निर्माणच्या सहाव्या बॅचच्या १२४ वैद्यकीय आणि अवैद्यकीय मित्र-मैत्रिणी
अधिकृतपणे आपल्या कुटुंबात दाखल झाल्या आहेत. दरवेळे प्रमाणे ‘तारूण्यभान ते
समाजभान’ ही या शिबिरांची theme होती. या शिबिरांबद्दल थोडक्यात...
वैद्यकीय शिबिराच्या काही दिवस आधी नायनांना सौम्य
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीने नागपूरला हलवावे लागले. मात्र शिबीर ठरलेल्या
वेळीच पार पडले पाहिजे असा अम्मा व नायना दोघांचाही आग्रह होता. या शिबिरात
दोघांचीही उपस्थिती अतिशय मर्यादित राहिली. दोघांच्या अनुपस्थितीत शिबिरार्थ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. योगेश कालकोंडे यांची खूप मदत झाली. या शिबिरात अनेक
सहभागी पद्धतीची सत्रे झाली. खेळ (उदा. जीतो जितना जित सको), Group exercises (माया केस स्टडी, Who is the best
doctor, धानोरा तालुक्याला विविध मार्गांनी ३ वर्षे आरोग्यसेवा देण्यासाठीच्या
नियोजनाचे सादरीकरण), Book club (१० जणांनी १० पुस्तकांबद्दल
सर्वांसमोर सादरीकरण केले), Journal club (६ गटांनी ६ scientific /
semi-scientific articles बद्दल सर्वांसमोर सादरीकरण केले),
वादविवाद, विनोबांच्या लेखांचे वाचन आणि गटचर्चा, रोज होणारे डायरीचे शेअरिंग
यांमार्फत शिबिरार्थ्यांनी शिबीर समृद्ध केले. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात अम्मा
व नायनांनी शिबिरार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. नायनांची तब्येत हळूहळू सुधारत आहे.
*****
निर्माणचा application form भरताना आपण बरेचदा लिहितो की, ‘मला समाजासाठी काही तरी करायचय, पण काय ते समजत नाही.’ शिक्षण क्षेत्रात काम करू की पर्यावरणाच्या क्षेत्रात, की
शेतीच्या क्षेत्रात करू? माझी आवड आणि कौशल्ये नेमकी कशात आहेत? हे ‘काय’ आपल्याला
कसं समजू शकेल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
‘कर के देखो’ या
तत्त्वानुसार प्रत्यक्ष काम करून योग्य निवड करण्यास मदत व्हावी यासाठी निर्माण तर्फे ‘कर के देखो’ फेलोशिप
सुरूकरण्यात येत आहे. यानुसार ३ फेलोजना एका
वर्षासाठी १०,००० रू प्रती महिना फेलोशिप देण्यात येईल. निर्माणच्या
सर्व ‘गुगल ग्रुप्स वर फेलोशिपचा तपशील पाठवला आहे. तरी ज्या निर्माणींना या
फेलोशिपची गरज असेल त्यांनी आपले नाव व resume १० मार्च पर्यंत contact.nirman@gmail.com वर पाठवावा.
*****
याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात
दारूबंदीची अंमलबजावणी एप्रिल २०१५ पासून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी
चंद्रपूरच्या महिलांच्या आंदोलनाला निर्माणच्या अनेक युवांनी सक्रीय पाठींबा दिला
होता. चंद्रपूरची दारूबंदी झाल्यावर गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा असा दारूबंद झोन तयार
होईल. २७ जानेवारी रोजी, पिताजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, ‘तिन्ही
जिल्ह्यांत परिणामकारक दारूबंदी कशी करता येईल?’ या प्रश्नावर विचारमंथन
करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि प्रशासकीय
अधिकारी यांची परिषद माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
शोधग्राममध्ये संपन्न झाली.
*****
No comments:
Post a Comment