'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 10 July 2013

गर्भाशयं काढताय??.. जरा थांबा !..


स्त्री कोणतीही तक्रार घेऊन गेली की तिला सर्रास गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. अगदी पद्धतशीरपणे तिला पटवून दिलं जातं – जसं आपण नखे काढतो, केस कापतो तसंच पिशवीचं पण. मुलं झालेत तर कशाला त्रास सहन करायचा, टाक काढून! गर्भाशय काढलेल्यात सगळयात कमी (माहित असलेलं) वय – १८ वर्षे!


येरळा प्रोजेक्ट सोसायटी ही N.G.O.१९९८ पासून जालिहाळ येथे कार्यरत आहे. सांगलीपासून १४० किमी. अंतरावर असणाऱ्या जत तालुक्यातील जालिहाळ येथे आजूबाजूच्या २२ गावांमध्ये ग्रामविकासाचं काम ही संस्था अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने करत आहे. सांगली जिल्ह्याचा विद्रुप असा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला दुष्काळी सीमाभाग, नेहमीच दुर्लक्षित आणि हेटाळणी झालेला. पण संस्थेने मात्र इथे अगदी अमूलाग्र परिवर्तन घडवून आणलेय. यापूर्वी निर्माण समुदायातील अनेकांनी इथे भेटही दिलीये. संस्थेच्या कम्युनिटी रेडिओचं उद्घाटन नायनांनीच केलंय.
त्यांना कांही दिवसांपूर्वी लक्षात आलं की या भागात महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याकरिता येरळाच्या श्री. राजा देशपांडे यांनी अमृतला निर्माणकडून या समस्येवर काही करता यईल का याबद्दल विचारणा केली. म्हणून मग आम्ही जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत बोलण्यातून ज्या गोष्टी कळाल्या त्या प्रचंड धक्कादायक होत्या.
·       ही समस्या खूप दिवसांपासून आहे. स्त्री कोणतीही तक्रार घेऊन गेली की तिला सर्रास गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
·       अगदी पद्धतशीरपणे तिला पटवून दिलं जातं – जसं आपण नखे काढतो, केस कापतो तसंच पिशवीचं पण. मुलं झालेत तर कशाला त्रास सहन करायचा, टाक काढून!
·       गर्भाशय काढलेल्यात सगळयात कमी (माहित असलेलं) वय – १८ वर्षे!
·       कोणतीच कागदपत्रे वगैरे कुणाकडं फारशी दिली जात नाहीत.
·       प्रत्यक्ष येरळाच्या स्टाफच्या घरातल्यांचीही गर्भाशयं काढली गेलीयेत.
·       गावांमध्ये यासाठीची रॅकेट्स कार्यरत असावीत.
·       जवळपास सर्व ऑपरेशन्स जत किंवा सांगलीतील खाजगी डॉक्टरांकडे होताहेत.
या सगळ्या गोष्टी खूपच भयंकर होत्या. आम्ही विचारलं, प्रमाण किती आहे? त्यावर म्हणाले नक्की आकडे सांगता येणार नाहीत पण प्रत्येक घरात महिला सापडतीलच! समस्या तर फारच गंभीर होती. मग यावर तोडगा काय आणि कसा काढायचा?
आम्ही विचार करायला सुरुवात केली. समस्येला हात घालण्यापूर्वी ती वेगवेगळ्या अंगानी समजून घेणं गरजेचं होतं. तसंच उपाय देण्यासाठी आपल्याकडं काय काय साधनं (Resources) उपलब्ध आहेत हे पहाणं गरजेचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही उपाय द्यायचा होता तो शाश्वत असा द्यायचा होता. त्यासाठी समस्येला शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे हात घालायचा असं ठरवलं.
याबाबत चर्चा करताना लक्षात आलं –
·       २२ गावांमध्ये प्रत्येक गावातील लोकसंख्या सरासरी १००० ते २००० या दरम्यान होती.
·       तेथील आरोग्यसेवा ही मुख्यतः भोंदू डॉक्टरांच्या मार्फत पुरवली जातीये. ४ ते ५ गावांमध्ये कुठेतरी एखादा BAMS किंवा BHMS डॉक्टर आहे.
·       आजूबाजूला २ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पण दोन्हीही अकार्यक्षम आहेत.
·       जालिहाळपासून २० किमी अंतरावर कर्नाटकमधील विजापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी २ मेडिकल कॉलेजेस आहेत. एक ‘अल् आमिन’ आणि दुसरं ‘B.L.D.’ दोन्ही संस्थांचा लौकीक खूपच चांगला आहे.
·       येरळाचं स्वतःचं आरोग्य केंद्र आहे पण ते गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे बंद आहे.
·       २२ मधील प्रत्येक गावात येरळाच्या आरोग्यसेविका कार्यरत आहेत. ज्यांनी शासनाच्या RCH II कार्यक्रमात काम केलं आहे.
आता कामाला सुरुवात कुठुन करायची? समस्येला शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे हात घालायचा होता. आणि त्यासाठी नायना आणि अम्मांनी शिकविल्याप्रमाणे सुरुवात ही मोजमापाने करायचं ठरविलं. हातामध्ये कोणतीही आकडेवारी नव्हती. त्यामुळे समस्येचा अभ्यास करायचा आणि समस्या मोजायची ठरवलं. २२ गावांमध्ये ज्या आरोग्यसेविका आहेत, त्यांच्यामार्फत एक सर्वेक्षण करायचं. १५ ते ५० वर्षे वयोगटातील सर्वच महिलांचा सर्व्हे होईल.
सर्व्हेची काही मुख्य उद्दिष्ट्ये अशी आहेत –
१.      समस्येचं मोजमाप – समस्येची तीव्रता आणि व्यापकता समजून घेणे. गर्भाशय काढण्याचं प्रमाण नेमकं किती आहे हे जाणून घेणे.
२.      गर्भाशय काढण्याची नक्की कारणे काय आहेत हे जाणून घेणे.
३.      गर्भाशय काढण्यामुळे ज्या नवीन आरोग्यविषयक समस्या उत्पन्न होतात त्यांचं प्रमाण जाणून घेणे.
४.      या सगळ्यांचा महिलांवर किंवा त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक ताण किती पडतो हे जाणून घेणे.
५.      हे ऑपरेशन्स कोणत्या ठिकाणी होताहेत ते जाणून घेणे.
६.      अनावश्यक गर्भाशय काढण्याचा कोणत्या शासकीय योजनेशी वगैरे काही संबंध आहे का ते जाणून घेणे.
असा अभ्यास यापूर्वी कुठे झालाय का हे शोधण्यासाठी Googleला विचारुन पाहिलं. फारसं काही दिसलं नाही. आंध्रप्रदेश आणि गुजरात मध्ये काही सर्व्हे झालेत. यामध्ये एक गोष्ट वाचण्यात आली. आंध्रप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना (RSBY)’ अंतर्गत २००९ आणि २०१० दरम्यान गर्भाशय काढण्याचा प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्या काळात एक विनोद फिरत होता. काही दिवसांत कुणितरी RTI च्या अंतर्गत माहिती विचारेल की छत्तीसगड मधील गर्भाशय असणाऱ्या महिला किती शिल्लक आहेत?इतकी भयंकर परिस्थिती होती तिकडे! म्हणून हे एखाद्या योजनेअंतर्गत केलं जातंय का हेदेखील पाहणं गरजेचं होतं. तसंच काही महिला स्वतःहूनच पिशवी काढण्याचा आग्रह करतात असंही लक्षात आलं. त्याचासुद्धा अभ्यास यातून केला जाईल .
अभ्यासाची कार्यपद्धती ठरवली. सर्वेक्षण करण्यासाठीची प्रश्ऩावली तयार केली जी अगदी ‘होय’ किंवा ‘नाही’ या स्वरूपाची किंवा योग्य तो पर्याय टीक करता येण्यासारखी आहे जणेकरुन आरोग्यसेविकांना फार माहिती स्वतःहून भरावी लागणार नाही. आरोग्यसेविकांना सर्व्हे कसा करायचा आणि प्रश्ऩावली कशी भरायची याचं प्रशिक्षण द्यायचं आणि सर्व्हे सुरु करायचा. सर्व्हेनंतर त्याचे निष्कर्ष जसे निघतील तशा प्रकारचे उपाय शोधयचे असं ठरलं. अम्मा व आनंदकडून  याबाबत मार्गदर्शन घेतलं. अम्मांनी सर्व्हे आम्हाला स्वतःला करायला सुचविलं होतं. पण १४० किमी अंतर ही खूप मोठी अडचण होती. त्यामुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळे कार्यपद्धती व प्रश्ऩावलीमध्ये आवश्यक ते बदल केले.
५ मे ला सर्व २२ आरोग्यसेविकांना जालिहाळला एकत्र बोलाविलं. आम्ही म्हणजे अनिकेत, पांडुरंग, नीलजा, ऋचा, लीना, अमृता आणि मी असे गेलो. देशपांडे काकाही होतेच. सुरूवातीला महिलांना आपल्या जननेंद्रियांची रचना, कार्य, मासिक पाळी, गर्भाशय आणि अंडाशयाचे महत्व ppt द्वारे समजावून सांगितले. गर्भाशय काढण्याचे दुःष्परिणाम, ते कोणत्या आजारांमध्ये काढावे लागते आणि कोणत्या आजारांमध्ये काढावे लागत नाही हेसुद्धा पटवून सांगितले. तसंच त्रास होवू लागला तर काय करावं याबद्दल सांगितलं. या समस्येवर आपल्याला कसं काम करायचं आहे व त्यात त्यांची भूमिका किती महत्वाची आहे याची कल्पना दिली. त्यांना प्रश्ऩावली दाखवली. त्यातली प्रत्येक संज्ञा समजावून सांगितली. त्या प्रचंड उत्साही आणि उत्सुक आहेत. त्यातल्या बऱ्याचजणी शोधग्रामला येवून गेलेल्या आहेत. आणि त्यांनी यापूर्वी संस्थेचे बरेच सर्व्हे केलेले आहेत. त्यांच्यासोबत बोलताना सहज विचारल्यानंतर कळालं की, त्यांच्यापैकी २२ मधल्या १० जणींची गर्भाशयं काढली हाती! म्हणजे ४५% ! सगळ्या ४० वर्षांच्या आतल्या होत्या. हा आणखी एक मोठा धक्का होता. आणि त्यांच्या मते गावातील महिलांमधील प्रमाण तर ७०% पर्यंत होतं!
त्यावेळी २ महिला आल्या होत्या ज्या गर्भाशय काढून घेण्यासाठी जाणार होत्या पण आरोग्यसेविकांनी त्यांना थांबवून तिकडे आणलं होतं. एक २२ तर दुसरी ३७ वर्षांची. तक्रार फक्त पोटात दुखणे आणि अंगावरुन जाणे. त्यांना थांबायला सांगितलं. अशांकरिता काय करता येईल यावर आम्ही विचार करत होतो. त्याचवेळी त्यांचं आरोग्यकेंद्र पाहिलं. खुप वाईट वाटलं. इतका छान सेट् अप असूनही फक्त डॉक्टर नसल्यामुळं ते बंद होतं.
समस्येवर अभ्यास केल्यानंतर आणि सांगलीचे ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ.एम.पी.पाटील सर, डॉ.व्होरा सर, आनंद, अमृत, देशपांडे काका यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आणि अम्मांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर या निष्कर्षापर्यंत आलो की ही समस्या अगदी पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आणि त्यावर दोन गोष्टी तोडगा म्हणून करता येवू शकतात आणि त्या करायच्या ठरल्या.
१.      जनजागृती: हाच सगळ्यात जास्त परिणामकारक उपाय असू शकतो. त्याकरिता वेगवेगळे मार्ग वापरले जातील. जसं ppt सादरीकरण, पथनाट्य इ. करता येईल. आणि जागृतीकरिता सगळ्यात परिणामकारक माध्यम म्हणजे येरळावाणी’ कम्युनिटी रेडिओ! त्याद्वारे जास्तीत जास्त प्रबोधन करत रहायचं. आरोग्यसेविकांनीही सर्व्हे करताना समुपदेशन व मार्गदर्शन करायचं.
२.      आरोग्यसेवा: फक्त चुकीचं काय आहे ते सांगून थांबून चालणार नव्हतं. पर्याय देणं गरजेचं होतं. आणि तो शाश्वत असा देणं जास्त महत्वाचं होतं. त्यासाठी ठरविलं की ठराविक अंतरानं जालिहाळमध्ये स्त्रीरोग ओपीडी चालवायची. ज्या महिलांना ॲडमिट करुन उपचार देण्याची गरज आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे अशांना संस्थेमार्फत तिथून जवळ असणाऱ्या ‘अल् आमिन’ आणि ‘B.L.D.’ या २ मेडिकल कॉलेजेसना पाठवायचं. संस्थेमार्फत त्यांना योग्य उपचार आणि सवलत मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा.
आता याकरिता स्त्रीरोगतज्ञ लागणार होते. आणि त्यासाठी अगदी योग्य व्यक्ती आम्हाला मिळाली. डॉ. एम.पी.पाटील सर. प्रचंड अनुभवी, ज्येष्ठ आणि तरीही उत्साही. सरांचं नेटवर्कसुद्धा खुप मोठं! सरांनी एक ते दीड महिन्याच्या अंतराने २ स्त्रीरोगतज्ञ आणि आम्ही २ MBBS ग्रॅड्जुएट्स असे मिळून ओपीडी चालवू असं ठरविलं. ‘अल् आमिन’च्या विभागप्रमुखांसोबत संपर्कही साधून तिकडूनही डॉक्टर्सना पाठविण्याची विनंती केली.
पाटील सरांसोबत मुकुंद व अनिकेत
त्याप्रमाणे २६ मे रोजी एम.पी.पाटील सर, त्यांचे सहकारी डॉ.शरद कारे सर, अनिकेत आणि मी असे ४ डॉक्टर्स आणि येरळाचा स्टाफ असे मिळून जालिहाळच्या आरोग्य केंद्रात ओपीडी चालविली. प्रतिसाद खूप चांगला असा मिळाला नाही आणि त्याला तशी कारणेही होती. पण पहिलीच वेळ असल्याने ठीक होतं. त्यातल्या २ महिलांना पुढील उपचारासाठी पाठविलं. पुढची ओपीडी ६ जूलै ला आहे. त्याची जाहिरात ऐकुन लोक संस्थेला फोन विचारू लागले की इतर आजारांसाठी काही करताय का? म्हणून मग यावेळी इतर आजारांचीही ओपीडी चालवणार आहोत.
आता जुलैमध्ये जालिहाळ गावात ‘Pilot Basis’ वर सर्व्हे होणार आहे. त्याचा ‘Data Analysis’ करुन जसे निष्कर्ष निघतील व अनुभव येतील त्यानुसार इतर गावांमध्ये सर्व्हे होईल. ‘Data Storage and Analysis’ करिता ‘Database Management’ चा जो प्रोग्रॅम लागणार आहे तो नुकतंच वालचंदमधून इंजिनिअर झालेल्या निलजा (निर्माण ४) व ऋचा (निर्माण ५) या तयार करणार आहेत. आता सर्व्हे पूर्ण होण्याची वाट बघतोय.
यावर काम करताना मात्र खुप मजा आली आणि येतीये. काम करताना सर्चमध्ये झालेल्या ‘Health Camps चा आणि ३ वर्षांपूर्वी केलेल्या ‘Tobacco Survey’चा खूप उपयोग झाला. आणि एक गोष्ट मात्र जाणवली की आपल्या शिक्षणाचा, आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करुन जेंव्हा एखाद्या समस्येवर काम करतो तेंव्हा काम करायला खूप मजा येते आणि समाधानही मिळतं. याबाबत कांही सूचना किंवा मार्गदर्शन मिळाले तर आनंदच होईल.

डॉ. मुकुंद जाधव, dr.mbjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment