'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

सीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१६

सौजन्य: अमृता ढगे

डॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .

आपल्या बॅचच्या बहुतेक मित्रमैत्रिणी जी गोष्ट हमखास टाळतात तीच निर्माणच्या ६ तरूण डॉक्टरांनी केली आहे. अमित, प्रथमेश, ज्योती, कल्याणी, शिवाजी, दिग्विजय, अविनाश या आपल्या मित्रांनी जेथे गरज आहे अशा ग्रामीण / आदिवासी भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. MOship च्या त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याच शब्दांत...
  
jyo1073@gmail.com
ज्योती सदाकाळ (निर्माण ५), PHC, परिंचेता. पुरंदरपुणे
मी एका वर्षापूर्वीच Moship करायची हे ठरवले होते आणि त्यामुळे मी इंटर्नशिप मन लावून करत होते, आणि सोबत अभ्यास पण सुरु होता. मला काम करताना पाहून बरेच जण म्हणायचे, की PG entrance मध्ये चांगला rank मिळणार नाही या भीतीने Moship करणे हा excuse आहे. मला रोज समजावीत होते की तू जॉईन नको करू, PG चा अभ्यास कर. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. घरचे सुरवातीला थोडे संभ्रमात होते, पण त्यांनी परवानगी दिली. त्यासोबत खूप साऱ्या अटी पण मान्य कराव्या लागल्या.
इथे जॉईन होऊन एक महिना झालाय, माझ्या MBBS च्या अभ्यासा व्यतिरिक्त खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.. नवीन जागा, नवीन लोक, नवीन केसेस, राजकारण... खूप चांगला अनुभव आहे

 ***
prathamesh.hemnani@gmail.com
प्रथमेश हेमनानी (निर्माण ६), PHC, पेंढरी, ता. धानोरा,  गडचिरोली
 “तुझ डोक फिरलंय का? पुढ शिकायचं नाही का? PG च काय?” मी MOship करण्याचा निर्णय घेतल्या नंतर मला ह्या प्रश्नांनी घेरलं. माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च सरकारने केला, आता मी वैद्यकीय सेवा पुरवून ते ऋण परत करणे ही माझी जबाबदारी आहेमाझा निर्णय पक्का झाला होता.
गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक आहे. १८-२० घरांची वस्ती असलेल्या गावात वीज नाही, पावसाळ्यात तर बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. अशा गावात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे खूप गरजेचे आहे. या वर्षभरात खूप काही शिकायचे आहे, जसे की स्वतंत्रपणे वैद्यकीय प्रॅक्टिस, PHC ची प्रशासकीय व्यवस्था पाहणे, जबाबदारी घेणे, इ. अर्थात गोंडी भाषा (आदिवासींची) शिकणे ह्या यादीत सर्वांत वर आहे...
 ***
kalyanipansare19@gmail.com
कल्याणी पानसरे (निर्माण ६), PHC, मूर्ती, ता. बारामती, पुणे
मला या निर्णयापर्यंत येण्यात निर्माण प्रक्रियेची खूप मदत झाली. मला स्वतःविषयी व कामाविषयी अधिक स्पष्टता आली. मी इंटर्नशिप करत असतानाच या MOship करण्याच्या दृष्टीने तयारी करायला सुरवात केली होती.
इथे अंतर्गत राजकारण खूप आहे, तरीपण मी इथेच रहायचा निर्णय घेतला कारण इथे दुसरा कोणी वैद्यकीय अधिकारी नाही. स्वतः प्रॅक्टिस करणे, जबाबदारी घेणे, सर्व स्टाफला सांभाळून काम करणे ह्या गोष्टी शिकायला मिळतील. हे अनुभव मला वैयक्तिक व कामाच्या अशा दोनही पातळीवर अधिक सक्षम करतील अशी खात्री वाटते.
 ***
abdhage@gmail.com
अमित ढगे (निर्माण ६), PHC, जिमलगट्टाता. अहेरी, गडचिरोली 
गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात काम करणे गरजेचे आहे आणि अनुभव मिळण्याच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल या हेतूने मी गडचिरोली मध्ये MOship करण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला घरच्यांनी फारसा विरोध केला नाही. कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशी खूप एकटे वाटत होते, पण मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले.
इथे येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतोय. रुग्णांशी बोलताना माझा आत्मविश्वास आता वाढला आहे. जिथे कमी पडतो तिथे पुस्तके आहेतच सोबतीला... माझ्या कामाचा अभ्यासात आणि अभ्यासाचा कामात फायदा होतो आहे. मी जे ठरवले होते ते प्रत्यक्ष करताना मला छान वाटत आहे.
 ***
अविनाश गिरी (निर्माण ६), PHC, अशवीता. संगमनेर, अहमदनगर

avisai143@gmail.com
इंटर्नशिप झाल्यानंतर मी PG करणार होतो, पण कोणत्या विषयात करू ते समजत नव्हतं. मी पुढे ग्रामीण भागात काम करणार अस ठरवलं होत. त्यामुळे मला आवडणाऱ्या विषयात PG करण्यापेक्षा या भागातील लोकांचे आरोग्याचे प्रश्न कोणते आहेत, त्यांची गरज काय आहे त्यानुसार विषय निवडायचा असे ठरवले. इथे साखर कारखाना जवळ असल्याने ऊस तोड कामगारांची संख्या जास्त आहे. प्रसूती साठी आलेल्या महिला दवाखान्यात १ तास आधी येतात त्यामुळे कुठल्याही टेस्ट, हिस्ट्री शिवाय उपचार करावे लागतात. काम करताना अनुभवातून खूप शिकतोय.
 ***
bdigvijay101@gmail.com
दिग्विजय बंडगर (निर्माण ५), PHC, मन्ने राजाराम,  ता. भामरागड, गडचिरोली
महाराष्ट्रात गडचिरोली दुर्गम, गडचिरोलीत भामरागड तालुका दुर्गम आणि भामरागड तालुक्यात मन्ने राजाराम दुर्गम. मन्ने राजारामला जायला चांगला रस्ता नाही, public transport नाही, फोनला रेंज नाही, बहुतेक आदिवासी लोकसंख्या, गोंडी व तेलगु प्रमुख भाषा. मात्र आरोग्याच्या कठीण समस्या येथे आहेत. आदिवासींचे आरोग्यसेवेसाठी दवाखाना हे प्राधान्य नाही. म्हणजेच आव्हान खूप मोठे. याच PHC त पवन मिल्खेने (निर्माण ३) उत्तम काम केले होते. पवनने निर्माण केलेल्या सदिच्छांची, तसेच लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा) यांची दिग्विजयला खूप मदत होईल. (दिग्विजय प्रतिक्रियांसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.)
 ***
या सर्वच धाडसी मित्रमैत्रिणींना पुढील एक वर्षाच्या प्रवासात खूप शिकायला मिळो आणि पुढील आयुष्यात या वर्षाचा खूप उपयोग होवो अशा शुभेच्छा!


चावी घेऊन कुलूप शोधताना...!

२०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षात एक वेगळा पथशोधक उपक्रम करून बघायचा ठरवला. हा पथशोधक उपक्रम म्हणजेचावी घेऊन कुलूप शोधण्याचाएक प्रयत्न होता. चावी म्हणजे माझं शिक्षण झालेला विषय;‘माहिती तंत्रज्ञान’. कुलूप म्हणजेग्रामीण भागातील शिक्षण’. जोडीला शिक्षणात सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा. उस्मानाबाद जिल्ह्यातील १९९३च्या भूकंपग्रस्त हराळी गावात, ज्ञान प्रबोधिनीच्या केंद्रावर दोन वर्षांपूर्वी रुजू झालो. या वर्षी इथे या विषयाला explore करण्याचा प्रयत्न ज्ञान प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यातील काही अनुभव व शिक्षण मी (अश्विन भोंडवे) तुमच्या सर्वांबरोबर शेअर करत आहे...
पथशोधक उपक्रमाचे स्वरूप:
            चार गावांत दोन Facilitators (सहाध्यायी) दररोज एक-एक तास अभ्यासिका घेतात. अभ्यासिका शाळेत नसते व शाळेच्या वेळेत नसते. तर ही अभ्यासिका गावाने दिलेल्या एका खोलीत व शाळेच्या वेळेच्या आधी किंवा नंतर असते. सहाध्यायी बाईकवर जाताना पाठीवरच्या सॅक मध्ये ७-८ चार्जिंग केलेले लॅपटॉप्स घेऊन जातात. अभ्यासिकेत एक-एक लॅपटॉप मध्यभागी छोट्या स्टूलवर ठेवून त्या भोवती ६वी-७वीतील चार-चार विद्यार्थी गोल करून बसतात. ते चार विद्यार्थी सहाध्यायीच्या सांगण्यानूसार लॅपटॉपवर वेगवेगळ्या क्रिया करतात व त्यातूनच शिकतात आणि एकमेकांना शिकवतात. या शिवाय सहाध्यायी शिकलेले मुद्दे पक्के होण्याच्या दृष्टीने काही activity पण घेतात. या उपक्रमात चारही गावात मिळून १५० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
            जुलै २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत हा उपक्रम सुरु राहिला. या उपक्रमाच्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात आल्या. त्या पुढीलप्रमाणे...
तंत्रज्ञान एक साधन मात्र :        
सुरुवातीला लॅपटॉप पाहून गावकरी, पालक व मुलं सर्वांनाच याचे नाविन्य वाटले. पण जसे जसे लॅपटॉपचे नाविन्य कमी होऊ लागले, काही अभ्यासाशी संबंधी उपक्रम सुरु झाले तसा उत्साह घटू लागला. एक महिन्यानंतर काही ठराविक मुलच बाकी होती. या मुलांसाठी पुढील महिन्यात आम्ही इ-साधनांबरोबरच विविध अभ्यासपूरक उपक्रम सुरु केले. उदा. लॅपटॉपवर बघितलेल्या गोष्टींचे दृढीकरण विविध खेळांच्या माध्यमाने करणे, शिबीर व सहली, ... मुलांना त्यात रस वाटू लागला. सध्या आम्हालाशिक्षणविषय म्हणून अभ्यास करण्याची गरज वाटते आहे. जो विषय मुलांपर्यंत पोहचवायचा आहे त्या आशयावर प्रभुत्व असण्याची गरज वाटत आहे. म्हणून वाटते, की नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याची गरज नाही, ते आपोआप पोहचणार आहेच. (कदाचित काही लोकांना तंत्रज्ञानाची उपलब्धी आर्थिक कारणामुळे शक्य नसेल तिथे गरज असू शकते.) मुळात त्या विषयाकडे बघण्याची दृष्टी विकसित होण्याची गरज आहे असे दिसते. कारण तंत्रज्ञान फक्त वस्तू/ साधन आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले काम सोपे व वेगाने होणार आहे. पण त्या कामाची दृष्टीच नसेल तर ही साधने नव्याचे नऊ दिवस म्हणून राहतात व मूळ परीस्थितीत सहजा सहजी बदल होण्याची शक्यता कमी दिसते.
फक्त माहिती पुरे का?:
            ‘शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रात काही काम करू शकू का?’ असा शोध घेताना लक्षात आले की गावात सध्या मोबाईलच्या माध्यमाने माहिती तंत्रज्ञान गावात पोहोचले आहे. पण त्यावर सोशल मेडियाचा वापर अधिक होतो. याच्या खालोखाल व्हिडीओ पहाण्यासाठी जास्त वापर होतो. किती लोक काही ठराविक माहिती मिळण्यासाठी सर्फिंग करतात हा प्रश्नच पडला. याचा अभ्यास करायला हवा. थोडा सखोल विचार केला असता लक्षात आले की विचार करण्याची सवय फारच कमी आहे. त्यामुळे आजूबाजूला ज्या गोष्टी जशा चालू आहेत तशाच करण्यावर भर जास्त असतो. त्यात जास्त विश्वासार्हता पण वाटते. त्यामुळे नवी माहिती मिळवून, स्वत: अभ्यास किंवा विचार करून काही करण्याची गरज वाटत नाही.
शिक्षणाबद्दल शिक्षण:
            शिक्षणाशी संबंधी काही गोष्टी लक्षात येत आहेत. मुलं फारच बोलका, प्रामाणिक फीडबॅक सहजरीत्या देत असतात, जर ते बंधनात किंवा दबावाखाली नसले तर. त्यांना काय आवडले किंवा आवडले नाही हे आम्हाला सतत कळत होते. मुलांबरोबर पालकांचे शिक्षण होणे गरजेचे आहे असे वाटले. कारण गृह भेटीच्या वेळी पालकांबरोबर चर्चा केली असता बरेच पालक मुलाला पाढे किती येतात, इंग्रजी शब्द किती पाठ केले यातूनच त्याचा अभ्यास चालू आहे की नाही हे ठरवताना दिसले. शिक्षणात पाठांतराशिवाय इतरही गोष्टींचा अंतर्भाव असतो हे नियमितपणे पालकांपर्यंत पोहचवणे आवश्यक वाटते. याच बरोबर शिक्षण म्हणजे नेमके काय, त्यात कशाचा अंतर्भाव व्हावा व ते मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पोहचू शकते? यासाठी आमचा अभ्यास सुरु आहेच.
            शिक्षा पाकर भिक्षा मांगे, युवजन खाये ठोकर आज...: शाळेत असताना ही ओळ आम्ही म्हणत असायचो. पण अशीच काही परिस्थिती सध्या गावात दिसते. सहयोगींचा शोध घेताना, काही बरोबर प्रत्यक्ष काम करताना काही गोष्टी लक्षात आल्या. कागदाचे प्रमाणपत्र बऱ्याचजणांच्या जवळ आहे. पण ते नेमके कशाचे याचा गंधही नसतो. हातात कौशल्य नाही, डोक्यात जगण्यासाठी एखादा विचार किंवा ध्येय नाही, ‘गावात जी चालते चर्चा, तिकडे आमचा वळतो मोर्चाअशी अवस्था युवकांची! काही ठराविक प्रकारचे प्रयत्न करताना तरुण दिसतात. सैन्य भरती, स्पर्धा परीक्षातून सरकारी नोकरी, शहरात काही महिन्यांचे unskilled (क्वचित semi-skilled) काम करून भट्टी न जमल्याने गावात परत येतात, खूप कमी युवक शहरात चिकाटीने राहून आपली जागा स्थिर करू शकत आहेत. दुसऱ्या बाजूला युवतींना आणखीही घराच्या बाहेर, गावात किंवा शहरात (लग्न न करता) काम करणे म्हणजे आई-वडील किंवा नातेवाईकांमधील मुख्य सदस्यांना ताण वाटतो.
            पथशोधक उपक्रमासाठी सहाध्यायी शोधताना युवक-युवतींची अशी परिस्थिती लक्षात आली. सुरुवातीला दोन सहाध्यायी या कामासाठी नियुक्त केले. पण पुढील दोन महिन्यात ते लातूरला व पुण्याला स्वत:ला आजमावायला गेले. पुढे नवीन सहाध्यायींचा शोध घेतला व पुढे काम सुरु राहिले.
स्पीडब्रेकर:
            पूर्वी सर्च मध्ये काम करताना शिकलेल्या काही गोष्टींचा फार छान उपयोग झाला. मोजमापाचे महत्व, People participatory approach, नियोजन कौशल्य, गांधीजींचा जादूचा तावीत या सर्वांचा काम करताना निश्चित उपयोग झाला. याच बरोबर प्रबोधिनीतील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन पण वेळोवेळी मिळत होते. पण या गोष्टी असून देखील हा उपक्रम अधिक प्रभावी झाला नाही, असे मला वैयक्तिक वाटते. या साठी सखोल अभ्यासाचा व संकल्पपूर्वक ठरवलेले नियोजन टोकास नेण्याच्या शक्तीचा अभाव अशी कारणे लक्षात आले. स्वत:वर काम करणे खूप गरजेचे आहे; नाहीतर आपण स्वत:च कामाचे नकळत स्पीडब्रेकर बनत जातो.
समस्यांचा खजिना... पण दुबळी माझी झोळी:
            खडा मारू तिथे समस्या दिसेल, जिथे कामाला स्कोपच स्कोप आहे अशा उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात आहोत. त्यामुळे विविध समस्या जिवंतपणे, सगुण रुप घेऊन पुढे येतात. जसे की... दररोज संध्याकाळी घरात पाणी भरावे लागते म्हणून खेळू शकत नाही (७वी-१०वी मधील मुलं), ८वीला गेले म्हणून आता खेळणे बंद (मुली), १०वीला ९२% गुण मिळवले तरी देखील लग्न पुढील दोन वर्षात झालेच (एक मुलगी), या वर्षी चांगला कांदा आला पण कांदा काढताना अचानक पाऊस आला आणि कांद्याला काहीच भाव मिळाला नाही (तरुण शेतकरी), डोक्यावर कर्जाचा डोंगर होता उपाय म्हणून जगच सोडले (तिसी-चाळीशीचा एक शेतकरी)... असे अनेक प्रसंग किंवा समस्या कानावर येत असतात. वाटते लगेचच या कामाला देखील सुरुवात करावी. अशा वेळी एका मार्गदर्शक कार्यकर्त्याने सांगितले की... “या प्रश्नांना उघड्या डोळ्याने, संवेदनशीलतेने बघून कामाची परिणामकारकता व त्याची व्यापकता वाढवणे हा मार्ग जास्त योग्य असू शकतो.” तरी देखील अधूनमधून आपण इतर समस्यांवरही काम करावे अशी इच्छा होतेच!
Keep me serving:
            येत्या वर्षात या अनुभावातून धडे घेऊन पुढील नियोजन सुरु आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटी OFC च्या माध्यमाने लवकरच होईल असे दिसत आहे. तंत्रज्ञान जोरदारपणे गावात घरोघरी व प्रत्येक हातात येत आहे, स्थानिक गरजा ओळखून त्या संबंधी योग्य अशा चांगल्या आशयाची निवड किंवा निर्मिती करावी लागेल.सर्वात महत्त्वाचे शिक्षण म्हणून गावातील मुला-मुलींचा विकास कोणत्या विविध मार्गांनी होऊ शकेल याकडे अधिक लक्ष द्यायचे आहे; आणि जसे शक्य होईल तसे तंत्रज्ञानसाधन म्हणून नक्कीच वापरायचे आहे.
            एक प्रार्थना नेहमीच पुढे जाण्यास मदत करते:‘Give me love in my heart, keep me serving…, Keep me serving till the break of day!’

स्रोत: अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com

साक्षर लोक अन्न साक्षर असतात का?

            गेल्या ४ वर्षापासून आकाश (निर्माण ६) बीजोत्सावामध्ये सहभागी होत आहे. प्रत्येकाच्याच रोजच्या जगण्यात अन्नाचे इतके महत्त्व असूनही याबाबत सगळे का बर इतके उदासीन असावेत? हा प्रश्न त्याला पडायचा. आपल्या परिसरात, आजूबाजूला इतके शेतकरी सेंद्रीय शेती करतात, तरी यांना हवा तसा प्रतिसाद का बर मिळत नसेल? सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ का होत नाही? Monsanto सारख्या मोठमोठाल्या बीजोत्पादक कंपन्या अन्न सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी का बर खेळत असतील? असे प्रश्न त्याला सतावत होते.
            माझ्या ताटात येणारं अन्न कुठून येत आहे? त्यावर काय काय प्रक्रिया होत आहे? माझे अन्न पिकवणारा शेतकरी कुठल्या अवस्थेत आहे? या प्रश्नांची उत्तरं बहुतेक लोकांना देता येत नाहीत. अन्न पिकवणारा आणि अन्न खाणारा यामधील ही दरी कमी करायची या अंगाने आकाशने नागपूरमध्येअन्न साक्षरताया विषयावर काम करायचे ठरवले आहे.
           
लोकांना अन्न आणि शेतकरी याबद्दल जागरूक करणे असे त्याच्या कामाचे स्वरूप असेल. याअंतर्गत आकाश आणि त्याची टीम शेतावर प्रत्यक्ष काम करायला गेले. शेतातील कामे केली. कामाचा आर्थिक मोबदला किती? हे जाणून घेतले. आणि कशाप्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे याबद्दल समजून घेतले. अश्या छोट्या छोट्या अभ्यास सहलींचे नियोजन आकाश करतो. ज्याद्वारे लोकांना या सगळ्या गोष्टींचा नव्याने अनुभव मिळण्यास मदत होते. सोबतच नागपूर मध्ये सेंद्रीय शेतमाल आणि शुद्ध अन्न याबद्दल रविवारी सकाळी आणि सायंकाळी बागेसमोर जाऊन लोकांशी संवाद साधणे, विषमुक्त अन्न, अन्नातील भेसळ, GMO याबद्दल प्रश्न विचारून त्यांना जागरूक करणे अशी कामेही चालू असतातयेत्या २१ मे ला नागपूर मध्ये आकाश व टीम Monsanto कंपनी  विरोधात विशाल मोर्चा काढतो आहे आणि त्याच दिवशी सेंद्रिय शेतमाल वितरण केंद्राचे उद्घाटन पण होणार आहे. असा मोर्चा काढणारे नागपूर हे देशातील तिसरे तर आशिया खंडातील पाचवे शहर आहे.
            आकाशला तो करत असलेल्या कामात आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून एका गृहस्थांनी फेलोशिप देऊ केली आहे. आकाश व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल Times Of India मध्ये आलेल्या बातमीची लिंक - http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/group-pushes-safe-eating-through-organic-foods/articleshow/51870116.cms?from=mdr
            तुम्हीही नागपुरात असाल तर आकाशाला भेटूनअन्न साक्षरताया विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकाल आणि त्याच्या या कामात जमेल ती मदत करू शकाल...
            आकाशला त्याच्या पुढील कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
स्रोत: आकाश नवघरे, anaoghare@gmail.com