'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 10 May 2013

सीमोल्लंघन, मे २०१३



सौजन्य: अमृता ढगे
(यावेळी एक बदल केलेला आहे. एप्रिल महिन्याच्या बातम्या असल्यामुळे पूर्वी या अंकाला आपण एप्रिलचा अंक म्हटले असते. मात्र मे महिन्यात प्रकाशित होत असल्यामुळे आपण याला मेचा अंक म्हणू (बहुतेक मासिकांसाठी हीच पद्धत वापरली जाते). यापुढेही आपण हीच पद्धत वापरत जाऊ.)

वैभव ढेरे आणि अजिंक्य काळेचे UPSCच्या मुख्य परीक्षेत घवघवीत यश


वैभव ढेरे आणि अजिंक्य काळे (निर्माण २) यांना संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) मुख्य परीक्षेत (२०१२) घवघवीत यश मिळाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार संपूर्ण भारतात वैभवचा ३३५वा तर अजिंक्यचा ५३८वा क्रमांक आला आहे.

अजिंक्य काळे
वैभव ढेरे
मूळचा डॉक्टर असणाऱ्या वैभवला इंटर्नशिप-दरम्यान मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय सेवा हे उत्तम माध्यम असल्याचे लक्षात आले. मात्र पदासोबत मिळणारे अधिकार हे एक दुधारी अस्त्र असून त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे असे वैभव सांगतो. अजिंक्यही डॉक्टर असून सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी असताना सरकारकडे मोठ्या प्रमाणात संसाधने असल्याचे तसेच सरकार अगदी तळागाळात पोहोचल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात लहानसहान गोष्टींवर लोक सरकारवर अवलंबून असल्याने उपलब्ध संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज जाणवली. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून ही जबाबदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे अजिंक्यने ठरवले.
दोघांना कोणत्या सेवेमध्ये योगदान देण्याची संधी मिळेल हे लवकरच कळणार आहे. दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

शेती, आरोग्य समजून घ्यायचंय? खेळ खेळा...


आदिवासी बालशिक्षणात निखिलेश बागडेचे प्रयोग
निखिलेश बागडे (निर्माण २) याने नुकतेच BAIF या स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमांतर्गत उच्चमाध्यमिक मुलांना अनुभवाधारित व कृतीशील शिक्षण मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ८५ आदिवासी शाळांसोबत शिक्षणसामग्री विकसित करण्याचे काम केले. त्याने शेती, आरोग्य, सरकारी योजना, पर्यावरण व व्यक्तिमत्त्व विकास या पाच विषयांचे सर्वसामान्य ज्ञान मुलांना देणारे २२ खेळ (उदा. सापशिडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण शिडी) विकसित करून त्यांची चाचणी घेतली व मुलांमध्ये खेळातून शिक्षणाची पद्धत दृढ केली. या प्रयोगाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या विजय होनकळदकर यांनी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदिवासी योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्या भागातले सर्वसामान्य आजार व त्यांवरची स्थानिक औषधे कोणती इ. माहिती आदिवासी मुलांना सांगता आल्याचे निरीक्षण नोंदवले.
या उपक्रमाअंतर्गतच अन्य एका कार्यक्रमात शेतीची नवनवी तंत्रे वापरून एकाहून अधिक पिके कशी घ्यावीत याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. काही शाळांमध्ये या प्रशिक्षणाला व्यवसायाची जोड देण्यात आली, ज्याअंतर्गत बियाणे विकत घेण्यापासून आपले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकण्यापर्यंतच्या कृतीतून मुलांचे शिक्षण झाले.
या प्रकल्पावर निखिलेश ऑगस्ट २०१० पासून काम करत असून हा प्रकल्प पुढे चालवण्यासाठी BAIF ने शाळांना सुपूर्द केला आहे. नयी तालीम पद्धतीने मुलांच्या सक्षमीकरणाचे प्रयोग करणाऱ्या निखिलेशचे अभिनंदन व त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

डॉ. रामानंद जाधवला जारावंडीवासियांचा भावपूर्ण निरोप


रामानंद जाधव (निर्माण ४) हा गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी (ता. एटापल्ली) येथील प्राथमिक आरोग्य पथकात गेले एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर करारानुसार एक वर्ष शासकीय सेवा देणे आवश्यक असते. हा करार रामानंदने ३० मार्चला पूर्ण केला. रामानंदने घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे एका महिन्याला बाह्यरुग्ण विभागाला भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या १७८ वरून ९९० पर्यंत वाढली. आपला कार्यकाळ संपवून परतताना जारावंडीच्या गावकऱ्यांनी त्याला भावपूर्ण निरोप दिला. यासाठी त्यांनी २५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावातील सामान्य जनतेपासून तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस व इतर सरकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या सर्वांनीच रामानंदच्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी रामानंद याला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी स्वखर्चातून सामूहिक जेवणदेखील ठेवले होते. रामानंद पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करणार असून पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा!

Thursday 9 May 2013

होळी व शिवजयंतीचे औचित्य साधून अमोल लगडचा गावातल्या व्यसनांवर हल्लाबोल


अमोल लगडने (निर्माण ५) त्याच्या गावात अभिनव पद्धतीने होळी व शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम केला. अमोल मूळचा तेलगावचा (जि. बीड, ता. धारूर). सध्या तो  मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून निर्माण ५ चे शिबीर झाल्यानंतर त्याने त्याच्या गावातील दारू दुकानांचे सर्वेक्षण करून गावात दारूवर किती पैसा खर्च होतो याचा शोध घेण्याचे ठरविले. साधारणपणे ४५०० लोकसंख्या असणाऱ्या त्याच्या गावात ७ बार, ६ बिअर शॉपी तसेच एक देशी दारूचे दुकान आहे, तसेच गावात सरासरी ४५ लाख रुपयांची दारू महिन्याला विकली जात असल्याची आकडेवारी त्याच्या सर्वेक्षणातून पुढे आली. गावात व्यसनाधीनतेबद्दल जागृती करण्याची गरज असल्याचे त्याच्या ध्यानी आले.
सुरुवातीलाच होळी व शिवजयंतीचे औचित्य साधून त्याने त्याच्या गावात एक आगळावेगळा प्रयोग केला. तंबाखू, गुटखा इत्यादींच्या पुड्या जाळून होळी साजरी करण्यात आली. शिवजयंतीची सुरुवात सकाळी रक्तदान शिबिराने झाली. १७ ते १८ जणांनी ह्या प्रसंगी रक्तदान केले. रात्री दारू पिऊन धिंगाणा घालण्याऐवजी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ह्याप्रसंगी कीर्तनकार बाईंनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता ह्यावर टीका केली. खुद्द कीर्तनकार बाईंच्या तोंडूनच अंधश्रद्धेवर केलेली टीका ऐकून लोक देखील प्रभावित झाल्याचे निरीक्षण अमोलने नोंदवले.

गजानन फुटके व त्याच्या मित्राची सर्चला औषधांच्या स्वरूपात देणगी


गजानन फुटके (निर्माण ५) MBBS चा विद्यार्थी असून सध्या औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. गजाननचा एक मित्र medical representative असून त्याने नुकतीच कंपनी बदलली होती. मात्र जुन्या औषध कंपनीचे अनेक नमुने त्याच्याकडे होते. हे नमुने लोकांच्या कामी यावे या हेतूने गजानन व त्याच्या मित्राने सर्च संस्थेशी संपर्क केला असता त्या औषधांची गरज असल्याचे त्यांना कळले. त्यांनी तातडीने ती १५-१६ प्रकारची औषधे सर्चला देणगी म्हणून पाठवली.

अश्विन पावडेचा Science for Society सोबत प्रवास सुरू


अश्विन पावडे (निर्माण ३) हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. शाश्वत व अपारंपरिक उर्जा ह्या त्याच्या आवडीच्या विषयावर त्याने मागील वर्षभर Nimbkar Agricultural Research Institute येथे संशोधनाचे काम केले. मागील तीन महिन्यांपासून अश्विनने त्याच्या मित्रांसोबत ‘Science for Society’ (S4S) ह्या कंपनीत अपारंपरिक उर्जेसंबंधी संशोधनाचे काम सुरु केले आहे. सध्या ह्या कंपनीकडील तीन मुख्य प्रकल्प, १- सोलर फूड ड्रायर (सौर उर्जेचा खाद्यपदार्थ वाळविण्यासाठी वापर), २- सोलार ग्रेन ड्रायर (सौर उर्जेचा धान्य वाळविण्यासाठी वापर), ३- अल्ट्रा हेल्थ (हस्तचलित पाणी शुद्धीकरण यंत्र), यामध्ये अश्विन मुख्यत्वे पायलट टेस्टिंग व ऑप्टिमायाझेशनची जबाबदारी सांभाळणार आहे. अश्विनला त्याच्या नवीन कामासाठी शुभेच्छा!

श्रम ही है श्रीराम हमारा


निर्माणचे ५चे तरुण डॉक्टर्स कुलभूषण मोरे, भूषण देव, देवल सावरकर, अनिकेत पवार, अरुंधती उपरे व मित्रमंडळींनी नुकतीच आनंदवनला भेट दिली. बाबा आमटेंनी १९४९ साली मुख्यतः कुष्ठरोगी आणि अपंगांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेले आनंदवन ही आज ३५०० कुष्ठरोगी, अपंग, अनाथ, वृद्ध व आदिवासींच्या श्रमांतून फुललेली वसाहत आहे. शारीरिक व्यंग  असतानाही त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी सुरू केलेल्या अनेक लघुउद्योगात त्यांचे कौशल्य पाहण्याची संधी आपल्या डॉक्टर मित्रांना मिळाली. या गटाने डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्याकडून आनंदवनचा प्रवास व त्यामागची विचारधारा समजून घेतली. (अधिक माहितीसाठी: http://anandwan.in/ )

का बरं फुगते पोळी?


वर्ध्यातील निर्माणींची नऊ जणांची आमची टीम ४ एप्रिल २०१३ रोजी आनंद निकेतन या नयी तालीमच्या तत्वांवर चालणाऱ्या शाळेच्या संचालिका आणि मुख्याध्यापिका सुषमा शर्मायांना भेटली. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून जगणं आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी नसून परस्परपूरक कशा आहेत याची जाणीव आम्हाला झाली. उदाहरणार्थ आपण रोज जेवतो. पोळी-भाजी खातो. ही पोळी तव्यावर टाकली की फुगते कशी? या पोळीच्या फुगण्याच शास्त्रीय कारण पोळी बनवायला शिकतानाच समजून घ्यायचं..
तर अशी ही पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांची शाळा निसर्गासोबत राहून तन, मन आणि बुद्धीचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करते. (या शाळेच्या अधिक माहितीसाठी - http://www.nayeetaleem.org ). सुषमाताईंबरोबर झालेली ही भेट आम्हाला अंतर्मुख करून गेली. आपल्या गरजा, सामाजिक जाणीवा, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या गोष्टींकडे त्रयस्थपणे न पाहता रोजच्या जगण्यातून यावर उत्तरे शोधण्याची प्रेरणा देवून गेली.
खरोखरच.. का बर फुगते पोळी? मी बनवली तरी फुगेल का? चला करके देखो.. अहं.. करके सिखो..
कल्याणी राउत

सृष्टीत...दृष्टीत...



मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
बाह्य सृष्टी आणि आतली दृष्टी! सृष्टी दृष्टीला घडवते की दृष्टी सृष्टीला ह्याचा शोध घेत घेत माणसाने मोठ्ठं तत्वज्ञान (Mind vs. Matter) उभे केले आहे. सुरुवातीला सृष्टी माणसाच्या दृष्टीवर नक्कीच वर्चस्व गाजवत असते. भोवतालच्या व्यक्ती आणि वास्तव त्याच्या जाणीवा घडवत असतात. पण माणसाचा विवेक जागृत झाल्यावर सृष्टीचा प्रभाव ओसरतो आणि तो निकोप दृष्टीने सृष्टीकडे बघायला लागतो. मग दृष्टी सृष्टीला प्रभावित करायला, बदलायला लागते. 
माझ्या आजूबाजूला अत्यंत भणंग, अमानवी अवस्थेत जगणार्या  समाजातल्या वंचित, शोषित घटकासाठी मी काहीतरी केले पाहिजे ह्या तारुण्यसुलभ उर्मीतून मी पाच वर्षांपूर्वी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. त्या निर्णयामागे वैचारिक स्पष्टतेपेक्षा भावनिक उर्जा जास्त होती असे आता जाणवते. अर्थात त्यावेळी भावनांचीच गरज जास्त होती. कारण काही कठीण निर्णय घ्यायचे होते. विचार बाळबोध असले आणि पद्धती माहिती नसल्या तरी उद्देश्य डोक्यात पक्का होता – “हे बदलायचं आहे”.
मी सामाजिक क्षेत्रात प्रवेश करण्याचे कळीचे निमित्त झाले ते निर्माण प्रक्रिया. निर्माण प्रक्रियेने समाजातल्या प्रश्नांना बघण्याची, भिडण्याची एक दृष्टी त्यावेळी दिली. त्या दृष्टीत जसा एक ठोस विचार होता तसा प्रेमळ ओलावा सुद्धा होता. ज्येष्ठांनी कठीण विचार दिला पण मोठ्या प्रेमाने. निर्माण मधील मित्रांची प्रेमळ साथ फारच पक्की होती. शिवाय सोबतीला जगावेगळी स्वप्ने होती. त्यामुळे निर्णय घ्यायला फार वेळ आणि त्रास झाला नाही.
मागील पाच वर्षांच्या प्रवासाचे तीन टप्पे सांगता येतील - गडचिरोलीत सर्च संस्थेसोबत सव्वा दोन वर्षांचा पहिला टप्पा. मग नाशिक येथे प्रगती अभियान संस्थेसोबत एक वर्ष आणि मुंबईतील टीआयएसएस या कॉलेजात दोन वर्षे. या तीनही टप्प्यांना जोडणारा एक धागा होता रोजगार हमी योजनेची (NREGA) अंमलबजावणी सुधारणेचे  काम.   
जग घडवण्याचं-बदलण्याचं काम नेते (leaders) करतात. फार थोडे जाणीवपूर्वक नेत्यांचा मार्ग अनुसरतात. त्यात अधिक सुधारणा करतात आणि हातभार लावतात. उरलेले बाकी सगळे मेंढरं असतात. सर्चचे नेतृत्व विचारांनी गांधीवादी. लोकांकडे जा. त्यांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करा. राज्यसंस्थेवर अवलंबून राहू नका. (गांधीजींना राज्यसत्ता मान्यच नव्हती)”. अशी नेतृत्वाची दृष्टी. तशीच सर्चची कार्यपद्धतीची सृष्टी निश्चित झालेली. प्रगती अभियानचे नेतृत्व विचारांनी सुधारणावादी (liberal). लोकशाही चौकटीतील राज्यसंस्थेचे अस्तित्व मान्य असणारे. एकीकडे लोकांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करत त्यांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी सुद्धा सक्षम करा. लोकांचे प्रश्न निर्माण करण्यात राज्यसंस्थेचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे ते सोडवण्यासाठी राज्यसंस्थेसोबत, रचनात्मक आणि संघर्षात्मक दोन्ही प्रकारे, काम करण्याला पर्याय नाही. शिवाय ज्या स्केलवर लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे ते काम खाजगी क्षेत्र किंवा एनजीओ करु शकत नाही.अशी प्रगती अभियानची दृष्टी आणि त्यातनंच संस्थेची कार्यपद्धती आकारास आलेली.         
रोजगार हमीच्या प्रश्नावर काम करतांना त्या त्या टप्प्यावर ह्या दोन्ही दृष्टीकोनांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. या दोन संस्थांच्या नेतृत्वाने आणि कार्यपद्धतीने रोजगार हमीच्या प्रश्नाला अभ्यासण्याचा आणि भिडण्याच्या माझ्या दृष्टीला नक्कीच प्रभावित केले. पण मला काम करतांना कधी पूरक तर कधी विरोधी अनुभव येत गेले. शिवाय याहून वेगळ्या दृष्टी असलेल्या इतर अनेक व्यक्ती आणि शासकीय/अशासकीय संस्थांचा कामानिमित्त अधिक परिचय झाला.      
कामात फार गुंतण्याचा एक धोका असतो, त्याकडे तटस्थपणे न बघता येण्याचा. मी टीआयएसएस मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेलो. तिथे माझ्याकडे तसे काम कमी होते. त्यामुळे तटस्थपणा जास्त होता. तिथे जाऊन कळायला लागलं की निरनिराळ्या विचारधारा (Ideology) माणसाच्या दृष्टीला घडवतात किंवा बिघडवतात. सामाजिक प्रश्नांना अभ्यासण्याच्या, भिडण्याच्या पद्धती विचारधारेतनं येतात. यातल्या प्रत्येक विचारधारेची कार्यपद्धती वेगळी. उद्दिष्टे मात्र जवळपास समान माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानाची. पण तरीही एकमेकांविषयी कमालीची असहिष्णूता भरलेली. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची तीच पूर्वग्रहदूषित दृष्टी.
मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
गांधीवादी, समाजवादी, भांडवलवादी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी, माओवादी, सुधारणावादी, क्रांतीवादी, वगैरे अशी सगळीच मंडळी विकासाच्या प्रश्नांबाबत आपापले दावे करत असतात. या प्रत्येकाच्या बोलण्यात काही तथ्य आहे पण ते अपूरे आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीचा पुरावा निवडत आणि दाखवत असतो. प्रत्येकाची विचारधारा ही त्यांच्यासाठी देव बनली आहे, ज्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्याची गरज नाही. असलीच तर ते सोयीचा पुरावा गोळा करतात किंवा सांगतात. ही तर वैचारिक गुलामी झाली. असे गुलाम मला विद्यापीठांमध्ये दिसतात आणि सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा भेटतात. ते जसे समवयीन असतात तसे ज्येष्ठ सुद्धा असतात. ज्येष्ठांकडे जसे ज्ञान आणि अनुभव असतो तशी झापडं सुद्धा असतात.
विकासाचे प्रश्न फार गुंतागुंतीचे आहेत. त्यांचे अतिसुलभिकरण (over-simplification) करुन चालणार नाही. विकासाच्या परस्पर विरोधी कल्पना किंवा मतप्रवाहांच्या जंजाळात आपण हरवून जाऊ नये म्हणून स्वतंत्र आणि पूर्वग्रहरहीत दृष्टीची गरज आहे. स्वतंत्र, पूर्वग्रहरहीत दृष्टीने सृष्टीला बघण्यासाठी, बदलण्यासाठी नीरक्षीर विवेक अंगी बाणवता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धीला शास्रकाट्याची धार आलीच पाहिजेत. विकासाच्या प्रश्नांकडे बघण्याची आपली दृष्टी शास्त्रीय असली पाहिजे. टीआयएसएस मध्ये असतांना माझ्यासोबत सर्वोत्तम काही घडले असेल तर ते म्हणजे सामाजिक शास्त्रांचा आणि विवेकनिष्ठ मानसशास्त्राचा परिचय. विकासाच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी, भिडण्यासाठी मला आता सामाजिक शास्त्रे मदत करतात तर माणसांना समजून घेण्यासाठी विवेकनिष्ठ मानसशास्त्र उपयोगी पडते.
थोडक्यात सांगायचे तर विकासाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची नितांत गरज आहे असे मला वाटते. एक, समस्यांकडे बघण्याची स्वतंत्र, व्यापक दृष्टी (perspective) आणि दोन, क्षमता बांधणी (Knowledge and skills). आपले प्रयत्न योग्य दिशेने
आहेत ना ते तपासण्यासाठी व्यापक दृष्टी हवी आणि त्या दिशेने जोमाने पुढे जाण्यासाठी विशिष्ट विषयातील ज्ञान आणि कौशल्ये हवी.

(प्रस्तृत लिखाणाचा उद्देश सामाजिक क्षेत्रातील माझ्या ५ वर्षांतील अनुभवांची/शिक्षणाची सविस्तर मांडणी करणे नसून आपण सामाजिक प्रश्नांना काय दृष्टीने बघतो हे अधोरेखीत करणे असा आहे. विकासाच्या प्रश्नांना बघण्याची आपली दृष्टी कुठून येते? कशी बनते? ती स्वतंत्र, वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रहरहित आहे का? की पोथीनिष्ठ आहे, भाड्याने घेतली आहे? अशा प्रश्नांची छानणी काही व्यक्तिगत अनुभवांमधून करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.)
गोपाल महाजन

कोणाचा विकास आणि कसला विकास ?



दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर हा प्रकल्प दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या सहा राज्यांतून जाणार असून या एका प्रकल्पाकरिता ४,३६,८३६ चौ.कि.मी एवढया अवाढव्य प्रमाणात जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे देशातील जवळपास १८% जनता प्रभावित होणार आहे. महाराष्ट्रात याचे ९ प्रकल्प उभे केले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यात दिघी पोर्ट औदयोगीक क्षेत्र घोषित झाले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून रायगड जिह्यातील माणगाव, रोहा व तळा तालुक्यातील ७८ गावांची  ६७,५०० एकर जागा संपादित केली जाणार आहे. या क्षेत्रात स्पेशल इकॉनॉमिक झोन, ऊर्जाप्रकल्प, बंदरे, विमानतळे, पंचतारांकित वसाहत, आंतरराष्टीय विद्यापीठे, करमणूक केंद्रे आदी व्यवस्थांची सोय केली जाणार आहे. यामधील ५५% जमीन केवळ टाऊनशिपसाठी म्हणजे बाहेरून येणाऱ्या श्रीमंतांसाठी राहायला ठेवण्यात येणार आहे.

भारताने जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे स्पेशल इकॉनॉमिक झोन’ (सेझ) सारखे कायदे आपल्याकडे आले आहेत आणि सेझ कायद्याला देशभर विरोध होत असताना त्याच कायद्याच्या चौकटीवर नवीन प्रकल्प सरकार दामटून घेऊन येत आहे. त्यामध्ये नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्वेस्टमेंट झोन, पेट्रोलिअम-केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स इनव्हेस्टमेंट रीजन आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर यांचा समावेश आहे. यांची उद्दिष्टे रोजगार दुपटीने, औद्योगिक उत्पादन तिपटीने आणि निर्यात चौपटीने वाढविणे अशी आहेत.
परंतु या लेखात आपण दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर बद्दल आपण चर्चा करणार आहोत. हा प्रकल्प दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या सहा राज्यांतून जाणार असून या एका प्रकल्पाकरिता ४,३६,८३६ चौ.कि.मी एवढया अवाढव्य प्रमाणात जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे देशातील जवळपास १८% जनता प्रभावित होणार आहे. महाराष्ट्रात याचे ९ प्रकल्प उभे केले जाणार असून मी ज्या विभागात काम करीत आहे त्या रायगड जिल्ह्यात दिघी पोर्ट औदयोगीक क्षेत्र घोषित झाले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून रायगड जिह्यातील माणगाव, रोहा व तळा तालुक्यातील ७८ गावांची  ६७,५०० एकर जागा संपादित केली जाणार आहे. या क्षेत्रात स्पेशल इकॉनॉमिक झोन, ऊर्जाप्रकल्प, बंदरे, विमानतळे, पंचतारांकित वसाहत, आंतरराष्टीय विद्यापीठे, करमणूक केंद्रे आदी व्यवस्थांची सोय केली जाणार आहे. यामधील ५५% जमीन केवळ  टाऊनशिपसाठी म्हणजे बाहेरून येणाऱ्या श्रीमंतांसाठी राहायला ठेवण्यात येणार आहे. यामध्ये जागतिक बँक, जपान सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे, परंतु स्थानिक शेतकऱ्याला आपला परिसर वाचविण्याकरिता देशातील तज्ञ लोकांचा सल्ला आणि जनसुनवाई मध्ये सहभाग घेता येणार नाही. या प्रकल्पाची प्रमुख सूत्रे थोडक्यात अशी आहेत:
१.      येणाऱ्या उद्योगांना १० वर्षे १००% सूट: 
a.       प्रकल्प बांधकामासाठी लागणाऱ्या माती, दगड, रेतीवर रॉयल्टी नाही; पाणी व वीजेसाठी कर्ज मुक्ती; स्टँप डयुटी, रजिस्ट्रेशन फी नाही; सर्व करात संपूर्ण सूट.
२.      जमीनीखालील पाणी उपसण्याचे अनियंत्रित, मोकाट अधिकार
३.      कामगार कायदे लागू होणार नाहीत, असलेले कायदे शिथिल केले जातील.
४.      संपूर्ण क्षेत्राचा कारभार एक विशेष प्राधिकरण पाहील, ज्यामध्ये सरकारी व खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी असतील. लोकप्रतिनिधीना कुठलाही वाव नसेल.
५.      या क्षेत्रात पंचायत समिती, जिल्हा परिषदांना अधिकार असणार नाहीत. त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार येथील प्राधिकरणाला असतील.
६.      या क्षेत्राला विदेशी भूमीचा दर्जा असेल. सेझ कायद्याशी सुसंगत नसणारे कायदे नोटिफिकेशनद्वारे बदलण्यात येतील. याला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. सेझ कायद्याला सर्वोच्च अधिकार असतील. 
७.      पर्यावरण संरक्षणाचे कायदे शिथिल करण्यात येतील.
८.      स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असेल आणि स्वतंत्र न्यायालये असतील.
तसेच या धोरणाच्या मसुद्याला जॉबलॉस पॉलिसीची पुष्टी जोडण्यात आली आहे. ही पॉलिसी बजाज अलियांझने बनवली आहे, ज्यात प्लांट बंद करण्याची यंत्रणा सुलभ करण्यात आली आहे. ही योजना ६ राज्यातील विधीमंडळासमोर मांडण्यात आलेली नाही.
हे सर्व पाहता कोणत्याही निर्बंधांविना मोकाट वाट करून दिली जाणार असून यातून कोणाचा आणि कसला विकास होणार असा प्रश्न कोणत्याही सूज्ञ माणसाला पडेल. यात कंपन्यांना रेड कार्पेट हांथरले जात असून देशाच्या सार्वभौमत्वालाच धक्का दिला जात आहे. हे सर्व बघता शेतकरी आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात खूप प्रश्न पुढे उभे राहतात. तंत्रज्ञानने प्रगती केली असूनसुद्धा एवढया मोठ्या प्रमाणात उद्योगाकरिता जागा संपादित का केल्या जात आहेत? यात तर बिल्डरांच्या उद्योगलाच वाव दिला जातोय. ग्रामीण विकास मंत्रालयाने सुपीक आणि सिंचित जमीन संपादित केली जाणार नाही असे सांगितलंय. नवीन भू संपादित कायद्याप्रमाणे ७०% शेतकऱ्यांच्या मान्यतेशिवाय भूसंपादन केले जाऊ शकत नाही. असे असून सुद्धा सात-बाऱ्यावर शिक्के बसले जात आहेत. प्रकल्पाकरिता जागा कंपनी भाडे तत्त्वावर का घेतली जात नाही? ह्या प्रकल्पचा मसुदा २००५ मध्येच मंत्रालय स्तरावर बनूनसुद्धा लोकांना याबद्दल कल्पना का दिली गेली नाही? अजूनसुद्धा या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाला नसताना भू-संपादन कसे सुरु झाले? कोकणात खूप पाउस पडतो शेती दुबार झाली तर स्थानिक लोकांना मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि शहराकडील स्थलांतर थांबेल. परंतु सिंचनाची सोय नाही. पर्यटनाला वाव असताना पर्यटनाच्या धोरणांचा अभाव आहे. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी लढा उभारला आहे. शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र असंतोष आहे. परंतु याला विरोध करणाऱ्यांना विकासविरोधी हे बिरूद लावले जात आहे. आम्हालाही विकास हवा आहे. परंतु तो सर्वसमावेशक असावा, ज्यामध्ये आपल्या देशातील लोकसंख्या लक्षात घेता तो श्रमप्रधान असावा. आपल्या सध्याच्या या आशा प्रकारच्या विकास प्रक्रियेमुळेच समाजात तीव्र दरी निर्माण झाली आहे.  या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया स्थगित व्हावी म्हणून १० एप्रिल २०१३ पासून धरणे आंदोलन सुरु झाले आहे. रोज एक गाव येऊन प्रांत कार्यालयासमोर धरणे धरत आहे. हे सगळं थांबविण्याकरिता समाजातील सर्व स्तरातील जागरूक नागरिकांनी, लोक प्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी पुढे यायला पाहिजे. नाही तर आपली वाटचाल विकासाकडे नाही, तर अराजकतेकडे होईल.         
यशवंत झगडे सर्वहारा जन आंदोलन
संदर्भ - http://www.dmicdc.com/

पुस्तक परिचय


क्रांतीचे पुढचे पाउल- दादा धर्माधिकारी


            
दादा धर्माधिकारी
क्रांतीचे पुढचे पाउलहे दिसायला छोटे, पण वैचारिकदृष्ट्या फार महत्त्वाचे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हटलं तर वाचायला ५० पानी, पण त्यातला मजकूर ५ दशके उलटून गेल्यानंतरही ताजा व विचार करायला लावणारा आहे. १९५६ साली प्रसिद्ध झाले असल्यामुळे उदाहरणे व वर्णने त्यावेळच्या परिस्थितीनुसार आहेत.
            आतापर्यंत भूदान चळवळ ही केवळ शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात संक्षिप्त रूपात वाचली होती. हे पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच प्रमाणात या चळवळीविषयी स्पष्टता येते. आचार्य विनोबाजींचा ही चळवळ सुरू करण्यामागचा हेतू, त्याचा अर्थ, देशाला त्याचा होणारा फायदा हा विनोबाजींच्याच विचारांचा आधार घेऊन स्पष्ट केलेला आहे.
यात भूदान चळवळीला भूदानयज्ञ आणि या यज्ञात आपले जीवन समर्पित करणाऱ्यांना जीवनदानी म्हटले आहे. असे जीवनदानी निर्माण करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असे विनोबाजी प्रस्तावनेत म्हणतात.
            हे पुस्तक वाचताना यातली उदाहरणे ही तंतोतंत आपल्या जीवनाला किंवा आजच्या काळाला लागू पडतात आणि त्या काळी मांडलेल्या विचारावरून आज आपली कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे याबद्दल आपल्या मनात प्रश्न उभे राहतात. समाजात विषमता, गरीबी आणि वर्गभेद निर्माण होण्याची कारणे आणि संपवण्यासाठी भूदानयज्ञाच्या रूपाने विनोबाजींनी त्याकाळात केलेले प्रयत्न यांचे वर्णन येथे मांडलेले आहे. त्याकाळच्या वर्णनावरून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे वास्तव चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
            आज गरीबी हटावचा जो प्रयत्न आपल्याकडे केला जात आहे, त्यासाठी हे पुस्तक एक अभ्यासाचे साधन म्हणून फार उपयुक्त आहे. याचा अभ्यास करून जर अंमलबजावणी करण्यात आली, तर काही प्रमाणात आपल्यासमोरील प्रश्न नक्की कमी करता येतील.
            काही लोकांकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती व जमीन आणि दुसरीकडे खायला अन्न नाही व शेती करायला जमीन नाही अशी जी परिस्थिती आज दिसते ती निवारण्यासाठी/निर्माण होऊ नये म्हणून विनोबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढचे भविष्य ओळखून प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
            यामध्ये सत्याग्रहाविषयीचे विनोबांचे विचार लेखकाने मांडले आहेत. तसेच सत्याग्रहामध्ये किंवा क्रांतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या लोकांनी कसे असावे याचे मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे. आपण तरुणांसाठी किंवा सामाजिक क्षेत्रांत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे विचार मार्गदर्शक आहेत. त्यातील एक विचार पुढीलप्रमाणे आहे: जो लोककार्यात मग्न आहे, तो लोकसेवेसाठीच पोट भरतो आणि जो स्वार्थत्यागी आहे, तो इतरांना सुखी करण्यासाठी संयम राखून बलिदान करतो. दोघांत हा बुनियादी भेद आहे.
या पुस्तकातील प्रत्येक लेखातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे.
निखिल मुळ्ये

तिनका तिनका जर्रा जर्रा



१३ एप्रिल २०१३ च्या Indian Express मध्ये Peter Ronald Desouza यांचा  लेख आहे, Why Politics Needs the Ashram नावाचा. लेखक शिमला येथील Indian Institute of Advanced Studyचे संचालक आहेत. त्यांच्या लेखाची सुरुवात अशी --
आश्रमातील जीवनावरच्या Ashram Observances in Action नावाच्या पुस्तिकेत गांधीजींनी आश्रम जीवनाचे नेमनियम नोंदले. शेवटी ते जे म्हणाले, ते मला नेहेमीच गुंगवत आले आहे. (ते लिहितात...) Last of all, when you have observed these rules, think that then, and not till then, you may come to politics and dabble in them to your heart's content, and certainly you will then never go wrong.”
(मला जाणवते आहे की काही 'जुने' निर्माणी मनात म्हणताहेत, “सैतानाच्या तोंडून बायबल!किंवा आणखी कठोर, “सौ चूहे खाके बिल्ली हज को चली!”)
मला आश्रम-जीवनाचे नियम काय आहेत किंवा काय असावेत यावर काही म्हणायचे नाही. त्या नियमांना मान्यता देऊन ते अंगवळणी पडल्याशिवाय राजकारणात ढवळाढवळ करू नये, हे गांधीजींचे म्हणणे आणि त्या म्हणण्याची श्री डिसूझान्वर पडलेली मोहिनी, या दोन्ही गोष्टी मला पटतात, आणि तुम्ही इंडियन एक्स्प्रेस वाचाल तर बहुधा तुम्हालाही पटतील. 
अत्ता मात्र मला शिक्षणप्रक्रियेतली एक गमतीदार बाब तुमच्यापुढे मांडायची आहे. शिक्षणाचा पाया म्हणा किंवा पहिले पाउल म्हणा, हे शिक्षकाने विद्यार्थ्यांना नियम घालून देण्यातून घडते. हे नियम विद्यार्थ्यांना पटवूनदिले जात नाहीत, तर ते आदेशअसतात. एक दोन उदाहरणे देतो. 
थोर तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल भूमिती शिकायला सुरुवात करत होता. युक्लिडच्या पद्धतीने शिकवले जात होते, की आधी काही गृहीतके(axioms), मग त्यांपासून सिद्धांत (theorems)वगैरे. रसेलला एक गृहीतकच पटेना (कोणते ते मी सांगत नाही!). तो आठदहा वर्षांचा होता, आणि शिक्षकांशी हुज्जत घालायला लागला. शिक्षक म्हणाले, “हे मान्य केलं नाहीस तर पुढे काहीच शिकता येणार नाही.रात्रभर तळमळत जागे राहून मग रसेलने गृहीतक मान्य केले, तेही खिन्नपणे, की ते मान्य केल्याशिवाय पुढे शिकता येणारच नाही.
रसेलहूनही थोर तत्वज्ञ इमान्युएल कांट नीतिशास्त्र रचत होता. खूप विचारमंथनातून त्याने मूठभर नीतिनियम ठरवले. त्यांना नाव दिले “Categorical Imperatives”, अनुल्लंघनीय, निरपवाद आज्ञा! स्वतःच नियम करणारे असल्यासारखे वागा”, “इतरांवर किंवा स्वतःच्या अवयवांवर आपले निर्णय लादू नका”, वगैरे नियम कांटने दिले”. ते तसे का आहेत हे स्पष्ट करायला दोन अति-महा-बहु-अल्ट्रा-सुपर जड ग्रंथ लिहिले. पण होते ते आदेशच!
मी ना रसेलचे चरित्र वाचले आहे, ना कांट वाचला आहे. मित्रांकडून ऐकलेले सांगतो आहे. पण मुद्दा तो नाही. ज्ञानाची देवाणघेवाण करताना एका टप्प्यावर तरी लोकशाही”, “व्यक्तीस्वातंत्र्यवगैरे विसरून जाऊन शिक्षकांना हुकूमद्यावा लागतो. त्याशिवाय पुढे जाता येतच नाही!
                     
नंदा


TREES- Joyce Kilmer


I think I shall never see
A poem lovely as a tree.

A tree whose hungry mouth is prest
Against the earth's sweet-flowing breast;

A tree that looks at God all day
And lifts her leafy arms to pray.

A tree that may in Summer wear
A nest of robins in her hair;

Upon whose bosom snow has lain;
Who intimately lives with rain.

Poems are made by fools like me,
But only God can make a tree.