'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 10 January 2017

आर्थिक घोटाळे आणि मी

           आदर्श! सत्यम! सहारा आणि सध्या गाजत असलेला मल्ल्या यांच्या कोटयावधींच्या घोटाळ्यांबद्दल आपण पेपरात वाचत असतो व बातम्यांमध्ये ऐकत असतोच. एवढे मोठे आकडे बघून ‘भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश!’ असाच विचार मनात डोकावतो. या घोटाळ्यांचे पुढे काही होते का? आणि कधी होते? या प्रश्नांची उत्तरे मात्र आपण शोधात राहतो.
   असाच विचार करत असताना मला अचानक आर्थिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये मदत करण्याची संधी मिळाली. अशा गुन्ह्यांमधील आर्थिक व्यवहारांच्या परीक्षणासाठी Chartered Accountant (सनदी लेखापाल) ची Forensic Auditor म्हणून नेमणूक केली जाते. अशा नेमणूक केलेल्या जळगाव मधील शेखर सोनाळकर या C.A. सोबत मी काम करू लागले. Chartered Accountant च्या नेहमीच्या कामापेक्षा हे क्षेत्र वेगळे आहे. सर्व आर्थिक व्यवहारांचे सखोल परीक्षण करून यातील परस्परसंबंध जोडून गैरव्यवहार शोधावा लागतो. त्यापुढे ती साखळी शोधून पोलिसांसोबत त्याचे पुरावे जोडावे लागतात.

सध्या आम्ही तीन घोटाळ्यांच्या तपासावर काम करत आहोत.
१. सहकारी संस्थांमधील संचालक मंडळाने केलेले गैरव्यवहार
२. Ponzi scheme – एका pvt. ltd. company ने दाम दुप्पट च्या आमिषाने गोळा केलेले कोट्यावधी रुपये व फरार झालेले डायरेक्टर
३. सरकारी संस्थेमधील घोटाळा (विशिष्ठ समाजघटकांच्या प्रगतीसाठी ही संस्था सरकारी अनुदान/निधी घेते.

   या गुन्ह्यांच्या तपास करताना असे जाणवले की खात्रीशीर गुंतवणुकीची हमी देण्यासाठी गरीब लोकांना मुख्य प्रवाहाच्या बँकिंगमध्ये आणणे गरजेचे आहे. कारण सहकारी पतसंस्था त्यांना आकर्षक व्याज दरात कर्जे सहजरीत्या उपलब्ध करून देतात. संचालकांनी केलेले घोटाळे बाहेर आल्यानंतर अशा लाखो ठेवीदारांचे पैसे बुडतात. त्यांचे घामाचे कष्टाचे पैसे आर्थिक गुन्हेगार केव्हाच घेऊन गेलेले असतात. ते परत मिळवून देणे हे एक मोठे आव्हानच आहे. आर्थिक साक्षरतेची आता प्रचंड गरज जाणवू लागली आहे.
   सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. यानिमित्ताने यंत्रणेसोबत जवळून काम करता आले. त्यांना असलेले फायदे, अधिकार व मर्यादा समजून घेता आल्या. आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख अडचण अशी आहे की पैशाची फेरफार वर्षानुवर्षे सुरु असते, ती उघडकीस खुप उशिरा येते. मग त्याचे परिणाम दिसू लागतात. मग लोक तक्रार नोंदवतात. (यातही काळा पैसा असलेले लोक पुढे येत नाहीत) त्यानंतर कारवाई सुरु होते, मग तपास आणि सरतेशेवटी न्यायालय, मग निकाल. ही सर्व खूप वर्षांची प्रक्रिया असते. यासोबत सरकारला पण खूप मर्यादा असतात. उदा. आर्थिक गुन्ह्यातील व्याख्या समजून घोटाळ्याचा तपास करणे, निधीची उपलब्धता, एकाच वेळी अनेक तपासाची जबाबदारी, सतत बदलणारे तपास अधिकारी, इ.
   आर्थिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये या अनेक टप्प्यांमधून पुढच्या टप्प्याला जाताना पुरावे बदलण्याचे, पुरावे नष्ट होण्याच्या शक्यता असतात. काही वेळा आरोपी सरळ तक्रारदारालाच पैसे देऊन टाकतात; त्यामुळे तपासच थांबतो. मात्र सगळ्यात चांगला मुद्दा की आर्थिक गुन्ह्यांमधील पुरावे हे documental evidence असल्याने पुराव्याची ताकद राहते (उदा. A transferred 50 lakhs to B – यात बदल होऊ शकत नाही). जर आम्ही चांगले काम करून forensic audit report मजबूत करून दिला तर आरोपीला शिक्षा होणार याची खात्री असते.

आर्थिक घोटाळ्यांपासून कसे वाचाल?
१. कोणत्याही दाम दुप्पट व जलद पैसे देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू नका.
२. आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहाच्या बँकिंगमध्ये आणण्यास प्रयत्न करा.
३. रोजंदारी करणारे, भाजीवाली, भांडीवाली यांना आवर्जून विचारा की ते पैसे कोठे गुंतवतात व कर्जे किती व्याज दराने घेतात. त्यांना आर्थिक साक्षर करा.
४. कोणत्याही संस्थेमध्ये गुंतवणूक करताना वार्षिक अहवाल – Balancesheet वाचा. त्यामध्ये संचालकांची कर्जे, संबंधित संस्था (related party) यांच्याशी व्यवहाराविषयी दिलेली माहिती नक्की वाचा.

गीता लेले, (निर्माण ६)



No comments:

Post a Comment