'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 11 August 2013

II आनंदाचे डोही दुःखाचेही तरंग II

उत्साह शोषून घेणाऱ्या आणि शीण आणणाऱ्या मनाच्या ह्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मला पटलेला जालीम उपाय म्हणजे गांधीजींनी दाखविलेला बी दि चेंज यू वॉन्ट टू सीहा मार्ग ! फार बौद्धिक चिकित्सा न करता चार वर्षापूर्वी मी कपडे विकत घ्यायचे नाहीत, इतरांनी वापरून कंटाळा आला म्हणून टाकून दिलेले कपडे वापरायचे, असं ठरवून टाकलं आणि माझा प्रवास सुरु झाला. आपली जीवनशैली बदलली तर वैयक्तिक आरोग्यापासून व्यापक पर्यावरणापर्यंत होणारे अनेक संहार टाळता येतील हे आता अनेकांना समजतं. पटतही, पण वळत नाही. लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असंही आपल्या काही सहकाऱ्यांना वाटतं; आणि ते एवढं सोपं नाही याची जाणीवही ताबडतोब होते. उत्तराखंडातील हाहाकारानंतर याविषयीच्या चर्चा पुन्हा ऐकायला मिळाल्या, तेव्हा या चर्चांचं गांभीर्य जसं मला जाणवत गेलं तसं समोर ठेवावं असं वाटलं.  

There is a real difference in the kind of happiness we feel and its long term consequences.
Barbara Fredrickson, 2nd July 2013

चाँई हे विष्णूप्रयागाच्या उजव्या हाताला हाथी पर्वताच्या कडेवर बसलेलं एक गाव. माझं मन घडविण्यामध्ये या गावचा मोठा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वी गंगा नदीवर बांधल्या जात असलेल्या शेकडो हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्सचा पर्यावरणावर आणि स्थानिक लोकांच्या जगण्यावर काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास करण्यासाठी मी अलकनंदा नदीच्या खोऱ्यात पायपीट करीत होतो. तेव्हां दूर नदीच्या उत्तर टोकाला असलेल्या या गावांत मुद्दाम गेलो. चिपको आंदोलनातले एक जेष्ठ कार्यकर्ते चंडीप्रसाद भट ह्यांनी १९८२ साली त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठवलेल्या एका पत्राची प्रत हाती लागली होती. विष्णूप्रयाग येथे येवू घातेलेल्या जे.पी. हायड्रो प्रोजेक्टला मान्यता देवू नये अशी चंडीप्रसादजींची सुचना होती. त्याच पत्रांत त्यांनी चाँईच्या सौंदर्याचं वर्णन केलं होतं. हिमालयाच्या कुशीत, थंडीची शाल पांघरून, त्या शालीवरील फळबागांची आणि फुलबागांची सुंदर बुद्दीदार नक्षी मिरवीत, अलकनंदेच्या शुभ्र फेसाळ प्रवाहात पाय सोडून बसलेलं आनंदी गाव, अशीच त्याची ओळख सांगितली पाहिजे. दुध-दुभतं थोडं कमी होतं पण डोंगर उतारावरची शेती उत्तम होती. लोकांची नाळ शेतीशी घट्ट जोडलेली होती. गावांत जे पिकत नव्हतं ते वापरण्याची पद्धतच नव्हती, त्यामुळे अलकनंदा ओलांडण्याची कधी फारशी गरज भासत नसावी. इंग्रज तिथे पोहचले नव्हते. दूर राजधानीच्या ठिकाणी सत्तांतरं झाली, नवी सरकारं, नवे अधिकारी अस्तित्वात आले तरी चाँईला त्याची काही फिकीर नव्हती. पारंपारिक पद्धतीने त्याचा कारभार चालत होता. स्वयंपूर्ण गावाच्या गांधींजींच्या कसोटीवर हे गावं पुरेपूर खरं उतरत होतं.
उत्तराखंडात नुकत्याच झालेल्या प्रलयाने ते धुवून नेलं. एका अर्थाने ते बरंच झालं. चाँईच्या सौंदर्याला केंव्हाच ग्रहण लागलं होतं. ‘नो ड्रीम इज टू बिग’ असं घोषवाक्य असलेला जे.पी. प्रकल्प पूर्ण झाला तेव्हापासूनच. प्रकल्प अधिकाऱ्यांनी ‘नदीचा हा पट्टा आमच्या मालकीचा आहे, त्यामुळे गावकऱ्यांना त्यात पाय ठेवता येणार नाही’ असं धमकावत अंत्यसंस्कारासाठी आलेली प्रेतं दोन-दोन दिवस आडवून ठेवायला सुरुवात केली. प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी कुठून कुठून कामगार आणले. कामगारांसोबत इथे कधी नव्हते त्या रोगांचे विषाणू पण आले. बाहेरून आलेल्या कामगारांना स्थानिक सौंदर्याची काय किंमत असणार? त्यांनी इथल्या बागा वाटेल तशा ओरबाडल्या. नदी पात्रं अस्वच्छ करून टाकलं. मुली-महिलांचे भावनिक-लैंगिक छळ झाले. प्रकल्पाने तरुणांच्या हातात पैसा दिला आणि बाहेरून आलेल्या कामगारांनी नवी व्यसनं, नवे छंद दिले. हे सगळं हळूहळू घडत होतं. पाच-सहाशे चाँई गावकऱ्यांना दोन एक हजार कामगारांचं हे अतिक्रमण थोपावता आलं नाही. तसंच प्रकल्प अधिकारांना प्रतिकार करणंही जमलं नाही. ग्रामस्वराज्यावर लोकशाहीने केलेलं हे आक्रमण कोण आणि कसं थोपवू शकलं असतं ? पुरेसं राजकीय शिक्षण झालेल्या सो कॉल्ड् मुख्य प्रवाहातील गाव-समाजांपैकी तरी कोण ते थोपवू शकतं आहे ? सुलतानी संकटाबरोबरच दहावर्षापूर्वी आस्मानी संकटही चाँईवर आघात करू लागली. वीज निर्माण करण्यासाठी लागणारं पाणी उंचावरून जनरेटर कडे वाहून नेणारा बोगदा हाथी पर्वताच्या पोटात बरोबर गावाखाली पसरलेला. लोकांना अर्थातच याची कल्पना दिलेली नव्हती. त्या बोगद्यामुळे हाथी आतून पोखरला गेला होता. त्याच्या पोटातील जलाशयाच्या भिंती खिळखिळ्या झाल्या होत्या. एक दिवस तभिंतीना तडा गेला. गावाच्या भूगर्भात असलेला पाण्याचा साठा पंक्चर झाला. तीस-चाळीस दिवस सतत गावाच्या बाजूने एक भला मोठा धबधबा वाहून गेला.       

वाट पुसली गेलेली असल्यामुळे जमेल तसा डोंगर चढून गेल्यावर मला दिसलेलं चाँई भकास भयंकर होतं. गाव खचलेला. डोंगरात रुतलेला. बागा आणि शेती केंव्हाच गाडली गेली होती. त्यांचे केवळ अवशेष बाकी होते. विहिरी एकतर फुटल्या होत्या किंवा कोरड्या पडल्या होत्या. घरांच्या भिंतीना रुंद भेगा पडलेल्या. घरं गळत असतं. ओल्या घरांमध्ये थंड वारा दिवस रात्रीची पर्वा न करता फेर धरून असायचा. पुरुष मंडळी आणि तरुण मुलं शेजारच्या मोठ्या गावांत, नव्यानं सुरु झालेल्या प्रकल्पावर काम करायला गेली होती. बहुतेक मुली समोरच्या जोशीमठमध्ये किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वसाहतीत घरकामाला जात होत्या. रोज कुठे डोंगर चढून उतरायचा म्हणून बहुतेक जणी मुक्कामासाठी तिकडेच अॅडजेस्ट व्हायच्या. भकास गावाच्या सोबतीला फक्त विधवा, वृद्ध महिला आणि त्यांची लहान लेकरं, नातवंड रहात होती. मी गावांत फिरलो, मातीतून हात फिरवीत एका पडक्या विहिरीच्या कट्ट्यावर बसून राहिलो, भेगाळलेल्या भिंतींच्या पायाशी बसून आजी आणि मावश्यांनी दाखवलेली कागदपत्रं उलटून पालटून पाहिली, दुध न मिसळलेला कसलातरी वाफाळलेला काढा एका आजीने प्यायला दिला तो चहा समजून घेतला आणि परत निघालो. परत निघण्यापूर्वी माझ्या हळव्या मनाने डोळ्यातून वाहायला सुरुवात करू नये म्हणून काटेकोर प्रयत्न मात्र केले. त्याशिवाय त्या गावाला देण्यासारखं माझ्याकडे काय होतं ?  
संध्याकाळी डोंगर उतरून विष्णुप्रयागला संगमाच्या टोकावर येवून बसलो. ह्या साऱ्याला जबबदार कोण ? ह्याचा विचार करीत कितीतरी वेळ तिथेच बसून होतो. प्रकल्प उभा करणारी कंपनी, तिचे दुष्ट अधिकारी, त्या दोघांची पाठराखण करणारं सरकारं, लोकांच्या प्रश्नाचं भांडवल करून त्यांचीच दिशाभूल करणाऱ्या समाजसेवी संस्था-संघटना, यापैकी कोणाला जबाबदार धरावं? स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढायचं कसं हे शिकण्याची कधी गरजच न पडलेल्या, केवळ परिस्थिती बदलली म्हणून क्षीण भासणाऱ्या, एकेकाळच्या समाधानी गावकऱ्यांना दोष का द्यावा? दिल्ली आणि कानपूर सारख्या शहरांत राहून वेजेची उधळपट्टी करणाऱ्या लोकांना वीज लागते म्हणून आपण हिमालयाच्या तरुण कोवळ्या पर्वत रांगांमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी धोरणं आखली, वीज पुरवली. पण त्यामुळे विजेची गरज कमी होण्याएवजी उलट वाढलीच. सतत वाढतच राहिली. चाँई सारख्या कितीतरी गावांना विनाकारण शिक्षा भोगावी लागली. ती थांबवण्यासाठी काय करता आलं असतं? पंतप्रधानांनी एकट्या उत्तराखंडात साडेपाचशे पॉवर प्रोजेक्ट्स उभे करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पन्नास हजार मेगावॉट वीज निर्माण होऊ शकेल. पण दिल्ली आणि कानपूरकरांची गरज कदाचित कधीही भागणार नाही. चाँई सारखी कित्येक गावं तिथल्या निसर्ग आणि माणसांसह आज वीज-खाणकाम-विमानतळ-सिंचन-उद्योगधंदे आणि कचरा साठविण्यासाठीची डम्पिंग ग्राउंड यासाठी खर्ची पडताहेत. त्यांना काय मदत करता येईल? ह्या प्रश्नांचे भुंगे काही वर्षापासून सतत डोक्यात घोंगावताहेत. चाँईला जावून आल्यापासून ते अधिक टोकदार झाले. उत्तराखंडात उमटलेल्या पडसादांची आठवण झाली की त्यांची टोचणी अधिक जाणवायला लागते. ‘मला काय त्याचं’ म्हणून आता स्वस्थ बसवत नाही. निसर्गाच्या कोपामुळे उत्तराखंडात विध्वंस झाला, त्याला आपण काय करू शकतो अशी उसनी आणि बेगडी हतबलता घेवून जगता येत नाही. आणि समस्येचा विस्तार आणि गुंता लक्षात आला की काय करावं हे सुचतही नाही. 
उत्साह शोषून घेणाऱ्या आणि शीण आणणाऱ्या मनाच्या ह्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मला पटलेला जालीम उपाय म्हणजे गांधीजींनी दाखविलेला “बी दि चेंज यू वॉन्ट टू सी” हा मार्ग ! फार बौद्धिक चिकित्सा न करता चार वर्षापूर्वी मी कपडे विकत घ्यायचे नाहीत, इतरांनी वापरून कंटाळा आला म्हणून टाकून दिलेले कपडे वापरायचे, असं ठरवून टाकलं आणि माझा प्रवास सुरु झाला. तशी तीव्र ओढ होती, लोक काय म्हणतील याची भीती आणि आपल्याला चांगले-देखणे कपडे कदाचित वापरता येणार नाहीत ही खंतही होती. पण नायनांनां एक प्रॉमिस करून प्रवास सुरु झाला. निर्णय घेवून झाल्यानंतर काही काळाने निश्चयाचं बळ कमी होऊ लागलं त्याचं सुमाराला चॉईची भेट झाली. त्यानिमित्ताने बदलाचा मार्ग म्हणून जे बुद्धीला पटतंय त्या दिशेने नाही गेलो तर काय होईल याचं एक छोटेखानी विश्वरूपदर्शनच झालं. विश्लेषणाचं एक चक्र पूर्ण झालं. हळू हळू आपल्या आयुष्यात किती वस्तू असाव्यात, आपण किती पैसे कमवावेत, कमावलेल्या पैशांचं काय करावं, ह्या विषयी एक एक निर्णय घेत, पहिला निर्णय अंगवळणी पडून त्याची सवय होईपर्यंत दुसऱ्या निर्णयाची घाई न करता, एक एक टप्पा पुढे सरकतो आहे. निश्चयाने पुढे जाण्याचं आणि आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचं तंत्र अवगत होऊ लागलं आहे, असं आज म्हणता येईल. चाँईसारखी वास्तवं समोर येतात तेव्हा आता पूर्वीइतकी हतबलता आणि अपराधीपणा वाटत नाही. समस्या सोडविण्यात आपला पुरेसा मोठा वाटा नसला तरी निदान समस्या निर्माण करणाऱ्यांच्या पंक्तीला गेलो नाही याचं समाधान हल्ली सोबत असतं. तेच जीवनशैली विषयी नवे निर्णय घेण्याचं बळ देतं आहे. आणि त्याशिवाय ईतर कामं पूर्वीपेक्षा अधिक संयमाने आणि निश्चयाने करता येताहेत. जीवनशैली बदलताना मिळणारा आनंद अस्वस्थेतेचं रुपांतर उर्जेत करू शकतो हे शाश्वत विकासाविषयी आनंद मामा आणि अरुण काकांशी वाद घालताना पटतंच नव्हतं !        
आपली जीवनशैली बदलली तर वैयक्तिक आरोग्यापासून व्यापक पर्यावरणापर्यंत होणारे अनेक संहार टाळता येतील हे आता अनेकांना समजतं. पटतही, पण वळत नाही. लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असंही आपल्या काही सहकाऱ्यांना वाटतं; आणि ते एवढं सोपं नाही याची जाणीवही ताबडतोब होते. उत्तराखंडातील हाहाकारानंतर याविषयीच्या चर्चा पुन्हा ऐकायला मिळाल्या, तेव्हा या चर्चांचं गांभीर्य जसं मला जाणवत गेलं तसं समोर ठेवावं असं वाटलं. त्याला आणखीही एक कारण आहे.आनंद देणारा एक पर्याय आणि दुःख देणारा एक पर्याय ह्यातील एक काहीतरी निवडायला सांगितलं तर ते कठीण जाणार नाही. पण अडचण होते ती सारखाच आनंद देणाऱ्या दोन पर्यायांमधला एक पर्याय निवडायची वेळ येते तेव्हा. नवा शर्ट घेतला तरी आनंद मिळतो आणि श्रीराम किंवा निखिलेश ने वापरून झाल्यानंतर दिलेला शर्ट वापरायला घेतला तरी आनंद मिळतो. ह्या दोन आनंदात फरक कसा करायचा हे कळत नव्हतं म्हणून कदाचित दोन्हींचाही मोह सोडवत नव्हता. जुने शर्ट वापरताना मी रोज श्रीराम, निखिल सारख्या मित्रांसोबत आणि चाँई सारख्या अनेक गावांसोबत मी जोडला गेलो आहे, ह्या  जाणीवेतून मिळणारा आनंद काही औरच असतो. हे इतरांना समजावून सांगता येत नव्हतं, त्याचं महत्व कसं पटवून द्यायचं सांगायचं हे ही कळत नव्हतं.‘सर्वांना आपला वाटा शांततेने घेता यावा आणि पुढील पिढ्यांसाठी निसर्ग वाचावा म्हणून आपण आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत’ ह्यापेक्षा चांगली आर्ग्युमेंट उपलब्ध नव्हती. मात्र गेल्या महिन्यात बार्बारा फ्रेडरिक्सन ह्या विदुषीने ह्या अडचणीला छेद देणारं संशोधन सादर केलं. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठात वीस वर्ष संशोधन आणि एकवीस हजार जीनोमचा प्रत्यक्ष अभ्यास केल्यानंतर त्यांच्या गटाने हे सिद्ध केलं आहे की आनंदाचेही प्रकार असतात. आनंद मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आपल्या जीन्स वरती वेगवेगळे परिणाम करतात. त्यामुळे आनंद कोणता निवडावा ह्याचाही विचार करणं अनिवार्य होणार आहे. नाहीतर आपले जीन्स आनंदातही दुःखी होतील. उत्तराखंडातील डिझास्टर्स इग्नोर करण्यात, भरमसाट वीज वापरण्यात आणि नवे शर्ट्स खरेदी करण्यात, वापरलेले कपडे पुन्हा वापरण्यात, ह्या साऱ्यात आनंद आहे... 


कल्याण टांकसाळे, kalyantanksale@gmail.com 

No comments:

Post a Comment