'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 30 July 2012

गडचिरोलीतील ‘निमगाव’मधील हगवणीच्या साथीची पाहणी करण्यासाठी सर्चचे डॉक्टर पथक आणि निर्माणच्या गटाची गावास भेट


विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना अमृत,  डॉ. वैभव व डॉ. सुजय
12 जूनला गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या ‘निमगाव’ या गावात हगवणीची भयंकर साथ आल्याची बातमी सर्च टीमच्या कानावर आली. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही कळले. त्यामुळे या घटनेची पाहणी करण्यासाठी डॉ. योगेश काळकोंडे आणि सर्चच्या फिरते आरोग्य पथकातील निर्माणचे डॉक्टर्स डॉ. सुजय काकरमठ, डॉ. वैभव आगावणे तसेच अमृत बंग आणि निखिल जोशी यांनी संपूर्ण औषधोपचाराच्या साहित्यासकट निमगावला भेट दिली.
 
निमगावमध्ये एकूण 6 घरांची वस्ती असून लोकसंख्या 330 आहे. हे गाव ‘मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असले तरी ते केंद्रापासून 45 किमी दूर आहे. त्यामुळे 5 किमी अंतरावर असलेले ‘भाकरोंडी’चे केंद्र या गावास अधिक जवळ आहे. या गावात आशा नाही. MPW (गावपातळीवरील सरकारी आरोग्यसेवक) गेल्या सहा महिन्यापासून गायब आहे. यावरुन येथील आरोग्य व्यवस्थेची साधारण कल्पना येऊ शकेल.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाव अत्यंत अस्वच्छ होते. मागील 10 दिवसात गावातील 2 व्यक्तींचा हगवणीमुळे मृत्यु झाला होता. आणि 11 व्यक्ती हगवणीने आजारी होत्या. सर्च टीमने ज्यावेळी गावाला भेट दिली त्यावेळी मुरुमगावच्या डॉक्टरांनी उपचार सुरु केल्याचे सांगण्यात आले. सर्चच्या टीमने सर्व रुग्णांना ORS नियमित घेण्याचा सल्ला दिला. एका म्हातार्‍या महिलेला दवाखान्यात भरती करण्याची गरज होती. परंतु रोवणी चालू असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला जमणार नाही असे कारण पुढे करुन टीमने सांगून सुध्दाही तिला भरती केले गेले नाही.     

गावातील पाणी दुषित आहे का हे बघण्यासाठी डॉ. सुजय, डॉ वैभव, अमृत आणि निखिल यांनी 4 सार्वजनिक विहिरींचे, 3 हातपंपांचे आणि 2 रुग्णांच्या घराचे पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत आणले. तसेच विहिरीतील Bleaching powder चे प्रमाण निश्चित करण्यासाठी विहिरीची खोली व व्यास मोजला आणि त्याप्रमाणे विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले आहे का याची खातरजमा केली. यातील 2 घरांच्या पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नाहीत हे तपासणीनंतर सिध्द झाले आहे. विहिरीचे दुषित आढळले नाही. कदाचित गावात दोन मृत्यू झाल्यानंतर विहिरीचे ग्रामपंचायतीद्वारे Bleaching करण्यात आले असावे असा अंदाज आहे. पाण्याच्या नमुन्याचा रिझल्ट गावात कळवण्यात आला असून त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल अशी आशा आहे. रोगाच्या साथीच्या काळात आपत्कालीन सुविधा कशी द्यावी याचा एक चांगला अनुभव यानिमित्ताने निर्माणच्या गटाला मिळाला.  

No comments:

Post a Comment