payment for Ecosystem Services, is a unique combination wherein both the issues of farmers as well as climate change are tackled. “Conserving & adding to the green cover is essential to mitigate climate change. At the same time, it will also benefit the farmers who will get an additional income for conserving green cover,” claims Pravin. He furthers adds that transition to renewable energy sources is time consuming while the issue of climate change needs urgent action from us leaving us with the choice of capturing carbon. The current technologies to capture carbon are costly & so,
plantation of trees is the only feasible choice for carbon capture.




Pravin’s role as a Research Associate has proven to be instrumental in the organization making effective use of technology in their modus operandi. “I had been a keen observer of various projects during my academic years & always was curious about machine learning. It was all about application of what I knew to develop the solution to the problem I saw”, says Pravin. He also adds, “I am satisfied with my role as I am able to use my technical skills for an important activity in the organization. I can say that finally I am contributing to ‘something important’.

Pravin’s journey is an example of how youth can align their profession with their purpose. Moreover, he unfolds a beautiful process for those in search of their purpose. 



Tuesday, 25 January 2022

संवाद महेश एलकुंचवारांशी

मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नाटककारांपैकी एक श्री. महेश एलकुंचवार यांना निर्माणच्या शिबिराला आमंत्रित करण्यात आले होते. पुढील लेख हा श्री. महेश एलकुंचवार यांनी शिबिरार्थींना केलेल्या मार्गदर्शनाचे तसेच शिबिरार्थींसोबत झालेल्या प्रश्नोत्तराचे संक्षिप्त स्वरूप आहे.



माझे प्रेरणास्थान काय?

 मी लिहायला जेव्हा लागलो तेव्हा प्रत्येक वेळेला मला कळत नव्हतं की प्रेरणा वगैरे असं काही असतं. लिहायला लागलो आणि माझी नाटकं यायला लागली. तेव्हा तेंडुलकर तारीफ करायचे, गिरीश कर्नाड तारीफ करायचे. कोणी वेगळंही लिहून देण्यास सांगितलं. त्यावर म्हणायचो, “असं मला जमणार नाही. मला जसं जमतय तसंच मी लिहिणार. ज्यांना आवडतं ते लोक माझी नाटकं करणार, ज्यांना आवडत नाही ते नाही येणार.” तेव्हा माझी प्रेरणा काही विकण्यासाठी नव्हतीच. मी पूर्वीपासून सतत ऐकतोय की लेखकांना हजारो लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. मग लोकांना जे आवडतं ते चमचमीत मनोरंजन करणारं ते लिहतात. मला हा प्रकार भ्रष्ट वाटतो. शेकडो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे जे शुद्ध स्वरूपात आहे त्यात पाणी घालून पातळ करणार का? तुम्हाला जे मूलभूत स्वरूपात सापडलं आहे, ते इतकं महत्त्वाचं असेल तर त्यात पाणी घालून पातळ करणं गैर आहे.

  कमर्शियल लिहिणारे असे बेलेले असतात. लोकांना काय आवडतं? मग ते ज्वलंत आहे का? लिहा! असं का लिहितात? कारण त्यांच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. त्यांना आयुष्यातून काय पाहिजे हे कळत असेल नसेल पण त्यांची प्रेरणा जर अमुक काही मिळवण्याची असेल तर ते त्याप्रमाणे लिहितात. मलापण बरीच वर्ष कळलं नाही की मी असंच का लिहितो. पण मला असं लक्षात आलं की मला एवढंच हवं - इतरांपेक्षा स्वतःशी संवाद साधण्याचे माध्यम. मला माझ्या मनातलं सांगायचयं. मग मनातलं सांगायचयं. तर कोणाला सांगायचे? कोणी वाचक तर पाहिजे ना.

  हे 'जीवन' आहे ते मूलभूत आहे, हे कळल्यानंतर असं वाटलं आपल्याला तर काहीच लिहिता येत नाही. एक क्षणही पकडता येत नाही आपल्याला. आता मी लेखक आहे. आयुष्यातील एक क्षण पकडतो आणि त्या क्षणाबद्दल लिहितो. पण त्या क्षणाच्या प्राणशक्तीला मला भेटताच येत नाहीये. याचं कारण की जीवनाची प्राणशक्ती मला कळलीच नाहीये. लेखकाची धडपडत तीच असते. प्राणशक्ती सापडली पाहिजे जीवनाची! ती आपण जे काम करतो त्यात असते. ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काही नाही. त्या गोष्टीचे हिशोबच वेगळे आहेत. ती मिळेल तोवर आपण काहीच यशस्वी झालो असं वाटत नाही. मी स्वतःला पराभूतच लेखक समजतो. कारण बुद्धीच्या पातळीवर आकलन झालयं, पण त्यापलीकडे काही घडलेलं दिसत नाहीये. माणसाने आशा सोडू नये. इथे मी माझ्याबद्दल बोललो. इथे माझ्या सौंदर्य कल्पनांची आसक्ती जाऊन तिथे सौंदर्यानुभव आला. त्यानंतर मूलभूत सौंदर्य कशाला म्हणावं हे कळू लागलं आणि हे सगळं घडण्यामागे या ललित कलांचा फार मोठा हात आहे, हे तर नक्कीच. माझी मूळ प्रेरणा स्वतःला व्यक्त करण्याची होती, माझा जो जीवनाचा मार्ग आहे तो सांगायची होती.


कामामागील प्रयोजकता काय?


कुठल्या प्रेरणेने तुम्हाला हे सामाजिक काम करावंसं वाटतं हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का? मी इथे येऊन हे काम का करतोय? इथे येण्याच्या मूळ प्रेरणेपासून दूर सरकून दुसरे काही हेतू मला चिकटले आहेत का? लेखकांचा, कलावंतांचा अध:पात इथूनच सुरू होतो. मी येतो, लिहू लागतो. माझ्या डोक्यात इतकंच असतं की आपण मस्त लिहितोय. लिहिल्यानंतर अचानक ते गाजतं. चार पैसे मिळू लागतात. मग सगळं आपोआप बदलतं. तडजोड होऊ लागते

मला माझा जीवनाचा मार्ग शेअर करायचा आहे. माझं जे काही संचित आहे, ते मानवाचं संचित आहे. महेशचं संचित नाही आहे. माझं नाव महेश आहे हा एक्सीडेंट आहे. हे संचित सगळ्यांसमोर व्यक्त करायचं, ते बाजूला राहून मग दुसरे बाहेरचे हेतू मनाला चिटकतात आणि हे चटकन होतं कलावंतांच्या बाबतीत. गाणाऱ्यांना तर मी विचारतो, का हो तुम्ही एक भजन, एक ठुमरी, एक टप्पा कशाला गाता? यावर ते म्हणतात कसे , ‘नाही हो लोकांना हल्ली तेच पाहिजे असतं.  लोकांना पाहिजे असतं तेही द्या. पण गंगुबाई असं नव्हत्या कधी म्हणत, केशव बाई नव्हत्या कधी म्हणत. त्या म्हणायच्या तिथेच खाली उतरायला लागतो आपण. असं तुमचं सामाजिक काम करणाऱ्यांचं होतं का? बाहेरचे हेतू असतात का? ते चिकटतात का? ते चिकटल्याने तुमच्या कामाचं काय होतं? ते करून कामाचा फायदा होतो की तुमचा फायदा होतो? मुळात हे प्रश्न तुम्हाला पडतात का?

मी समाजाची सेवा करत नाही याबद्दल कधीही मला अपराधीपणाची भावना वाटली नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी मला असं सांगितलं की तुम्ही समाजासाठी काही करीत नाही. तुम्हाला याची शरम वाटली पाहिजे. एक पुण्याचे समाजसेवक आहेत. ते आता लेखकही झालेले आहेत. त्यांनी तर मला पहिल्याच भेटीत 'अरे बैला' अशी सुरुवात केली.’ रे बैला! काही समाजासाठी लिहीत जा’.  पण मी जे लिहितोय ती समाजातीलच माणसं वाचतायेत. चारच असतील पण ती वाचतायेत आणि नाही वाचलं तर त्याने काही फरक पडत नाही. पण हा काय तुमचा अहंकार आहे? मला कळत नाही. मला काही गिल्टी वाटत नाही. मी प्रयत्नही केला त्याचा, मला काही वाटत नाही. 'आपण समाजासाठी काही करत नाही' परंतु मला असं वाटलं की मी असं का समजतो समाजासाठी काही करत नाही? मी लिहितोय, अत्यंत गंभीरपणे लिहितोय. ते गुणात्मकदृष्ट्या उत्तम आहे की लहान आहे तो मुद्दा वेगळा. पण मी जे लिहितोय त्याला कुठलेही हेतु चिकटले नाहीत, तोपर्यंत समाजासाठीच काहीतरी करतोय.

पण अशीही माणसे भेटली की ती म्हणाली तू योग्य मार्गावर आहेस. पैशाचं म्हणाला तर मला काहीच फरक पडत नाही. वर्षांची माझी वर्गणी जर सांगितली तर मला सुद्धा हसू येईल. माझा एक महिन्याचासुद्धा खर्च निघणार नाही. साधा राहण्याचा! हे डागाळू नये असा मी प्रयत्न केलाय. मला भौतिक पातळीवरचे यश खूपच मिळाले. पटापटा मिळत गेलं. परंतु त्यामुळे माझे अग्रक्रम बदलले असं मला वाटत नाही. आताही मला जसं वाटतं तसंच लिहितो. माझी, पुस्तकाची एक हजारची प्रत निघते. ती खपायला पाच ते सात वर्ष लागतात. म्हणजे वर्षाकाठी शंभर ते दीडशे प्रति दहा-अकरा कोटींच्या महाराष्ट्रात खपतात. यावरून तुम्हाला कल्पना येईल की लेखक हा किती बिनमहत्त्वाचा आहे आपल्या देशात. पण त्याने काहीच फरक पडत नाही. याचं कारण असं की मी कोणासाठी करीत नाही. मी स्वतःसाठी करतो. माझा वयक्तिक प्रवास होतोय का? पुढे जातोय की मागे जातोय हे मला महत्त्वाचं वाटतं. तुमची प्रेरणा अशी आहे का की स्वतःचा प्रवास होतोय म्हणून हे महत्त्वाचं आहे की फक्त जगाचं भलं करायचं आहे? याचा विचार करावा.

 

Aesthetics व सौंदर्यानुभव

Aesthetics वर खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. मी फक्त माहितीसाठी काही वाचत नाही. याचं कारण असं की नुसती इन्फॉर्मेशन किंवा माहिती डोक्यात कोंडून काही होत नाही. त्याचा अनुभव जोपर्यंत होत नाही तोवर त्याचा काहीही अर्थ नाही. अनुभवच लागतो. मला कोणीजरी सांगितलं गुलाबाचं फूल असतं, रंग त्याचा असा असतो, सुवास असा असतो. पण सुवास म्हणजे काय ते अनुभवानेच येणार! फक्त परीक्षेला बसून गुलाबाच्या फुलाचं वर्णन करून दहा पैकी दहा मार्क मला मिळतीलही पण मला अनुभव काहीच  मिळणार नाही. म्हणजे मला गुलाब कळलेलाच नाही. सौंदर्यानुभव ही गोष्ट आली की आपोआप त्यात काही गोष्टी जुळलेल्या असतात, अशी माझी समजूत आहे. हे वाचनाने, संगीताने होतं. पण कसं होतं? ती केमिस्ट्री काय हे मला कळत नाही. पण हा फरक मी डोळ्यांनी इतरांच्याही आयुष्यात पाहिलेला आहे की जसजसं वय वाढत जातं आणि या कलांचा संपर्क आल्यानंतर आपण  या कलांमध्ये खोल खोल जाऊ लागतो तसे तसे  हे बदल आपोआप आपल्यात घडत जातात. यात फक्त माझाच नाही तर इतरांचाही अनुभव आहे. याचं कारण असं की, मूलभूत/ महत्त्वाचं सौंदर्य म्हणजे काय? हे आपल्याला कळू लागतं. सौंदर्याची प्राणशक्ती कळू लागते. आपल्याकडे सौंदर्याच्या कल्पना फार बटबटीत आहेत. फेविकॉलचा राजवाडा बनवतात व त्याला 'कला' म्हणतात. आता ज्या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक म्हणजे बॉलिवूड नट-नट्यांचा नाच असं राज्यकर्त्यांना वाटतं तर तिथल्या व्यवस्थेविषयी बोलायलाच नको. परंतु अभिजात सुंदर काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला ह्या आसक्तीच्या पलीकडे जायला हवं.

साहित्यातून संपन्नता

महाभारतात जे नाही ते जगात कुठेही नाही हे खूप खरं आहे. सर्व प्रकारची माणसं, जीवनाच्या अनेक कळा आणि या सर्वांना कवेत घेणार असं एक काहीतरी जीवन. म्हणजे बघा आपले धर्म, आपली विचारप्रणाली हे सगळं एका छत्रीखाली आहे, ती छत्री म्हणजे जीवन. जीवनापेक्षा मोठे ते काय! नंतर ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न मी केला. पण ते खूप अवघड आहे समजायला. म्हणून त्याची भाषांतर मी एक दोन वर्षे वाचली. पाश्चात्त्य वाङ्मयसुद्धा वाचावं. कारण यात असा भेदभाव करून चालत नसतो.

कुठलीही कलाकृती तुम्हाला कुठल्या पातळीवर संपन्न करेल याचा भरोसा नसतो.'Grapes of Wrath'  यासारखी कादंबरी वाचताना काही जागा अशा येतात की संपूर्ण अंगावर शहारा येतो. डोळ्यात पाणी येतं. ती नुसती सुंदर जागा असते म्हणून नाही तर जीवनाबद्दल काहीतरी मूलभूत सांगितलेलं असतं. तिथे त्या क्षणी तुम्ही संपन्न होता. तुम्हाला त्यातला एक प्रसंग सांगतो. दुष्काळी अमेरिकेमधून माणसांचं स्थलांतरन चालू होतं. प्रचंड दुष्काळामुळे माणसं पटापटा मरत आहेत. दक्षिण अमेरिकेतून माणसं पुढे प्रवास करत आहेत. भयंकर परिस्थिती. कुटुंब विभागलेली आहेत, माणसं दुरावलेली आहेतम्हातारा कुडकुडत एका भागात येतो आणि तो मरणासक्त झालेला असतो. तो झोपडीपाशी येऊन पडतो. तिथे एक मुलगी आपल्या बाळाला अंगावर दूध पाजत असते. तिला दिसतं की हा भुकेने मरतोय. तर ती आपलं स्तन्य त्याला देते! हा तो क्षण आहे! आता याच्याहून अनोखा क्षण साहित्यात मला कुठे भेटला नाही. तिथे विलक्षण झेप लेखकाने घेतली आहे. हा एकच क्षण असेल पण तो उन्नत होऊन गेला आहे.

कोणाला कुठून, काय, केव्हा भेटेल हे माहीत नसतं. म्हणून अखंड वाचत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कितीही कामात असला तरी वाचत असले पाहिजे. आता काय वाचायचं? तर सगळं! तुम्हाला असं झालंय का कधी की आपण असं काम करतोय समाजात? हे देखील एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण स्वतःला शोधतोय. काही वेगळे शोधतोय असं वाटतंय की फक्त लोकांना सुखी करणं हेच वाटते? हे प्रश्न अवघड आहेत. तुम्हाला पडत असतील हे प्रश्न. एकदा स्वतःच्या प्रेरणांचे स्वरूप जर कळलं ना, तर मग पुढचा प्रवास जरा सोपा होतो असं मला वाटतं. माझ्या मनात मी समाजसेवा करत नाही, याबद्दल थोडीही अपराधी भावना नाही. याचं कारण असं की मला माझ्या प्रेरणांचा गांभीर्य कळलं. मग म्हटलं ठीक आहे मी हेच काम करणार.


निसर्गावरील प्रेम की निसर्गाचा उपभोग?


नाटक हे माध्यम आहे. गाणं हे माध्यम आहे किंवा चित्रकला हे माध्यम आहे. त्या माध्यमापेक्षा कलावंत कधीच मोठा नसतो. कलावंत हा जन्मला, त्यानं काम केलं आणि तो गेला. हे सतत चालू असतं. पण नाटक तिथेच आहे. चित्रकला तिथेच आहे. विंचीपासून आपल्याकडे एम एफ हुसेनपर्यंत सर्व गेले. पण चित्रकला तिथेच आहे. माध्यम तिथेच आहे. कलावंत बदलतो. आपण फार छोटे असतो कलेपेक्षा. हे पण मला फार झगझगीत कळलं. म्हणून आपण नाट्यसृष्टीला काही दिलं हा भ्रम डोक्यातून आधी गेला. कारण मी आठ वर्ष काहीही लिहिलं नव्हतं. त्याने नाट्यसृष्टी एवढीशीही खळबळ झाली नाही. कोणाला आठवण पण आली नाही की का लिहीत नाहीत? काय चाललंय तुझं? बरयं का? बंद का? पण काही थांबत नाही तुमच्याशिवायमी त्यावेळी विचार केला की मी नाटकाला काही दिलेलं नाहीये पण; नाटकाने मला काय दिलंय? मी माझं काम करतोय त्याने मला काही दिलंय का? मी जे करतो त्याने जर माझ्या मनाला समृद्धी येत नसेल, माझ्या मनाचं जर काही उन्मयन होत नसेल तर आपल्या कामांमध्ये काहीतरी गडबड होत आहे. या कल्पनेशी मी सात-आठ वर्ष दबकलेलो होतो. नाट्यसृष्टीला काही दिलं नाहीये मी, पण त्या सात-आठ वर्षात पुष्कळ गोष्टी घडत गेल्या. इथून जीवनाकडे आणि कलांकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये बदल होत गेले.

म्हणून मघाशी म्हटलं की सौंदर्यासक्त व कलास्वाद या शब्दांशी अडखळायला लागलोआसक्ती हा शब्द कुठेतरी तुमची वाढ थांबवतो आणि ती पायरी ओलांडून गेल्याशिवाय तुमच्या मनाला त्या माध्यमाची खरी पायरी गाठताच येत नाही अशी माझी समजूत आहे. हे बघा, मी जे सांगतोय ते माझ्या बुद्धीला कळलेलं आहे.  My intellect is involved म्हणून त्याचा अनुभव झालाच आहे असं माझं म्हणणं नाही. सध्यातरी बुद्धीला कळलयं पण त्याचा बोध झालाच असेल की नाही हे मला माहित नाही. त्याचा फारसा विचार देखील आपण करू नये. जेव्हा ज्या गोष्टी कळायच्या तेव्हा त्या कळतात. पण त्या आसक्त शब्दात विसावलो की कलेच्या प्रेमासाठी आपण हे करतोय का? असं वाटायला लागतं. ही एक abstract गोष्ट असते.

कलेच्या प्रेमासाठी हे गाणं आहे. या गाण्याच्या प्रेमासाठी आपण करतोय असं नसतं, तर ते स्वतःसाठी असतं. आसक्त या शब्दावर एवढं जोर देण्याचं कारण आपली सौंदर्य कल्पना आसक्तीशी जुळलेली आहे आणि तिथे माणसांची इतकी मोठी फसगत होते. तिथे अडकून पडतात माणसं आणि मग पुढे आयुष्यात विचित्र वांझोटेपण येतं याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्याकडे निसर्गावर प्रेम असणारे हल्ली तर खूपच झाले आहेत. ताडोबात जाऊन वाघाला त्रास देतात. मला इतकी चीड येते. आपण झुंडीच्या झुंडी जीप्स घेऊन तिथे जातो आणि त्या वाघांना बिचार्यांना कोंडीत पकडून बघतो. ते येतात का कधी तुम्हाला बघायला? का तुम्ही त्यांना त्रास देता? हेच सरळ त्या वन्य पशूंच्या जीवनावर आक्रमण आहे. पर्यावरण पर्यटन हे तर खातं आहे. सरकारला पैसे मिळतात. राहू द्या ना त्यांना शांतपणे सुखाने, पण नाही! लोक जाणार! कारण त्यांचं निसर्गावर भयंकर प्रेम! निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवण्यासाठी लोक जातात तिथे. ते घालवले की परत येतात. ते चार दिवस जातात, तिथे राहतात.

बरं, मग आम्हाला खाण्याची फार हौस! सॅंडविचेस, बियरच्या बाटल्या, व्हिस्कीच्या बाटल्या आणि मग इकडे पाहून हाs हाs हाs तिकडे पाहून हाs हाs हाs. हिमालय सुंदरच आहे, महाबळेश्वर सुंदरच आहे, माथेरान सुंदरच आहे, चिखलदरा सुंदरच आहे. सगळं हाs हाs हाs तर आहेच. त्या लोकांना वाटतं की आपण निसर्गाशी एकप्राण झालो पण संध्याकाळी ते रेस्टॉरंटमध्ये येऊन दारू पितात.

मी तर कुठेच निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गेलो नाही. सध्या तर नाहीच. याचं सरळ कारण असं की तुम्ही तिथे निसर्गाशी एकप्राण व्हायला गेलेलाच नाही आहात आणि आणि जर एकप्राण झाला असता तर बियरची आठवण झालीच नसती. तिथे जाऊन बडबड करतात एक सारखी. निसर्ग तर मूक आहे. त्यामुळे तिथे तुम्ही जे जाता ते निसर्ग भोगायला जाता. सुंदर दृश्य डोळ्याने भोगण हेच तुमचं पर्यावरणाचं प्रेम समजा. आता सौंदर्याची इतकी उथळ आणि बटबटीत कल्पना जर आपली असेल तर त्याही पलीकडे एका वेगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं आणि त्याचा आस्वाद असा वेगळ्या प्रकारचा मिळायला पाहिजे, तयार करायला पाहिजे याची कल्पना तरी असते का? चार दिवसांनी परत आल्यानंतर आमच्या जीवनात काय फरक पडलानिसर्गाच्या सानिध्यात राहून, एकताल होऊन आलात पण निसर्गाने तुम्हाला काय शिकवलं? तर काहीच नाही! हा सौंदर्यसक्तीचा प्रकार आहे.

डोळ्यांना बरं वाटतं, गाणी ऐकताना कानाला बरं वाटलं पाहिजे, खाताना जिभेला बरं वाटलं पाहिजे हीच आपली कुवत. सावजी मटन खायला जातात तर कुठून कुठून मुंबईहून सुद्धा येणारे लोक पहिले आहेत. मी एक तर शाकाहारी आहे, मला मटन चालत नाही. आता अभिरुचीपूर्ण खाऊ नये, अभिरुचीपूर्ण ऐकू नये अभिरुचीपूर्ण राहू नये असं नाहीये. परंतु हा आसक्तीचा जो प्रकार आहे तो भयंकर आहे. माझा एक मित्र म्हणाला तुला काय वाटतं तुझ्यात तर प्रेमच नाहीये. मी म्हटलं, मला असं वाटत नाही. माझं खूप गोष्टींवर प्रेम आहे. माझ्या गावात एकाच बाभळीचे झाड आहे.वाळून कोरडं झालेलं असतं उन्हाळ्यामध्ये. पाठीमागे वैराण आहे. पण मला ते अतिशय सुंदरच दिसतं. ते अतिशय सुंदर झाड आहे असं माझं मत आहे. महाबळेश्वरचा तो 'निसर्ग' आणि माझ्या शेतातला किंवा तुमच्या अवतीभवती जो काही आहे तो काही निसर्ग नाही का? तो सुंदर नसतो का? तो नसतो कारण डोळ्यांनी बघता येत नाही. मला एकच म्हणायचंय महाबळेश्वर काय आणि माझ्या घराच्या अवतीभोवती काय, तिथं मला एकरूप होता आलं पाहिजे. पण असं होत नाही याचं कारण आपली जगण्याची कल्पनाच मुळी homocentric आहे. 'मी' मध्ये व 'माझ्या' अवतीभवती सगळं माझ्यासाठीच आहे असं जिथे आहे तिथे सौंदर्याची कल्पना मरण पावते. ती जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये दिसते.

 

विहित कर्म करावे


आपली जगण्याची कल्पनाच मुळी एकांगी आहे. 'मी' मध्ये व 'माझ्या' अवतीभवती सगळं माझ्यासाठीच आहे असं जिथे असतं तिथे सौंदर्याची कल्पना मरण पावते. ती जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये दिसते. एखादा प्राध्यापक असतो. देखणा आहे सुदैवाने. उत्कृष्ट कपडे घालतो. रोज कपड्याला इस्त्री करतो, बुटाला पॉलिश असते, केस छान वळवलेले असतात. ऐटीत वर्गात जातो. तिथे सुस्कारे निघतात आणि मग तो वेळघालूपणा करतो. त्याची अभ्यासाची तयारी झालेली नसते. गृहपाठ केलेला नसतो. चुकीचं शिकवतो. मन शिकवण्यात नसतं आणि परत येतो. या माणसाला सौंदर्यदृष्ठी आहे असं मला वाटत नाही. हा अत्यंत भडंग माणूस आहे असं मला वाटतं.

आपलं विहित कर्म जे आहे ते जर आपल्याला सुरळीत करता येत नसेल तर बाकीच्या सौंदर्याचा डोलारा आपल्या अवतीभोवती बाळगणं यात काहीही अर्थ नाही. अनेक लोकांच्या राहणी मी पाहिल्या आणि काय राहतात लोक! काय राहणी आहेत त्यांच्या! सुंदर घर, सुंदर कपडे, सुंदर काया. त्यांना एक काडी इकडची तिकडे झालेली चालत नाही. परंतु त्यांचं विहित काम ते 'असंच' करतात. लग्नपत्रिकांचंच बघा, पाचशे पाचशे हजार रुपयांची एक एक पत्रिका असते. पाच एक लाखांच्या पत्रिकाच छापतात. एक मोठा बॉक्स असतो मग त्यात दुसरा बॉक्स असतो. त्यात सोनेरी काम केलेली पत्रिका असते. पत्रिका उघडल्यानंतर मग आतमध्ये पहिल्या ओळीपासून शुद्धलेखनाच्या चुका असतात. तिथपासून शेवटपर्यंत पत्रिका वाचवत नाही. मग काय उपयोग आहे सौंदर्याचा. हे काय सौंदर्य आहे?

आता माझ्याकडे पीएचडीच्या महिला आल्या होत्या. त्यांनी पहिली दहा पाने दाखवताच मी गाईड होण्यास नकार दिला. याचं कारण त्यांनी 'मि' आणि 'स्त्रि' असे शब्द अशुद्धलेखन केलेलं होत. जे आपलं विहित काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट मी करीन असा कुठे आग्रह नव्हता त्या महिलेला. अशा माणसांमध्ये सौंदर्य भावनेचा अभाव  आहे. त्यांना सौंदर्याचा अर्थच कळलेला नाही.

माझे एक कलावंत मित्र आहेत - प्रभाकर कोलते. त्यांचं रोजचं जीवन अतिशय अस्ताव्यस्त आहे. सगळंच अस्ताव्यस्त. घरात काहीच धड नाही. रॅक मध्ये दहा पंधरा दिवसाचे सामान पडलेले, त्यावर बुरशी लागलेली, पुस्तक इकडे, चपला तिकडे. पण तो कामाला उभा राहिला की त्याला रेष सुद्धा इकडची तिकडे झालेली चालत नाही. प्रभाकर कोलते चित्रकार आहे. घर अस्ताव्यस्त पण काम जेव्हा करतो तेव्हा ते बघण्यासारखं असतंतिथे थोडीही तडजोड त्याला चालत नाही. आता कोणाची सौंदर्यदृष्टी चांगली? टीप-टॉप राहणार्या एका व्यक्तीची की कोलतेची?

इतरांमध्ये सौंदर्यासक्ती असते. किंवा ते सौंदर्य जगतात असं मला वाटत नाही. विचारांच्या बाबतीत पण तसं होऊ लागतं अशी माझी समजूत आहे. अनावश्यक विचार ज्याने आपल्या मनाचं काही उन्मयन होणार नाही असे हळूहळू आपण दूर सारू लागतो किंवा तसा प्रयत्न तरी आपला असतो. मी या टप्प्यावर साधारण इथे कोठेतरी आहे. मला सगळं साधलंय अशातला भाग नाही परंतु संगीत, चित्रकला या गोष्टींचा मनःपूर्वक खोल जाऊन सौंदर्यानुभव घेता आला. त्यासाठी मला तज्ञांची मदत झाली. प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन अशी सगळी माणसं मला वेळोवेळी भेटत गेली. संगीताच्या बाबतीत मोठी मोठी माणसं मला भेटली. पाश्चात्य संगीतासाठी मुंबईच्या काही मित्रांची मला खूप मदत झाली. त्याच्यामुळे या कलांमध्ये मला अवगान करता आलं. केलं. इथपर्यंत आलो आणि हेही कळलं की जितकं आपण आपल्या आयुष्यात अडगळ कमी करू, तितकं आपल्या आयुष्यातलं सौंदर्य वाढेल.

आता हे सगळं झाल्यानंतर ते तुमच्या कामात दिसलं पाहिजे ना! तुम्ही जे काम करीत आहात त्यात ते आलं पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम वाटत नाही. म्हणून विहित कर्म अचूक करावे.


प्रश्नोत्तरे

प्रश्न: कामामुळे व्यक्तीचे उन्मयन होते का? जर होत असेल तर त्याची प्रोसेस काय?

उत्तर: ही दुटप्पी प्रोसेस आहे असं मला वाटतं. कामामुळे उन्मयन होतं, यापेक्षा काम करता करता ते घडतं. मी जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे पुस्तक आधीच्या पुस्तकापेक्षा वैचारिक, भावनिक, स्पिरिच्युअल यादृष्टीने जरा पुढे सरकलेलं आहे. इथं काहीतरी जास्त माझ्या हाती लागलेलं आहे. जीवनाबद्दलची माझी समजूत वाढू लागते, त्यादृष्टीने उन्मयन होतं. म्हणजे मी संत वगैरे झालोय असं काही नाही. राग, लोभ सगळे चिकटले आहेत मला. परंतु जीवनाबद्दलची समजूतच नसणं आणि आंधळेपणाने काम करीत राहणं हे मला काही लोकांच्या बाबतीत कळत नाही. मग तो लेखक असो, समाजसेवक असो, डॉक्टर असो किंवा अजून काही असो.

 

प्रश्न : तुम्ही व्हॉट इज अननेसेसरी, इज अनब्युटीफुल असं बोलता. तुमच्या मनातील जी नेसेसिटी आहे त्याला डिफाइन करता येईल का?

 उत्तर: माझ्या घरात मी वस्तूंची जमवाजमव करणं हे हव्यासामुळे होतं. याचं कारण मी सौंदर्यासक्त असतो. ज्याला परिग्रह म्हणतो आपण, तो मी करतो. मला गोष्टी सुंदर वाटल्या की घे, असं करतो. मग सगळ्यांच्याच आयुष्यात तो (अपरिग्रहाचा) टप्पा येतो असं नाही. काही माणसं मरेपर्यंत वस्तूंशी चिकटून बसलेली असतात. पण परिग्रहाची वृत्ती हळूहळू गळून पडायला लागते ते वाढत्या वयाबरोबर. जीवनाविषयी समजुतीमुळे ते घडू लागतं. मग आपल्याला कळतं की त्या गोष्टीचं सौंदर्य मी एकदा पाहिल, दोनदा पाहिल आता मला त्यातून काहीच नवीन मिळत नाही. पण दुर्मिळ चित्र असेल एखादं उत्तम कलाकाराचं, तर ते अननेसेसरी गोष्ट होत नाही. ते अनब्युटीफूल होत नाही. याचं कारण असं की, ते चित्र रोज माझ्याशी बोलतं. रोज मला नवीन अनुभव देतं. म्हणून त्या अभिजात कलाकृती आहेत.

 पण पाण्यात पाय बुडवून बसलेली कॅलेंडरवरची युवती, तिचा फोटो फ्रेम करून लावणं, हे एक दिवस छान वाटेल. मग ते अनावश्यक होतं. अशा गोष्टी कमी केल्या तर आपलं घर खूप मोकळं मोकळं आणि छान वाटतं. तसंच माणसाचं व नात्यांचं सुद्धा आहे. तसं मी इथपर्यंत खेचत नाही की माझ्या आयुष्यात मी किती नाती निर्माण करतोय? लोकसंग्रह म्हणतात त्याला. आता 'लोकसंग्रह' समाजकारणात काम करणाऱ्यांना आवश्यक असेल, आहेच. पण एरवी 'उपचार' म्हणून लोक सांभाळणं याच्यामध्ये माझी फार शक्ती व्यथित होते. अनेक लोकसंग्रह करणारे, अनेक नाती जमा करणारे दुसऱ्यांच्या ताब्यातच असतात आणि मी कोणामुळे आहे, हे सांगता येत नाही. कारण एका व्यक्तीमुळे आहे असं कसं म्हणायचं? जर हिचं अन् माझं भांडण झालं तर ते फक्त तिच्यामुळे झालं असं कसं म्हणायचं? तिच्यातही गैर आहे व माझ्यातही काही गडबड आहे. पण जर फक्त भांडणच होतंय गेली वीस वर्ष तर ती आयुष्यातली अडगळ आहे. ती अडगळ शांतपणे बाजूला केली पाहिजे. म्हणून माझ्या आयुष्यातली तापदायक नाती (जी माझ्याचमुळे असतील असे मी गृहीत धरतो, इतरांमुळे नाही) ती आपण नाहीशी केली पाहिजेत. कारण ती नाती मला डागाळत असतात आणि ते त्याही व्यक्तीला तेवढेच तापदायक होत असेल.

 हे लोकसंग्रह करणं वेगळं, लोकांना सांभाळणं वेगळं. ज्याला सामाजिक काम करायचं आहे त्याला तर हे करावंच लागतं. पण वैयक्तिक पातळीवर अंर्तजीवनाची गजबज कमीच करावी लागते. नात्यांची सुद्धा! जे नातं प्रवास करीत नाही, पुढे जात नाही, जे रूपांतरण करीत नाही ते नातं उगीच फॉर्मॅलिटी म्हणून टिकवून ठेवणं हे आता पुष्कळ निरर्थक उद्योग आहे. हे दोन्ही पक्षांना कळलं पाहिजे. हे टोकाचं बोलणं असेल पण हे बघा, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.


प्रश्न: कामाबद्दल Passion आणि कामाबद्दल आसक्ती यामध्ये काय फरक आहे?

उत्तर: खूप फरक आहे. ज्या लोकांसाठी तुम्ही काम करता त्यांच्याबद्दल तळमळ असणं हे स्वतःच्या पलीकडे आहे. आसक्ती म्हणजे तुमचा यात काही पर्सनल इंटरेस्ट आहे. आसक्ती म्हणजे नुसती ओढ नाहीये. लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, या गोष्टी मनात असतील तर आसक्ती वाढेल. नसतील तर मग आसक्ती राहणार नाही. तळमळ राहील. आणि तळमळ ही फार मोठी गोष्ट आहे. उदात्त गोष्ट आहे. या दोन मूलभूत मनोवृत्तीच वेगळ्या आहेत असं मला वाटतं.

 

प्रश्न: काम करताना एक हेतू असू शकतो की या कामातून मला स्वतःला शोधावसं वाटतं. मग कामाकडे साधन म्हणून पाहणे आणि स्वतःला शोधणे योग्य आहे का?

 उत्तर: मला तर वाटतं की कामाकडे दुर्लक्ष करून स्वतःला शोधत राहणे ही आसक्ती आहे. पण आपण काम करीत असतानाच हळूहळू प्रगती होत राहते. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. हा प्रवास निरंतर चालणारच असतो. निरंतर, आयुष्यभर. माझ्या माहितीतील काही लोक आहेत, ते वेल बीइंग आहेत. पण फक्त स्वतःपासून पळून जाण्यासाठी अशा कामात गुंतलेले आहेत. त्यांना स्वतःला तोंड देता येत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी गुंतागुंत आहे, इतके तापदायक अनुभव आहेत की त्यापासून पळून जाण्यासाठी ते हे काम करतात का? अशी माझी शंका आहे. मी त्यांना विचारलं नाही पण माझं विश्लेषण तसं आहे. तुम्हाला उद्या समजा असं कळालं की आपल्यामध्ये आसक्ती आहे म्हणून हे काम करतो, तर कशाला तुम्ही त्याच्यामुळे अपराधीपणा वाटून घेता? गळून पडेल ना ती. तो आपल्या प्रवासाचा भागच असतो.