'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 5 April 2013

नागपूर गट विविध उपक्रमांद्वारे कृतीशील


विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या ७० युवांचा स्थानिक निर्माण गट नागपूरात हळूहळू सक्रीय होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांना भिडण्याची सुरुवात म्हणून त्या समस्या समजून घेण्याच्या दृष्टीने नुकतेच या गटाने शोधग्राम- ला भेट दिली. २ दिवसांच्या या भेटीमध्ये सर्चचे व तेथे काम करणाऱ्या निर्माणींचे काम समजून घेणे हा मुख्य उद्देश होता. त्याकरिता सर्चचे तुषार खोरगडे, डॉ. आनंद बंग, निर्माण ४ चा निखिल जोशी व निर्माण २ चा डॉ. वैभव आगावणे यांनी गटासोबत संवाद साधला. अमृत बंग याने निर्माणची सुरुवात व आजवरचा  प्रवास शेअर केला. नंदा खरे (नंदा काका), डॉ. अभय बंग (नायना) व डॉ. राणी बंग (अम्मा) यांनीही सर्वांसोबत संवाद साधला. तत्पूर्वी या गटाने सर्चमध्ये येत असताना वाटेवरच्या आरमोरीतील उपजिल्हा रुग्णालयाला व तेथील निर्माणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख व डॉ. युगंधरा काटे यांना भेट दिली.
होळीमध्ये होणा-या पाण्याचा अतिवापर व सध्याची दुष्काळाची स्थिती यावर जनजागृती करण्यासाठी या गटाने नुकतेच नागपूरच्या प्रसिद्ध ट्रॅफिक पार्क येथे पथनाट्य सादर केले. यावेळी सुमारे २००-२५० प्रेक्षक हजर होते.
याशिवाय निर्माण ५ च्या पल्लवी बापटने आपल्या इंटर्नशिपच्या काळामध्ये सर्व निर्माणींसाठी रक्तदान मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेलाही सर्व निर्माणींनी चांगला प्रतिसाद दिला.
नागपूर गटाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

No comments:

Post a Comment