'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 8 March 2013

ASER 2012: महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेचा पंचनामा


१७ जानेवारी २०१३, मानव संसाधन विकासमंत्री डॉ. एम. मंगपती पल्लम राजू यांच्या हस्ते, देशातील प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या असर २०१२ (ASER- Annual Status of Education Report)’ या अहवालाचे प्रकाशन दिल्ली येथे करण्यात आले. २००५ पासून, दरवर्षी, ‘असरही राष्ट्रीय पाहणी होते. दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्नशील असणार्या प्रथमया संस्थेच्या पुढाकाराने हे सर्वेक्षण केले जाते.
या सर्वेक्षणात ३-१६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येतो तसेच ५-१६ वयोगटातील मुलांची त्यांच्या भाषेतील वाचनाची व सोपी गणिते सोडवण्याची चाचणी घेतली जाते. असर २०१२ मध्ये या चाचणीसोबतच इंग्रजीची चाचणी घेण्यात आली. ह्या चाचण्या घेण्यासाठी प्रथमने काही प्रमाणित साधने (Standard tools) तयार केली आहेत. यावर्षी असरदेशातील, यादृच्छिक पद्धतीने (Randomization) निवडलेल्या १६१६६ गावांतील ५९६८४६ मुलांपर्यंत पोहोचले (महाराष्ट्र: ९६७ गावातील २७८३४ मुलं).
देशातील मुलं शाळेत जातात का? कोणत्या प्रकारच्या शाळेत जातात? खाजगी शिकवणीला जातात का? त्यांच्या भाषेत त्यांना वाचता येतं का? सोपी गणिते सोडवता येतात का? इंग्रजी भाषेची समज कशी आहे? २०१० च्या शिक्षणाधिकाराच्या तरतुदीप्रमाणे शाळेत सोयी सुविधा आहेत का? या सारख्या प्रश्नांचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला. या सर्वेक्षणाचे महाराष्ट्रासाठीचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
६-१४ वयोगटातील पटनोंदणी आणि उपस्थिती
·       ६-१४ वयोगटातील मुलांची पटनोंदणी ९८.५ % आहे व त्यापैकी ९०.५% मुले सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित होती. तसेच, त्यादिवशी ९२.३% शिक्षक शाळेत उपस्थित होते.
·       प्राथमिक शाळांच्या तुलनेत वरच्या इयत्तेत खाजगी शाळांची पटनोंदणी अधिक आहे. १४.२% दुसरीची मुले खाजगी शाळेत जातात. ६ वीत हे प्रमाण ४८.४% आणि ८ वीत ७८.४ % आहे.
वाचनाचा स्तर
·       ५ वीच्या ४१.७% मुलांना, २ रीच्या क्षमतेचा मराठीचा मजकूर वाचता आला नाही. २०१० साली हे प्रमाण २६.९% इतके होते व २०११ साली ३६.५% झाले.
·       ५ वीत शिकणार्या आणि २रीच्या क्षमतेचा मजकूर वाचू न शकणार्या मुलांचे प्रमाण खाजगी शाळांच्या (३७.८%) तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधे (४४.७%) अधिक आहे.

गणिताचा स्तर
·       ५ वीच्या ७७.४% मुलांना ३ रीच्या क्षमतेचे भागाकाराचे गणित सोडवता आले नाही.(२०१० ५८.६%, २०११ ६७.२%)
·       ५ वीतील जवळ-जवळ अर्ध्या मुलांना हातचा असलेली वजाबाकी जमत नाही.
·       ५ वीत शिकणार्या आणि भागाकार करू न शकणार्या मुलांचे प्रमाण खाजगी (७४.२%) आणि जिल्हा परिषद शाळांमधे (७९.९%) जवळपास सारखे आहे.
इंग्रजीचे ज्ञान
·       ५ वीतील ५२.७% मुलांना सोपे इंग्रजी शब्द व २१.२% मुलांना सोपी इंग्रजी वाक्ये वाचू शकले.
·       शब्द वाचणार्यांपैकी ६४% व वाक्य वाचणार्यांपैकी ५९% मुलांना संलग्नीत अर्थ स्वतःच्या भाषेत सांगता आला.
शाळाभेटी दरम्यानची निरीक्षणे
·       महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त प्राथमिक शाळांमध्ये सर्वेक्षणाच्या दिवशी २ रीची मुले १ किंवा जास्त इयत्तांसोबत बसले होते
·       ७०% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आढळली.
·       वापरण्याजोगे शौचालय ६०% पेक्षा कमी शाळांतून आढळले. मुलींसाठी शौचालयाची वेगळी सोय असलेल्यापैकी ५३.१% शाळांमध्ये ते वापरण्याजोगे होते.
शाळेतली बरीच मुलं त्यांच्या इयत्तेपेक्षा जवळ-जवळ तीन इयत्ता मागे आहेत. शाळेच्या प्रत्येक पातळीवर शिक्षणाचा स्तर सुधारणेहे बाराव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य ध्येय आहे. तेव्हा, २०१३-१४ या वर्षासाठी मुलांचा शिक्षण स्तर काय असला पाहिजे हे त्वरित ठरविणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, अनुश्रवण व मुल्यांकन यांच्या मदतीनेच शाळांना तो स्तर गाठता येईल.
समाधानकारक शिक्षणाशिवाय शिक्षणाची हमी निरर्थक आहे.
असर २०१२’ वाचण्यासाठी: http://www.pratham.org/file/ASER-2012report.pdf

हा अहवाल वाचताना मला पडलेले प्रश्न -
मला जमत नाही हे मुलांना कळत असेल का? की ते पळवाट शोधत राहतात? मग ते शाळेत का जातात? खिचडीसाठी??
Right To Education आल्यामुळे फायदा झाला??
मुलं मूर्त अनुभवापासून वंचित राहतात का?
सहजशिक्षण व्यापक प्रमाणात कसं देता येईल?
मी काय करू शकेन?

अतुल गायकवाड

No comments:

Post a Comment