संकेत आहेर आणि
गजानन अंभोरे (दोघेही निर्माण ७) गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यामध्ये
असलेल्या आंबटपल्ली आणि कोठारी ह्या दोन ग्राम पंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम
विकास फेलो म्हणून काम करत आहेत. SocialCops मध्ये काम करणारी निर्माण ७ ची
आपली मैत्रीण पूजा वेरुळकर ही नुकतीच त्यांच्या गावाला भेट देऊन
आली. तिथे तिला काय दिसलं, ते तिच्याच शब्दात...
मी SocialCops
नावाच्या
कंपनीत काम करते. ही कंपनी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संस्थाना IT
सपोर्ट पुरवण्याचं काम करते. आमच्या टीमने बनवलेला डॅशबोर्ड ग्राम विकास योजना
बनवण्यासाठी ह्या फेलोजना किती उपयोगी आहे हे बघण्यासाठी मी ह्या दोन ग्राम
पंचायतींना भेट देण्याचे ठरवले. संकेत आणि गजानन ह्या दोघांची गावे लगतच, पण दोन्ही गावी बस जात नाही.
चंद्रपूरपासून २ तासाचा प्रवास करून नुकत्याच रोवलेल्या धानाच्या सुंदर शेतांमधून
आणि मग गडचिरोलीच्या दाट जंगलामधून मी आणि संकेत त्याच्या गावी जाऊन पोहोचलो.

गावाच्या ग्राम पंचायतची इमारत सुंदर होती. बसायला
महागड्या खुर्च्या होत्या. बाहेर ग्रामसेविकेची कार उभी होती. मी कल्पना केलेल्या
गडचिरोलीच्या आदिवासी गावातील ग्रामपंचायतसारखी ही मुळीच नव्हती. सरपंच आणि
ग्रामसेविकेशी संकेतने ओळख करून दिली. गाव PESA अंतर्गत येत असल्याने सरपंच आदिवासी
होत्या. आतापर्यंत मी पाहिलेले सरपंच म्हणजे स्वतःला गावाचे राजे समजणारे. पण ह्या
सरपंच म्हणजे एका साधारण आदिवासी बाईसारख्या. त्यांच्याशी बोलताना
एकूणच त्यांचे अज्ञान आणि गावाच्या
विकासाबद्दल उदासीनता दिसून आली. ग्रामसेविकांचा पैशाचा घोटाळा उघडकीस आल्याने
तिचेही कामास काही सहकार्य दिसत नव्हते. उदासीन सरपंच, भ्रष्ट ग्रामसेविका ह्या सगळ्यांसोबत काम करणे मला खूप आव्हानात्मक वाटलं आणि हे सगळं सांभाळून गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या संकेतचं कौतुक वाटलं.
त्याचं राहायचं ठिकाणही खूप साधारण. एक छोटीशी खाट आणि थोडं सामान एवढंच काय ते
फर्निचर. गावातील बहुतेक घर कच्चीच होती. घरांमध्ये टॉयलेट असणं तर दूरच. विकास
कामांवर खर्च करण्यापेक्षा वेशीवर कमान
बनविणे किंवा महागड्या खुर्च्या घेण्यात खर्च झालेला दिसत होता.

तिथून पुढे आम्ही दाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने भर
पावसात गजाननाच्या गावी गेलो. तो त्याच्या क्वार्टरवर घेऊन गेला. तिथे मोबाइलला नेटवर्क नाही. त्यामुळे यूट्यूब, फेसबुकसारखी करमणूक तर नाहीच. एक
साधा रेडिओ ठेवलेला होता कोपऱ्यात. त्यावर छान जुनी गाणी लावून गजाननने आमच्यासाठी
खास बिनदुधाचा चहा बनवला. एक दिवस इंटरनेटशिवाय न राहू शकणाऱ्या मला, ‘अशा
जंगलातील गावात राहण्याचा गजाननला कंटाळा येत नसेल का?’ असा प्रश्न पडला. मग
गजानन त्याच्या कामाबद्दल सांगत होता.

खरंतर गडचिरोलीच्या
जंगलातल्या दोन आदिवासी ग्राम पंचायतमध्ये त्यांना सोडून दिलंय आणि आता ह्यांचा
विकास करा असं सांगितलं असं दिसत होतं. पण कसा करायचा ह्यासाठी ना काही
सपोर्ट ना काही प्लॅन. तुम्ही ठरवा काय करायचं कसं करायचं. Rural Development, community interaction चे कितीही पेपर्स वाचले, अभ्यास केला आणि औपचारिक प्रशिक्षण घेतलं तरीही प्रत्यक्ष गावात काम करायला गेल्यावर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही.
त्यामुळे गावात काम करताना ह्या फेलोजना बऱ्याच अडचणी येतात. राहायचं घर
शोधण्यापासून उच्च अधिकाऱ्यांच्या राजकारणापर्यंत सगळंच.
अशा परिस्थितीमध्ये काम करणं किती अवघड आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून आल्यावरच कळतं. ‘Suffering में ही meaning है’ हे फेलोज प्रत्यक्ष जगताना दिसतात. म्हणूनच बाहेर रिमझिम पावसाच्या आवाजात, रेडिओवरची जुनी गाणी ऐकत आणि काळा बिनदुधाचा चहा पीत आपल्या दोन निर्माणी मित्रांच्या कामाबद्दल ऐकताना मला अशा चेंज मेकर्सच्या
कम्युनिटीचा भाग असल्याचा अभिमान वाटला!
No comments:
Post a Comment