'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 10 January 2017

पुस्तक परिचय - स्वभाव विभाव

           आपल्या शरीरात मन आणि बुद्धी नावाचे दोन न दिसणारे पण अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. हे दोन्ही अवयव सदैव एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. मनाच्या स्वच्छंद उधळण्याला काही मर्यादा नाही. त्याला बुद्धीचा लगाम द्यावाच लागतो. मन एका क्षणात चंद्रावर जाऊन पोहोचते तर बुद्धीला त्याच चंद्रावर पोहोचायला यानाची गरज असते. या मनाचा लगाम फक्त बुद्धीच्याच हाती द्यावा. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांना जर मनावर हावी होऊ दिले तर मात्र काही खैर नाही. दैनंदिन आयुष्यात आपण असेच भावनिक लाटांमध्ये गटांगळ्या खात असतो. अश्याच काहीशा अवस्थेत मी असताना हातात आलं “स्वभाव विभाव”.
  आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घटनांमुळे आपल्याला आपला स्वभाव कळत जातो. आपला स्वभाव कळल्यावर आपण पुढे भविष्यात आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेऊ शकतो. आपल्याला आपला स्वभाव कळणं हि किती सुंदर गोष्ट आहे. स्वतःला स्वतःची अनुभूती होण्यासारखा दुसरा आनंद नाही. हा अनुभव मी “स्वभाव विभाव” वाचत असतांना, त्यावर मनन करतांना घेतला.
  मनोगत व्यक्त करतांनाच लेखक म्हणतो, हे पुस्तक लिहितांना त्याची भूमिका ही ‘मनोविकास’ तज्ञाची आहे आणि या पुस्तकाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी व्हावा. पुस्तकात २७ लेखांमध्ये विविध नात्यांमधील वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करीत लेखक मानवी आयुष्यातले भावनांचे उमलते, मावळते रंग आणि त्यांचा वर्णपट उलगडत जातो.

यातील काही लेखांचा मी इथे उल्लेख करेन.
  पुस्तकातील पहिलाच लेख वाचताना लक्षात आलं, अरेच्चा हे तर असंच माझ्याही मनात होतं कधी कधी. मलाही हेच प्रश्न पडतात. चला, म्हणजे खुद्द मनोविकास तज्ञ आनंद नाडकर्णी सुद्धा या अवस्थेतून गेले आहेत. आपण स्वतःला कधी कधी जितके भावनिकदृष्ट्या कमजोर समजतो ते म्हणजे आपलं पूर्ण व्यक्तिमत्व नाही, तर ती फक्त एक अवस्था आहे आणि कालपरत्वे ती बदलते.
  “मी आणि माझे गाणे...” प्रत्येक प्रसंगामध्ये काही घटक आपल्या नियंत्रणाखाली असतात तर काही आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. शक्यसाध्य आणि अशक्य यातला नेमका फरक आपल्याला कळायला हवा. कुठल्याही प्रसंगातून जात असताना आपल्या नियंत्रणाखाली असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपला दृष्टीकोन आणि आपले विचार. पण आपण स्वतःशीच भांडतो की परिस्थितीने बदलावे, आपल्या जवळच्या माणसांनी त्यांचे स्वभाव बदलावे व आपल्याला प्रतिसाद द्यावा. ज्या घटकांवर आपले नियंत्रण नव्हते-नाही-असणार नाही, त्यांच्यावर सारे लक्ष केंद्रित करण्याचा अट्टाहास आपल्याला आपल्या उद्दिष्टांपासून दूर नेतो. म्हणजेच नियंत्रणाखालील घटकांचा योग्य वापर केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते, भावनिक असमतोल कमी होतो.
  सुखद व दुःखद भावना या एकमेकांचे ठोस पर्याय नव्हे. दोन्ही गटातील भावना बदलत्या व्याप्तीमध्ये पण एकाच वेळी मनात असू शकतात, त्यांचे रंग व त्यांच्या छटा बदलू शकतात. ज्या रंगाचे अधिक्य त्याप्रमाणे वर्तन घडते; पण याचा अर्थ इतर छटा नसतातच असा नव्हे.
  “तिसऱ्या मजल्यावरचे तत्त्वज्ञान..” मानवी भावनांचे सुखद व दुःखद असे दोन भाग न करता त्याच्या वेगवेगळ्या छटा असून आपण त्यांना “अनुरूप-उचित-पोषक” पातळीवर आणावे याकरिता लेखक, या भावना व त्यांच्या वेगवेगळ्या छटा यांना एक सहा मजली इमारतीचे रूप देतो. मनातल्या या इमारतीचे नाव आहे भावना अपार्टमेंट. सहाव्या मजल्यावर टोकाच्या दुखद भावना राहतात. तीव्र संताप, अगतिक नैराश्य, भीषण चिंता, टेन्शन आणि खंत या काही प्रमुख भावना. या इमारतीच्या तळमजल्यावर आहेत शांती, समाधान, आनंद, प्रेम वगैरे. सहाव्या मजल्यावरील दुखद भावनांचे रुपांतर एका दमात सकारात्मक भावनांमध्ये होणार नाही. त्यांना प्रथम खुपणाऱ्या, पण तरीही “अनुरूप-उचित-पोषक” पातळीवर आणावे लागेल. या अनुरूप भावना म्हणजे तिसऱ्या मजल्यावरच्या भावना. नकारात्मक भावनांचे अस्तित्व नसणे म्हणजे बेचव जीवन. त्या जर सहाव्या मजल्यावर गेल्या तर खारटपणा; पण तिसऱ्या मजल्यावर म्हणजे प्रमाणात असतील तर जगण्याला चव आहे.
 
  “नाही म्हणावयाला..” कोणाला कुठल्याही गोष्टीकरिता नाही म्हणण्याचा प्रसंग आपल्या आयुष्यात अनेकदा येतो. इतरांना सांभाळून घेण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा तोंडघशी पडतो. स्वतःला सांभाळणेही विसरून जातो. हे सारे एकाबाजूने त्रासदायक असते. समोरच्या व्यक्तीचे वागणे, म्हणणे पटत नसूनही आपण मनातल्या मनात चडफडत राहतो. If you know to say ‘NO’ at times and how to receive a ‘NO’ at times, then world becomes a much better place for you to live in.
  “तोफेच्या तोंडी..” आपण सारेच कधी न कधी मुर्खासारखे किंवा वेड्यासारखे वागत असतो; पण चूक केल्यावर आपणच तिचे रुपांतर करतो गुन्ह्यामध्ये. एकदा ‘गुन्हेगार’ हे लेबल आपण स्वतःला लावले कि परिणामांची शिक्षा मुक्तपणे भोगण्याशिवाय कोणताही पर्याय आपण स्वतःसमोर ठेवत नाही. पण या स्वरूपाचा विचार व्यक्तीला चुकीपासून शिकायचे व त्याची पुनरावृत्ती टाळायची असे सांगत नाही. यासाठी माझ्या मनातली, माझ्या संदर्भातली भूमिका अशी करायला हवी – ‘मी चुका न करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तरीही माझ्या हातून चूक होऊ शकते. तसे झाल्यास मी प्रथम स्वतःला सांगेन, की तू जसा चुकणारा माणूस आहेस तसाच तू शिकणारा माणूसही आहेस. चुकीचे मूल्यमापन करून, तिच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न प्रथम. ते मार्गी लागले की झालेल्या चुकीबद्दल स्वतःला काहीतरी दंड द्यायचा.’ चुकीच्या वर्तनाची जबाबदारी उचलायची, पण तरीही स्वतःवर चुकांचे खिळे ठोकून सुळी चढवायचे नाही, हे कळले तर ‘स्वतःचा क्रॅास स्वतःच्या खांद्यावरून नेणे’ याचा भावार्थ समजू शकेल.
  “डौलदार परिवर्तन..” भावनिक पर्याय हे विरुद्ध टोकांचेच असतात. रागाच्या विरुद्ध मऊ मिळमिळीत भूमिका याशिवाय पर्यायच नसतो? स्वतःला त्रासदायक ठरणाऱ्या, उद्दिष्टांपासून स्वतःला दूर नेणाऱ्या भावनांमध्ये बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केल्यावर त्या व्यक्तीला स्वतः मधल्या ‘शांतशक्ती’ चा (quiet strength) अनुभव येत असतो. कणखरपणाचे नियंत्रित व उद्दिष्टाकडे नेणारे प्रदर्शन त्यामध्ये असते. ‘There is a difference between Change and Elegant change’ – Dr Albert Ellis
   बदल आणि डौलदार परिवर्तन यातील फरक काय? स्वतःला त्रास देणाऱ्या भावनांना योग्य जागा दाखवून व्यक्ती जेव्हा आपल्या वृत्ती – प्रवृत्ती मध्ये परिवर्तन करते आणि वैचारिक परिवर्तनाचा अतूट भाग म्हणून कृती होते तेव्हा त्यात डौल येतो.
   पुस्तक एकदा वाचून झाल्यावर आपल्याला सगळं कळलं असं होत नाही. तर पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. अनुभवावं लागतं. मानवी भावना, त्यातली गुंतागुंत, एकदाच वाचल्यावर कशी उलगडणार ?


सुवर्णा खडककर, (निर्माण ५)

No comments:

Post a Comment