'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 28 April 2015

डॉक्टर मित्रांची उल्लेखनीय कामगिरी !

योगेश दादाच्या मार्गदर्शनाखाली निर्माणींच्या सहभागाने झालेली गडचिरोलीतील आरोग्याच्या समस्यांवर झालेली दोन संशोधने चंदीगड येथे झालेल्या Indian National Stroke Conference मध्ये गौरवली गेली आहेत.
Stroke is the leading cause of death in rural Gadchiroli, India: A population-based studyया संशोधनात विक्रम सहाने, सुजय काकरमठ आणि वैभव आगवणे यांचा सहभाग होता. आरोग्याचे कोणते कार्यक्रम राबवायचे हे ठरवण्यासाठी कोणत्या कारणामुळे जास्त मृत्यू होतात हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्च कार्यक्षेत्रातल्या गडचिरोलीच्या ग्रामीण भागांत होणाऱ्या प्रत्येक प्रौढ मृत्यूची चौकशी (verbal autopsy) सर्चचे सुपरवायझर्स करतात. त्यांनी केलेल्या वर्णनावरून या डॉक्टरांनी मृत्यूचे कारण निश्चित केले. ग्रामीण भागातही ‘लकवा’ हे मृत्यूचे एक प्रमुख कारण असल्याची धक्कादायक बाब या संशोधनात पुढे आली. या संशोधनाच्या सादरीकरणाला चंदीगडच्या परिषदेत प्रथम पारितोषिक मिळाले.


लकवा हे मृत्यूचे प्रमुख कारण; लकवा झाल्यानंतर मृत्यू झाला नाही तर अपंगत्व येते. त्या व्यक्तीची कमाई बंद होते, उपचारांचा खर्च होतो व कुटुंबाला त्या व्यक्तीची काळजी घेण्यात बराच वेळ व उर्जा द्यावी लागते. लकव्याचे समाजातील प्रमाण शोधण्यासाठी High prevalence of stroke in rural Gadchiroli, India: A community-based studyहे संशोधन हाती घेण्यात आले. त्यात विक्रम सहानेचा सहभाग होता. आरोग्यदूतांनी प्रश्नावलीच्या सहाय्याने लकव्याचा संशय व्यक्त केलेल्या रुग्णांची तपासणी करणे आणि त्यांना खरंच लकवा मारला आहे का हे ठरवणे असे विक्रमच्या कामाचे स्वरूप होते. या संशोधनात ग्रामीण भागात लकव्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत बरेच वाढले आहे हे लक्षात आले . ग्रामीण भारतात गेल्या २० वर्षांत झालेले अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. या संशोधनाच्या पोस्टरलादेखील चंदीगडच्या परिषदेत प्रथम पारितोषिक मिळाले.

ग्रामीण भारतातील आरोग्याच्या समस्यांवर केलेल्या या महत्वपूर्ण कामाबद्दल निर्माणच्या या तरुण डॉक्टरांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a Comment