'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 12 February 2013

दारूविरुद्ध काय परिणामकारक ठरते?


मित्रांनो, चंद्रपूरमधील दारूबंदीची चळवळ सध्या जोमाने सुरू आहे. आपल्यातले अनेक निर्माणी यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. यात आपले सामाजिक कृतीचे शिक्षण होते आहे. सोबतच याला अभ्यासाची जोडही देऊया.
            दारूचे प्रमाण, त्याचे व्यक्तीवरील व समाजावरील दुष्परीणाम व दारूने होणारी हानी कमी करण्यासाठी कोणकोणती धोरणे व कृती उपयोगी व परिणामकारक ठरतात याचा आढावा घेणारा निबंध लॅन्सेट या जर्नलमधे प्रकाशित झाला होता. यातील अभ्यास व पुरावे मुख्यत: सधन (High income) देशांमधील आहेत व या निबंधात तेथील सर्व अनुभवांचा परिपाक मांडला आहे. काही पॉलिसींचा अभ्यास गरीब (Low income)  देशांमधेसुद्धा केला गेला आहे. भारतासारख्या सांस्कृतिक विविधता असलेल्या व विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थिती असलेल्या देशात दारूचा प्रश्न सोडवण्यासाठी पाश्चात्य देशांतील अनुभव व कृती किती व कशा उपयोगी ठरू शकतील याबद्दल जरूर विचार करायला हवा, त्यादृष्टीने या निबंधाचा अभ्यास उपयोगी ठरेल.
            या निबंधाच्या सारांशाची मांडणी या लेखात केलेली आहे. ज्या वाचकांना या विषयात अधिक  रस वाटतो ते हा निबंध वाचून आरोग्य व किंमतीच्या दृष्टीने विविध उपायांच्या परिणामकारकतेविषयी तपशीलवार आकडेवारी समजून घेऊ शकतात. हा निबंध पुढील संकेतस्थळावर मिळू शकतो: http://www.who.int/choice/publications/p_2009_CE_Alcohol_Lancet.pdf  
            या निबंधात नीती व कृतीची परिणामकारकता आठ वेगवेगळ्या विभागांमधे तपासली आहे.
१.      माहिती व आरोग्यशिक्षण:
जनमानसांतील ज्ञान वाढविण्यासाठी, दारूप्रश्न व त्याचे अपायांबद्दलची माहिती पसरविण्यासाठी अशा कृती उपयोगी ठरतात, परंतु दारूचा वापर व दुष्परीणाम कमी करण्यास त्या हातभार लावत नाहीत असा निष्कर्ष अनेक अभ्यासात निघाला आहे. दारूच्या बाटल्यांवर आरोग्यविषयक गंभीर सूचना देणारी विधाने दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यास मदतशीर ठरत नाहीत असेही अभ्यास दर्शवितात.
२.      आरोग्यसेवा क्षेत्र:
दारूच्या दुष्परिणांमांविषयी रुग्णाला सल्ला देणे हा सहसा दुर्लक्षिला गेलेला पण अतिशय परीणामकारक उपचाराचा उपाय आहे. दारूवर पूर्णपणे अवलंबित्व (Dependence) आले नाही पण हानिकारक पातळीचे दारू सेवन करतात अशा लोकांना थोडक्यात सल्ला देणे खूप उपयोगी ठरते.
३.      सामाजिक पातळीवरील कृती:
यामध्ये माहिती प्रसाराच्या साधनांचा वापर, दारू दुकानांच्या वेळेवरील बंधने, सामाजिक ठिकांणावरील दारूबंदी, कायद्यांची अंमलबजावणी, दारूविरोधी जाहिरात मोहिमा, सामाजिक संस्थांच्या कृती इत्यादी कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे. माहिती प्रसार साधनांचा वापर करून दारूविरोधी माहिती व ज्ञान पसरविणाच्या मार्गाने विविध स्तरांतून दारूविरोधी वातावरण निर्मिती करून राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळवणे व त्याद्वारे राजकीय अजेंडामधे दारूविरोधी कृतीला स्थान मिळविण्याची पद्धत उपयुक्त ठरते.
४.      दारू पिउन वाहन चालवण्याविरुद्ध नीती:
दारू पिण्यामुळे व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण जाऊन अपघात घडण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरील दारूच्या दुकानांची संख्या कमी करणे, दारूची किंमत वाढविणे, दारू अधिकृतरित्या विकत घेण्याचे वय वाढविणे यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होते. अर्थातच, यासाठी राजकीय पाठबळ महत्वाचे ठरते. चालकांच्या रक्तातील दारूचे हानिकारक पातळीचे कमाल प्रमाण ठरविणे व रस्त्यांवर नियमित तपासणी करणे यामुळे अपघातांचे प्रमाण व जिवित हानी कमी होते.
५.      दारूची उपलब्धता कमी करणे:
अनेक देशांमधे, ज्यांत मुख्यत्वेकरून मुस्लीम लोकसंख्या आहे, दारूबंदी आहे. याशिवाय दारू विकत घेण्याचे वय व पिण्याचे वय वाढविणे, सोबतच या कायद्याची अंमलबजावणी होणे उपयुक्त ठरते. एखाद्या भागात जास्त प्रामाणात दारूची दुकाने असतील तर त्या भागातील तरूणांमधे दारू पिण्याचे प्रमाण अधिक असते असे संशोधन आहे. त्यामुळे तेथे खून, मारामारी, स्त्रियांचे विनयभंग, गाड्यांचे अपघात यांचेही प्रमाण वाढलेले दिसते. या धर्तीवर दारूची दुकाने उघडी असण्याची वेळ कमी केल्याने सामाजिक हानी कमी होते.
६.      जाहिरातीमार्फत दारूचा प्रचारावर निर्बंध:
दारूची जाहिरात करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रे वापरण्य़ात येतात. ही तंत्रे नकळतपणे आपल्या मनात दारू वाईट नाही हा विचार रुजवून जातात. यासाठी दारूला खेळांशी व सांस्कृतिक कार्यक्रमांशी जोडले जाते. दारूच्या कंपन्या खेळांना, सांस्कृतिक कार्यक्रमांना पैसा पुरवितात व आपली जाहिरात करून घेतात. अशी जाहिरात केल्याने तरूणांमधे दारू लवकर पिणे सुरू होते व दारू पिण्याचे प्रमाण वाढते. यामुळे दारूची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करणे याबाबत कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी महत्वाची ठरते.
७.      कराच्या स्वरूपात दारूची किंमत वाढवणे:
बाजारातील वस्तूंची किंमत वाढविल्यावर त्या वस्तूचा वापर कमी होतो, त्याप्रमाणेच दारूची किंमत वाढविल्यावर दारूचा वापर कमी होतो. दारूवरील कर वाढविणे त्यामुळे परिणामकारक ठरते. दारूची किंमत वाढविल्यामुळे दारू पिणारे स्वस्त दारूकडे वळतात असे दिसून येते. किंमत वाढविणे समाजासाठी लांब पल्ल्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरते, असे संशोधन सांगते.
८.      बेकायदेशीर दारूविरुद्ध नीती:
बेकायदेशीर दारू, तस्करी केलेली दारू, हातभट्टीची दारू, काही विशिष्ट रसायनांचा दारूप्रमाणे वापर (उदा. स्पिरीट) यामधे सहसा मिथेनॉलचे प्रमाण भरपूर असते. यामुळे जिवितहानी अनेकदा घडते तसेच यकृताच्या रोगांचे प्रमाण सेवन करणा-यांमधे वाढते. यावर उपाय म्हाणून काही देशांमधे (उदा. ऑस्ट्रेलिया) मिथेनॉलच्या वापरावर कायदेशीर बन्दी आणली आहे. बेकायदेशीर दारू शासन हस्तक्षेपाने कमी करता येते.
वैयक्तिक पातळीवर दारू सेवनामुळे समाजाला वेगवेगळ्या स्वरूपात किंमत मोजावी लागते, या कारणामुळे शासनाचा हस्तक्षेप संयुक्तिक ठरतो.  

वैभव आगवणे, vaibhs.agavane2@gmail.com

पुस्तक परिचय: गोष्ट मेंढा गावाची- मिलिंद बोकील


या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक लिहिण्यास देण्याचा, ते लिहून झाल्यावर त्याचे वाचन करुन त्यातील लेखनास मान्यता देण्याचा आणि सरतेशेवटी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा ठराव मेंढा गावच्या ग्रामसभेने सर्वसहमतीने मंजूर केलेला आहे.एक पुस्तक अशा प्रक्रियेतून निर्माण व्हावे हे महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या साहित्यिक इतिहासातील पहिलेच उदाहरण असावे. अर्थात मेंढा गावाने अशी उदाहरणे घालून देण्याची सुरवात फार पूर्वीपासूनच केली आहे .


“दिल्ली मुंबईत आमचे सरकार
आमच्या गावात आम्हीच सरकार”
अशी घोषणा देऊन आणि ती प्रत्यक्षात उतरवून लोकशाही व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे उदाहरणदेखील या गावाने घालून दिलेले आहे.
मेंढा(लेखा) हे गडचिरोली जिल्हयाच्या धानोरा तालुक्यातील एक छोटे गाव.वनहक्क कायदा -२००६मधील तरतुदींनुसार आपल्या गावच्या भोवतालच्या सुमारे १८०० हेक्टर जंगलावर आणि त्यातील वनौपजावर सामूहिक हक्काचा दावा करणारे आणि तो मान्य करून घेणारे भारतातील पहिले गाव ठरल्यानंतर मेंढा गाव चर्चेत आले. पण ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी २७ एप्रिल २०११ रोजी स्वतः जातीने गावात येऊन, मुख्यमंत्री, गृहमंत्री, इतर वरिष्ठ मंत्री आणि नोकरशहांच्या उपस्थितीत या कायद्यान्वये बहाल करण्यात आलेल्या वनहक्क व्यवस्थापनाची परवाना पुस्तिका प्रदान केली त्या घटनेनंतर !
वरील परिस्थिती निर्माण होण्यास काय पार्श्वभूमी होती आणि मेंढा गावातील लोकांनी कोणत्या प्रकारे अहिंसक, लोकशाही मार्गाने संघर्ष करून आपला भोवतालच्या जंगलावरील परंपरागत व नैसर्गिक हक्क मान्य करवून घेतला त्याचे चित्रण या पुस्तकात आहे .परंतु हे परीक्षण फार ढोबळ मानाचे होईल.
हे पुस्तक म्हणजे गोष्टीच्या रूपाने जाणारे समाजशास्त्रीय लेखन, चिंतन आहे असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही, कारण यात आदिवासी समूह आणि निसर्ग यातील परस्पर संबंध, आदिवासींमधील पारंपारिक चालीरीती, शिक्षणपद्धती, आदिम-अभिजात जीवनशैलीने तिच्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या यंत्रणांशी केलेला संघर्ष, सामुहिक सर्वसहमतीने घडवून आणलेला आणि म्हणूनच स्थायी स्वरुपातला विकास, लोकशाही विकेंद्रीकरण इ.विषयांवर विस्तृत विवेचन मेंढा गावातील घडामोडींच्या अनुषंगाने केलेले आहे.
पुस्तकाचे नाव जरी गोष्ट मेंढा गावाचीअसे असले तरी ही एक गोष्ट नसून ते एक कथानक आहे आणि मुख्य म्हणजे ते एक सत्य कथानक आहे. वर उल्लेखलेली घटना ही या कथानकाची एक उपकथा आहे.अशा अनेक उपकथा या कथानकाला आहेत. मेंढा गाव, या गावाने आपले नैसर्गिक आणि घटनेने बहाल केलेले अधिकार प्रत्यक्षात मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू असला तरी हा संघर्ष आसूयेचा, जीवघेणा असा नाही, तो रक्तरंजितही नाही, पण तो रोमहर्षक नक्कीच आहे .
मेंढा गाव हे इतर पुरस्कार प्राप्त आदर्श गावांपेक्षा वेगळे आहे याचे कारण आपल्या आसपासच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी,आपले जीवन सुखमय करण्यासाठी आणि सामूहिक विकास करण्यासाठी राजकीय परिस्थितीत अमुलाग्र बदल घडवून आणण्याची असलेली निकड या गावाने ओळखली आणि त्या दिशेने अभ्यासपूर्ण आणि निश्चयपूर्वक वाटचाल केली. वर उद्धृत केलेली दिल्ली मुंबईत आमचे सरकार - आमच्या गावात आम्हीच सरकारही घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतितील सिंहासन खाली करो...जनता आयी हैया घोषणेशी साधर्म्य सांगणारी आहे. ही नुसती घोषणा नसून ते एक तत्त्व आहे. या तत्त्वात मेंढावासीयांना अभिप्रेत आहे ते स्थानीय पातळीवर सरकारच्या अधिकारांचे केलेले विकेंद्रीकरण आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून येणारी जबाबदारी आणि कर्तव्यांची जाणीव सुद्धा! मेंढा गावाने या तत्त्वाचा अविष्कार कुठे आणि कसा केला याचे विवेचन म्हणजे हे पुस्तक.
मिलिंद बोकिलांची कोणत्याही विषयावर लिहिण्यापूर्वी त्या विषयाच्या खोलात शिरण्याची, त्या विषयाच्या परिघातील प्रत्येक बाब विचारात घेण्याची, निरनिराळ्या तपशीलांची छाननी करण्याची, गरज पडेल तिथे ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि तात्त्विक संदर्भ देण्याची, समोर आलेली तथ्ये निष्पक्षपणे स्वीकारण्याची आणि असे करत असताना कोणत्याही परिस्थितीत वास्तवाशी फारकत न घेता(ही) संवेदनशीलता जपण्याची शैली या पुस्तकाच्या जडणघडणीस उपयुक्त ठरली आहे .
आज आधुनिक म्हणवणाऱ्या शहरी समाजात विविध समूहांचे परस्पर संबंध ताण-तणावाचे, संशयाचे बनलेले आहेत. नातेसंबंधांना व्यावहारिक स्वरूप आले आहे. स्वार्थी वृत्ती, दांभिकता, चंगळवाद बळावतो आहे. स्पर्धा निकोप राहिलेली नाही. ‘सर्वेत्र सुखिनः संतू | सर्वे संतू निरामयःअशी शिकवण देणाऱ्या समाजातूनच सहजीवनाची संकल्पना लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या समाजास मेंढा गावाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
एकूणच काय तर भ्रष्टाचार, अनैतिकता, विधिनिषेधशून्यता इ. दुराग्रहांमुळे एकूणच राजकीय प्रक्रियेपासून दुरावत चाललेल्या, संसदीय लोकशाही व्यवस्थेकडून भ्रमनिरास झालेल्या सामान्य माणसांस आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मेंढा गावचा प्रवास आशादायक आणि उत्साहवर्धक ठरेल.
आज विकासाच्या मूलभूत संकल्पनेची फेरतपासणी करण्याची आणि विकासाची प्रक्रिया, त्याची प्रारूपे यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी मेंढा गावाची गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.
प्रकाशक : ग्रामसभा, मेंढा
वितरक : मौज प्रकाशन गृह, मुंबई
टीप : या पुस्तकाच्या छपाई आणि इतर तांत्रिक बाबींचा खर्च वगळता, पुस्तकाच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम ग्रामसभा मेंढा यांच्या सार्वजनिक फंडात जमा होणार आहे.

मकरंद गजानन दीक्षित, meetmak23@gmail.com